राज्यात सुमारे 23 लाख
क्विंटल अन्नधान्याचे वाटप
मुंबई,
दि. 8 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही
नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध
उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण
सुरळीत सुरु असून दि. 1 ते 7 एप्रिल 2020 या सात दिवसात राज्यातील 90 लाख 02 हजार 868
शिधापत्रिकाधारकांना तब्बल 22 लाख 83 हजार 180 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा
उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री
छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या
दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा
योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील
पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7.00 कोटी आहेत. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य
दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना
अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 15 किलो गहू आणि 3 रुपये
किलो दराने प्रती कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो
दराने एक किलो साखर दिली जाते.
तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य
कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु. किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु. किलो
दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.
राज्यात
या योजनेमधून सुमारे 12 लाख 52 हजार 350 क्विंटल गहू, 9 लाख 75 हजार 144 क्विंटल तांदूळ, तर 11 हजार 503 क्विंटल
साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 4
लाख 23 हजार 715 स्थलांतरित शिधापत्रिका धारकांनी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी
पोर्टेबिलिटी योजनेनुसार अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल
ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.
पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ दि.
3 एप्रिलपासून टप्या-टप्याने देण्यात येत
आहे. या योजनेसाठी 3 लाख 50 हजार 082 मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले
जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार
आहे
No comments:
Post a Comment