Followers

Sunday 27 August 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण





 

परभणी : ‘शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.

 

            शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्यामार्फत परभणी येथील अमिता रौफ बक्श यांना तृतीयपंथी म्हणून ओळखपत्र देण्यात आले. तसेच के. के. एम. महाविद्यालय मानवत येथील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी प्रियंका भगीरथ अदमाने हिला राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार अंतर्गत 10 हजार रुपयाचा धनादेश, पी. डी. जैन होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या तनुजा संजय तायडे या विद्यार्थिनीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना-वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन व निवासाची सोय व्हावी म्हणून रोख रक्कम आधार संलग्न बँक खात्याद्वारे देण्यात आली आहे.

 

जिंतूर तालुक्यातील करवली येथील भारत स्वयंसहायता बचतगटाच्या शिल्पा रवी मानवते यांना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले. वडगाव सुक्रे येथील वैशाली नाना हातागळे यांना ऊसतोड कामगार म्हणून ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

 

मानवत तालुक्यातील कुंभारी येथील घनश्याम मधुकर रणखांबे यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत चार एकर जिरायत शेतजमिनीचे वाटप समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले. गंगाखेड येथील गणपती यादव सवराते यांना हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडणारा जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाचा लाभ म्हणून 78 लाख 51 हजार 765 रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) यांच्यामार्फत देण्यात आला.

 

परभणी शहरातील मंगलमूर्ती नगरातील रहिवाशी श्रीपादराव प्रल्हादराव झांबरे यांना प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत महानगरपालिकेमार्फत 2 लाख 50 हजार रुपये लाभाची रक्कम देऊन घरकुल बांधकाम कार्यारंभ आदेश प्रमाणपत्र देण्यात आले. विकास प्रभाकर धापसे यांना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत नगर परिषद सेलू यांच्याकडून घराची चावी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, परभणी यांच्याकडून पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील मीना भुजंग काळे यांना स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत धनादेश देण्यात आला. तसेच परभणी तालुक्यातील लोहगाव येथील गौरी बालाजी घोरवांड यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रिया प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून वितरीत करण्यात आले.

 

जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथील राजेश कठाळू कऱ्हाळे यांना शबरी आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कार्यालयाकडून 1 लाख 50 हजार अनुदानाची रक्कम देत घराची चावी दिली. जिंतूर तालुक्यातील करवली येथील तानाजी साहेबराव घाटुळ यांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिंतूर कार्यालयाकडून योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदानापोटी 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून साखला प्लॉट परिसर, परभणी येथील भाग्यश्री रवी गायकवाड यांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 5 हजाराचा तीन टप्यात लाभ लाभार्थीच्या बँक खात्यामार्फत देण्यात आला.

 

अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सोन्ना येथील मीराबाई ज्ञानेश्वर आतमवाड यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत  पाथरगव्हाण येथील अभिमान मरिबा ढवळे यांना सिंचन विहीर देण्यात आली.

 

जिल्हा कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सोन्ना येथील उषा रावसाहेब देशमुख यांना ट्रॅकर देण्यात आले. मानवत तालुक्यातील कोथळाच्या कमल मोतीलाल जोहरुले यांना श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत निवृत्ती वेतन मंजूर केल्याबाबतचे प्रमाणत्र देण्यात आले.

 

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शकन केंद्र परभणी यांच्यामार्फत शहापूर येथील बाबाराव दशरथ ढवळे आणि धर्मापुरीच्या लक्ष्मण संतुकराव चट्टे यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत अनुक्रमे 2 लाख 50 हजार  रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

 

*****

परभणी येथे ‘शासन आपल्या दारी’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

परभणी, दि.२७ (जिमाका): परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात ‘अमृत’ योजनेतून भूयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आज  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री विक्रम काळे, अब्दुल्लाह खान अ. लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्राणी, विप्लव बाजोरिया, मेघना साकोरे-बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रत्नाकर गुट्टे, बालाजी कल्याणकर, माजी मंत्री अर्जून खोतकर, विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलीस अधीक्षक रागसुधा आर, महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते. प्रारंभी  मान्यवरांच्या हस्ते राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना, सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.

परभणीसाठी आपले सरकार आता पर्वणी म्हणजे सुवर्णसंधी घेऊन आले आहे. विकास केवळ मुंबई – पुणे - नागपूर एवढाच मर्यादित असता कामा नये, तो चौफेर असला पाहिजे म्हणूनच अगदी गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गापर्यंत म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही. राज्याचा समतोल विकास झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करीत आहोत, असे सांगून ‘शासन आपल्या दारी’  ही या देशातील क्रांतीकारी योजना ठरत आहे.  करोडो रुपयांचे लाभ देऊन या अभियाने देशात विक्रम केला असून आतापर्यंत १ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

परभणी जिल्ह्यात ८.७५ लाख लाभार्थ्यांना लाभ

एकट्या परभणी जिल्ह्यात ८ लाख ७५ हजार लाभार्थ्यांची नोंदणी केली आहे, त्यांना सुमारे १ हजार ४६४ कोटींचे लाभ आपण देत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या  अभियानाच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थ्यांना 22 हजार ट्रॅक्टर, 4 हजार पॉवर टिलर, 22 हजार 500 रोटाव्हिटर तसेच 4 लाख लाभार्थ्यांना 1351 कोटी रुपयांचा लाभ डिबीटीच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी  कौतुक केले.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीपाचे पिक धोक्यात आले आहे. मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून  जाऊ नका, काळजी करु नका, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत अजून ६ हजार रुपयांची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना राज्याने सुरु केली असून आता पात्र शेतकरी लाभार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.  प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना विविध पिकांचा केवळ एका रुपयात विमा काढून भविष्यात येणाऱ्या आपत्तींपासून संरक्षित केले आहे. महिलांना महिला बचतगटाच्या माध्यमातून अर्थिक मदत करुन महिलांचे शक्तीगट तयार करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. राज्य शासनाने 75 हजार नोकऱ्या देण्याचे जाहीर केले होते. परंतू प्रत्यक्षात दीड लाखापेक्षा जास्त नोकऱ्या देण्याचे काम सुरु आहे. 'लेक लाडकी' योजना सुरू केली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम हे सरकार करीत असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे शासन  - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून राज्याचे सरकार आपल्या सेवेत आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या माध्यमातून  जिल्ह्यात विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे ‘शासन आपल्या दारी अभियान’ आहे. ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे, तिथे सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठवाड्याला दर चार ते पाच वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना तयार केली आहे. सरकारने यासाठी केंद्र सरकारला विनंती केली असुन, यासाठी निधी मिळेल असे सांगून, पश्चिमी वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे सांगून मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागू नये, यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. निम्न दुधना प्रकल्पासाठी तसेच इतर प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून देखील पाण्याचा थेंब-थेंब वाचवून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

 नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ मार्ग करण्यात येणार असून, त्यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्याचे भाग्य उजळणार आहे. परभणी शहरातील रस्ते विकासासाठी तसेच रस्त्याला काँक्रिटमध्ये परिवर्तित करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बारव संवर्धन मोहीमेचे कौतुक केले.

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना, एक रुपयात पीक विमा या महत्वाच्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यात 7 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बारा महिने वीज उपलब्ध करुन देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. महिलांना बसमध्ये 50 टक्के  सवलत तर ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करुन दिली आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

संजय गांधी निराधारसारख्या विविध योजनांमध्ये मानधनात वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत देखील वाढ केली असून, गरीबांसाठी घरे बांधणीचे काम देखील मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. शबरी, रमाई  योजने अंतर्गत घर योजना व्यापक प्रमाणात राबवून बेघरांना घर उपलब्ध करुन देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे. या योजनेतून जेवढी घरे मागाल तेवढी घरे देण्याचे काम शासन करणार आहे. परभणी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्र शासनाने गतीने निर्णय घेतला. राज्य सरकारने राज्यात एका वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील शेतकरी कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून सर्वांचा विकास करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य शासन काम करत असून, सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिली.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील  विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुढील महिन्यात शासन स्तरावर विभागीय आढावा बैठक घेण्यात येणार असून, लवकरच राज्य शासनाकडून मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाबाबत योग्य निर्णय  घेण्यात येतील, शेतकऱ्यांबाबतही ठोस महत्वाचे निर्णय घेण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

परभणी जिल्ह्याला ऐतिहासिक प्राचिन वास्तूंचा मोठा वारसा लाभला असून, त्यांच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या कामासाठी सर्वजण पुढे याल, असा विश्वास व्यक्त करुन राज्यात ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांचे शासकीय कार्यालयातील होणारे हेलपाटे, वेळ आणि पैसाही वाचत असून, हा कार्यक्रम राज्यभर लोकप्रिय होत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

 राज्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडला असून, राज्य शासन आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. राज्यातील पीक परिस्थितीबाबत नुकताच व्हीसीद्वारे आढावा घेतला असून, त्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

पावसाच्या मोठ्या खंडामुळे राज्यातील धरणातील जीवंत पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असून, पाणी वापराबाबतचेही नियोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यात पावसाळ्याचे अजून काही दिवस बाकी असल्याचे सांगून ते म्हणाले की, सध्या मराठवाड्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे. पाणी वापराचे योग्य नियोजन करून नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत त्यांनी वनविभागाने गवताचा लिलाव न करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची संकल्पना विशद करुन लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गंत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.

'शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ

यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. यामध्ये तृतीयपंथीयांना ओळखपत्र, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजना, कृषी यांत्रिकीकरण, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र, कर्मवीर दादासाहेब सबळीकरण व स्वाभीमान योजना, रमाई घरकुल योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, शबरी आवास योजना, वैयक्तीक शौचालय अनुदान, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, वैयक्तीक कर्ज परतावा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या योजनाचा यावेळी लाभार्थ्यांना  लाभ देण्यात आला.

******

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

 •          परभणी जिल्ह्यातील पायाभूत विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द

•           ‘शासन आपल्या दारी’  ही या देशातील क्रांतीकारी योजना

•           आतापर्यंत १ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ

•           जिल्ह्यात ८ लाख ७५ हजार लाभार्थ्यांची नोंदणी, त्यांना सुमारे १ हजार ४६४ कोटींचे लाभ

•           सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम हे सरकार करीत आहे

•           परभणी शहरात अमृत योजनेतून भुयारी गटार बांधण्यात येणार, त्यासाठी निधी देण्यात येईल.

•           परभणी शहरातील कॉंक्रिटच्या रस्त्यांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

•           मुंबई-नागपूर-गोवा या शक्तीपीठ महामार्गाचा मराठवाड्याला फायदा होईल.

•           रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम गतीने सुरु आहे.

•           औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर कार्यवाही केली जाईल.

•           नाट्यगृह, पाण्याच्या योजना, औद्योगिक वसाहतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

•           राज्याच्या काही भागात पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनो काळजी करु नका, शासन खंबीरपणे पाठीशी उभे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही…

Sunday 6 August 2023

पंतप्रधानांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ. महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश.

 जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार.

मुंबई – देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. 

यापूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यातून राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून या स्थानकांमध्ये मुलभूत पायाभूत तसेच अद्ययावत सुविधा आणि रेल्वे मार्गांची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

देशातील रेल्वे स्थानकांच्यादृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ झाला आहे. या योजनेतून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे, शिवाय प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

‘अमृत भारत स्थानक’ योजनेमुळे रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन होईल,  शिवाय रेल्वे स्थानकातील प्रवेशाची ठिकाणे आणि स्थानक परिसराचा विकास, प्रतिक्षालये, स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्कलेटर, मोफत वायफाय, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्रे, प्रवाशांना माहिती देण्यासाठी उद्घोषणा प्रणाली, दिव्यांगासाठी सुविधा आदी सुविधा टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहेत, असे सांगून या विविध पायाभूत सुविधांच्या नव्या अध्यायाची नोंद रेल्वेच्या इतिहासात होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

अमृत भारत स्थानक योजने’त समाविष्ट महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके :

सोलापूर रेल्वे विभाग – अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर

पुणे रेल्वे विभाग - आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव

भुसावळ रेल्वे विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव 

नागपूर रेल्वे विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव

मुंबई रेल्वे विभाग – कांजुरमार्ग, परळ, विक्रोळी

नांदेड रेल्वे विभाग – औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम

सिकंदराबाद रेल्वे विभाग – परळी वैजनाथ