Followers

Monday, 23 February 2026

कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष

 





'बेस्ट ऑफ इंडिया' रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद

 नवी मुंबई :-  हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक अभूतपूर्व इतिहास रचला गेला. कोकण विभागातील 20 हजार शाळांमधील तब्बल 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डने घेतली असून, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आगामी 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे.

नेरुळ येथील गुरु गोविंदसिंग एज्युकेशन अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील यांच्यासह उपमहापौर दशरथ भगत, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, प्रशासन सहआयुक्त विजय म्हासाळ, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक मनोज सानप, सहायक आयुक्त डॉ.सागर घोलप, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त दिपाली दिवेकर, नवी मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोडे, तसेच गुरुबचन सिंग सिंघल, जसपाल सिंग नागरा, नगरसेवक कुलदीप सिंग सुरी, जसविंदर सिंग, मुख्याध्यापिका अमरजित कौर सेनी आणि ज्येष्ठ पत्रकार बी.पी. नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील म्हणाल्या की, श्री गुरु तेग बहादूर सिंग जी यांचे बलिदान केवळ शीख समाजासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खारघर, सेक्टर 29 येथे आयोजित होणाऱ्या या भव्य समागमात जगभरातून 15 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशा विश्वविक्रमी उपक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचे मनस्वी समाधान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या या विक्रमी सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, श्री गुरु तेग बहादूर जी यांचे जीवन धैर्य, करुणा, समता आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याचा एक तेजस्वी आदर्श आहे. 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच सुरात गायलेले हे गीत सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करणारे असून, जागतिक स्तरावर याची नोंद होणे ही गौरवास्पद बाब आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी खारघर येथील सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला असून, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले. उद्याचे भविष्य या मुलांच्या हातात असून त्यांना असे संस्कारक्षम कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरतील त्यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठिक 09.00 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक गायन केले. प्रास्ताविक करताना उपसंचालक मनोज सानप यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ही मोहीम आता केवळ 'व्हिडिओ कंटेंट' न राहता एक संस्कारांची डिजिटल चळवळ बनली आहे. गुरुबचन सिंह यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत मुलांचे प्रबोधन केले. कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक संजीवनी जाधव-पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर 

#खारघर

हिंद दि चादर”चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड




पालघर : वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत “हिंद दी चादर” या संकल्पनेचा मूलभूत संदेश त्यांच्या मनात रुजवण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात सुप्रसिद्ध सूफी गायक सतिंदर सरताज यांच्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमास प्रांत अधिकारी प्रदीप चव्हाण, शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.


संवादातून विद्यार्थ्यांना विचारांची दिशा

भक्तिगीतानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी, “गाण्याचा अर्थ कोणाला समजला का?” असा थेट प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणाची संधी दिली. “प्रत्येक कृतीमागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. केवळ ऐकणे नव्हे, तर त्यातून मूल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शीख धर्माचे नववे गुरु गुरू तेगबहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. “हिंद दी चादर” म्हणजे हिंदू धर्माचे नव्हे, तर संपूर्ण हिंद — म्हणजेच भारतभूमीचे संरक्षण करणारे. हा संदेश धार्मिक सहिष्णुता, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या मूल्यांना बळकटी देणारा आहे,” असे त्यांनी नमूद केले.


धर्मनिरपेक्षतेचा संविधानिक संदेश

“आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म पाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. कोणालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. गुरु तेग बहादूर यांनी याच मूल्यांसाठी बलिदान दिले,” असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली.

गुरुद्वारातील सेवाभावाचा उल्लेख करत त्यांनी सेवा, नम्रता आणि स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट केले. “समाजासाठी निस्वार्थ सेवा आणि स्वतःचे कार्य स्वतः करण्याची वृत्ती अंगीकारली तरच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल,” असे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

   अंबिस्ते येथील आश्रमशाळेतील सकारात्मक शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि शिक्षकांचे प्रयत्न यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. “महापुरुषांचे आदर्श समोर ठेवून आपण जीवनात यशस्वी व्हावे,” अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिल्या.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर

“हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ठाण्यात समूहगान कार्यक्रम





ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे) – “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी, ठाणे येथे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विशेष समूहगान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले प्रेरणादायी गीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागातून सामूहिकरित्या गायन करण्यात आले. समूहगानातून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदान, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या मूल्यांची आठवण उपस्थितांना करून देण्यात आली.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, प्रकल्प संचालक (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, उपशिक्षणाधिकारी (योजना) शुभांगी बढे, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंझारराव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच मुख्याध्यापिका मानसी मिलिंद ढवळीकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असे मत व्यक्त केले.

तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये “हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त समूहगान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी वर्गाने विविध शाळांना भेट देऊन या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. देशभक्ती, त्याग व मानवतेचा संदेश देणाऱ्या या समूहगान उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. आगामी २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या मुख्य शहीदी समागम कार्यक्रमासाठी या उपक्रमातून सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर

Monday, 16 February 2026

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान



वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन

मुंबई : संतांच्या भूमीत गुरू तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदान, खारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, तसेच आरोग्य, शिक्षण, पोलीस विभागांचे प्रतिनिधी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, संस्कृती रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी गुरू तेग बहादुर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शहादतीचा इतिहास शाळा, महाविद्यालये, संस्था आणि गुरुद्वारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ लाख २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

थीम साँग, माहितीपटाद्वारे प्रचार-प्रसिध्दी

याशिवाय व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून २०० शाळा जोडण्यात आल्या असून, थीम साँग आणि माहितीपटाद्वारे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येत आहे. चेंबूर, देवनार आणि मानखुर्द येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे.

या शहीदी समागमाच्या निमित्ताने सिख, सिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी सुमारे ३०० वर्षांनंतर एकत्र येणार असून, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दृढ होणार आहे. येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी पश्चिम उपनगरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, सहा.जनसंपर्क अधिकारी बृह्न्मुंबई महानगरपालिका विवेक राठोड, उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगर कल्पना गोडे, तहसिलदार (महसूल) युवराज बांगर, तहसिलदार बोरीवली मुंबई उपनगर इरेश चप्पलवार, शासकीय सदस्य, तहसिलदार अंधेरी स्नेहलता स्वामी, शासकीय सदस्य, नायब तहसिलदार कुर्ला सुनिल कापडनिस निवासी, श्री.मनमोहन सिंग, एव्हर साईन, मालाड, श्री.सुखविंदर सिंग चेंबुरकॅम्प, गुरपिंदर सिंग, गुरू नानक सभा आदिसंह अधिकारी उपस्थित होते.

#हिंद_दी_चादर 

#गुरुतेगबहादूर

Friday, 13 February 2026

हिंद दी चादर कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा – अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील


ठाणे: नवी मुंबई येथील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा 350 वा शहीदी समागम कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रचार, प्रसिद्धी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी दिले.


याबाबत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, तहसिलदार सचिन चौधरी, रेवण लेंभे, संदीप थोरात, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी घनश्याम मेहता, शिक्षण विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी तर दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घ्याव्यात. ग्रामपंचायत तसेच नगरपालिका विभागांनी स्वच्छता मोहीम राबवावी. ग्रामपंचायतींमध्ये लाऊड स्पीकरवरुन यासंदर्भातील गीत वाजवावे. चित्रपटगृहांमधूनही या गीताद्वारे कार्यक्रमाची प्रचार, प्रसिद्धी करावी. प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रचार, प्रसिद्धी करावी. आरोग्य विभागाने शाळांमध्येदेखील आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत.

‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिबीजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीबाबत सर्व विभागांनी नियोजन करुन, त्याची सुरुवात करावी. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही पाटील यांनी सांगितले.
#श्री_गुरु_तेग_बहादूर_साहिबजी
#हिंद_दी_चादर

Friday, 6 February 2026

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील





नांदेड येथे ‘प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संवाद’ यशस्वीपणे संपन्न                                                                                                                                                                                                                                                                        नांदेड :- ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी आणि उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. 

स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकातील नव्या निर्णयांमुळे कृषी, ग्रामीण व डीप टेक क्षेत्रातील नवोपक्रमांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी  सांगितले                                                                                                                                                                                                                                श्री. गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे ‘प्रादेशिक स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त डॉ. पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी श्री. गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक महेश कोकरे यांच्यासह स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटक यांची उपस्थिती होती                                                                                                                                                                                                                                    डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, “महाराष्ट्र स्टार्टअप धोरणाअंतर्गत राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेला सर्वसमावेशक सहाय्य दिले जात आहे. स्टार्टअप परिसंस्था केवळ महानगरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणे हे राज्याचे स्पष्ट धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले. याच अनुषंगाने, स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश करताना केंद्र सरकारने स्टार्टअप मान्यतेची चौकट अधिक सक्षम व भविष्याभिमुख केल्याचे डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले. नव्या अधिसूचनेनुसार स्टार्टअपसाठी उलाढाल मर्यादा २०० कोटीं रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, डीप टेक स्टार्टअपसाठी स्वतंत्र श्रेणी निर्माण करून त्यांची वयोमर्यादा २० वर्षे आणि उलाढाल मर्यादा ३०० कोटी रुपयांपर्यत निश्चित करण्यात आले आहे. तसेच सहकारी संस्थांनाही स्टार्टअप मान्यतेत समाविष्ट करून कृषी, ग्रामीण आणि समुदायाधारित नवोपक्रमांना नवे बळ देण्यात आले आहे. या धोरणामुळे येणाऱ्या काळात गाव समृध्द होणार असून, यासाठी प्रत्येक गावपातळीवरील नवकल्पना देशपातळीवर न्यायची आहे. यासाठी महाविद्यालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे मत डॉ. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.                                                                                                                                                                                                                                                                  तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर 'इनोव्हेशन सिटी' विकसित करण्यात येत असून, ही जगातील एक अद्वितीय संकल्पना ठरणार आहे. स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग आणि गुंतवणूकदार यांना एकाच परिसंस्थेत आणून नवकल्पनांना जागतिक स्तरावर नेण्याचा उद्देश या प्रकल्पातून साध्य होणार आहे.”अशी माहिती यावेळी डॉ. पाटील यांनी दिली. 

संचालक डॉ. महेश कोकरे यांनी सर्वह इन्क्युबेशन फाऊंडेशन (SARVAH Incubation Foundation) बाबत स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित १०,००० चौ. फूटांच्या नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता क्षेत्र (Innovation & Entrepreneurship Space) ची माहिती देण्यात आली. या माध्यमातून नांदेड व मराठवाडा विभागात एक सक्षम स्टार्टअप व नाविन्यपूर्ण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे असे डॉ. कोकरे यांनी सांगितले. 

यावेळी विद्यार्थ्यांनी व स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या नवकल्पनांचे सादरीकरण, थेट संवाद सत्र आणि डेमो स्टॉल्सद्वारे पाहणी करण्यात आली.                                                                                                                                                          हा संवाद कार्यक्रम नाविन्यपूर्ण विकास, प्रादेशिक उद्योजकता आणि युवकांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग असून, नांदेडसारख्या प्रादेशिक शहरांना स्टार्टअप नकाशावर अग्रस्थानी नेण्यास निश्चितच महत्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमाला विद्यार्थी, स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Thursday, 29 January 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती




पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ,  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे,  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,  मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.


प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश आगरवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून  श्रद्धांजली अर्पण केली.

#अजितपवार