Followers

Sunday 26 September 2021

लातूर जिल्ह्याची ऐतिहासिक सफर...!! लत्तलूर ते लातूर...!

 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन विशेष



 लातूरजिल्ह्यात काय बघायला आहे हो? या प्रश्नाचे उत्तर 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिना पासून आम्ही लातूर जिल्ह्याची ओळख करून देणाऱ्या इतिहासाच्या पानातून करून देणार आहोत. फार लांब लचक नसेल थोडक्यात ओळख असेल, आठवड्यातून एकदा क्रमशः दिली जाईल..

हा पहिला लेख... लातूरची प्राथमिक ओळख करून देणारा...!! 

       महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील एक जिल्हा. त्याचा विस्तार १८° ०५’ उत्तर ते १९° १५’ उत्तर अक्षांश आणि ७६° २५’ पूर्व ते ७७° ३५’ पूर्व रेखांशां दरम्यान आहे. क्षेत्रफळ ७,३७२ चौ. किमी. असून त्याची पूर्व – पश्चिम लांबी सु. ११२ किमी. व उत्तर दक्षिण रूंदी ११३ किमी. आहे.

लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला स्वतःची ऐतिहासिक ओळख आहे. काही ओळखी तर प्रचंड प्राचीन आहेत.

आजच्या घडीला लातूर जिल्यातील तालुका असलेले उदगीर कर्नाटक राज्याच्या हद्दीला लागून असलेलं आपल्या राज्याचे शेवटचे टोक... याच शहारात बहामनी पूर्व एक महत्वाचा किल्ला आहे...  मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराच्या वेळी निजामाच्या ताब्यात असलेला..या किल्यावर ज्या इब्राहिमखान गारदीची  ( जगातल्या जहाल सैन्यात गणले गेलेले  गारद्यांच्या सैन्याचा सेना नायक ) सत्ता होती. तिथूनचं सदाशिव राव भाऊ यांच्या नेतृत्वातील सैन्याने दिल्लीच्या तख्तताला आव्हानाची लढाई सुरु केली...  अशा जहाल सैन्यावर हल्ला करून उदगीरचा किल्ला फत्तेह केला... या लढाई मागचा मुख्य बेत हे गारद्याचे सैन्य मिळवणे होते..   त्याप्रमाणे उदगीर करार झाला...  याच सैन्याच्या बळावर दौलताबाद घेतलं..  पुढे पानिपतच्या युद्धात शेवट पर्यंत चिवट लढा याच गारद्याच्या तुकडीने देवून सदाशिव भाऊ युद्ध भूमीवर धारातीर्थी पडे पर्यंत यांची धड लढत होती.

निलंगा तालुक्यातील खरोसा येथे ज्या लेणी आहेत. त्याचा इतिहासही प्राचीन आहे. 

     खरोसा लेण्याचे तत्कालीन राजकीय स्थान बघितले तर गुलाबर्गा जिल्ह्याच्या सीमेवर येते...राष्ट्रकूटाची राजधानी मान्यखेत इथून 170 किलोमीटर आहे... राष्ट्राकुटाचे मूळ गाव लातूर आहे (लत्तलूर ) राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा या राजांनी 

वेरूळची एक नंबरची कैलास लेणी ही  कोरल्याचा उल्लेख नागपूरच्या म्युझियम  मध्ये आहे. (हा संबंध लातूरशी असल्यामुळे उल्लेख त्यावर सविस्तर लिहूच.) त्यामुळे तत्कालीन काळात या लेण्याचे स्थान अनन्यसाधारण असेच असावे... इथल्या 

 मुख्यलेणीत मात्र रामायणातील दृश्य कोरले आहेत... एका ठिकाणी हिरण्यकशिपुचे नरसिंह रूपातील विष्णुने पोट फाडल्याचे शिल्प आहे... वेरूळच्या कैलास लेण्यातील शिल्पाच्या  रिपलिका वाटव्यात एवढे साम्य यात आहे..  वेरूळच्या तिथे काळा पाषाण असल्यामुळे  झिज झाली नाही इथे मात्र कमालीची झिज झाली आहे.

  या लेण्याचा उद्देश शिक्षण देणं असावं आणि इथे छोटया गुंफा आहेत कदाचित त्या विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असाव्यात....कागदोपत्री याचे फारसे काही पुरावे नाहीत पण डॉ. दाऊद दळवी यांच्या लेण्याच्या इतिहासातील पुस्तकात या लेण्यांचा उल्लेख आहे.

उदगीरचा किल्ला आणि खारोसा लेण्या या दोन स्थानांचे महात्मे तर राष्ट्रीय स्तरावर अभ्यासले गेले आहे. अजून यावर अभ्यास सुरु आहे.

आज ही जिल्ह्याची मोठी ओळख, उद्या पासून छोट्यातली छोटी ओळख क्रमशः देऊ...!!



@युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Friday 14 May 2021

साखर उद्योगाने ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घेण्याची गरज मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातुन राज्याला स्वयंपूर्ण करणार -- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रतिपादन



 उस्मानाबाद,दि.14(जिमाका):-राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची  अंमलबजावणी करीत असून  साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  केले.

      उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे उदघाटन केले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.  

       या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील  व्हीसीव्दारे सहभागी झाले. यावेळी कारखाना स्थळावर खासदार ओमराजे निबांळकर,आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील,अविनाशजी महागांवकर, एस.व्ही. पाटील, मौज इंजिनिअरिंगचे ओक आदी उपस्थित होते. 

       श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लैब उभारल्या. कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली.  पण दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले असता आता या लाटेवरही आपण मात करू शकू असा विश्वास मला आहे. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. आपल्या राज्यात बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः सतराशे मेट्रिक टन आहे. पण आपल्याला तीन हजार मेट्रिक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू.राज्यातील विविध महानगरपालिकांना ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातील ईथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी असेही ते म्हणाले.                                    श्री.नितीन गडकरी म्हणाले, ऑक्सिजन निर्मिती साठी डिस्टलरी बंद केली जाऊ नये. पन्नासहून आधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल, यावर भर द्यावा.

      उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले, धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील गरज पूर्ण होईल. त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यात पुरवठा केला जाऊ शकतो. इतर कारखान्यांनी अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी आणि नियमावलीत बदल करण्याबाबत संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया आधिक गतिमान होईल.

      यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन विकसित करण्यात आलेल्या आरटीपीसीआर प्रयोग शाळेबाबत माहिती दिली. आमदार कैलास पाटील यांनी आभार मानले. 

प्रकल्पाबाबत थोडक्यात

उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात बदल करुन ऑक्सिजन प्रकल्पात रुपांतर

ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला साखर कारखाना

दररोज सहा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार

ऑक्सिजनची शुद्धता 96 टक्के 

                                           ******