Followers
Friday, 26 June 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !
Thursday, 25 June 2026
विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय
Wednesday, 24 June 2026
प्रकाशकांनी 30 जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे
प्रकाशकांनी 30 जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे
- विवरणपत्र दखल न केल्यास दहा हजारांचा दंड
प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 मधील कलम 14(1)(ब) व 14(3) नुसार, वार्षिक विवरणपत्र निर्धारित मुदतीत न भरल्यास संबंधित प्रकाशकावर दंड आकारण्याची तरतूद आहे. पहिल्या चुकीसाठी किमान दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल. मात्र, एकूण दंडाची कमाल मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली असल्याचे प्रेस रजिस्टार जनरल, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांनी 30 जून 2026 पर्यंत ऑनलाइन दाखल करावे. या मुदतीनंतर विवरणपत्र सादर न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल,असेही प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे.
*****
Tuesday, 16 June 2026
मराठवाड्यात पावसाची संमिश्र स्थिती
v धाराशिवमध्ये सर्वाधिक ११२ टक्के पाऊस
v छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची ओढ
v पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरणीची घाई न करण्याचा विद्यापीठाचा सल्ला
लातूर, दिनांक 16 (विमाका) : यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाडा विभागात अतिशय संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यासाठी सरासरी ७१.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात केवळ ४०.७ मिमी (५६.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण पावसाळी हंगामाच्या (जून ते सप्टेंबर) ६७९.५ मिमी सरासरीचा विचार करता, आतापर्यंत केवळ सहा टक्के पाऊस पडला आहे.
धाराशिव जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक दिलासा मिळाला आहे. धाराशिवमध्ये सरासरी ६७.७ मिमी पैकी ७६.३ मिमी (११२.७ टक्के) पाऊस बरसला आहे. बीड जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावली. तिथे ६८.५ मिमी सरासरीच्या तुलनेत ५३.४ मिमी (७८ टक्के) पावसाची नोंद झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे.
लातूर जिल्ह्यात ४४.९ मिमी (६२.२ टक्के), नांदेडमध्ये ४९.० मिमी (५९.१ टक्के), हिंगोलीत ४३.८ मिमी (४८.६ टक्के) आणि परभणीत ३६.३ मिमी (४६.८ टक्के) पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांत पावसाने मोठी दडी मारली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी म्हणजे अवघा १३.२ मिमी (१९.८ टक्के) आणि जालना जिल्ह्यात १९.२ मिमी (२७.२ टक्के) पाऊस झाला आहे.
हवामान अंदाज आणि इशारा
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. १६ आणि १७ जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होऊ शकतो.१८ व १९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असून, पुढील ३ ते ४ दिवसांत कमाल तापमान २ अंश सेल्सिअसने वाढेल. मात्र, विस्तारित अंदाजानुसार १९ ते २५ जून दरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
कृषी विद्यापीठाचा सल्ला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या तज्ज्ञ समितीने सध्याचा पाऊस हा पूर्व-मौसमी असल्याने शेतकऱ्यांना ७५ ते १०० मिमी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. कपाशीसाठी कोरडवाहू वा बागायती प्रकारानुसार वाण निवडावेत. कापूस पिकात तूर, सोयाबीन किंवा मूग, उडीद आंतरपीक पद्धती वापरावी. मर व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास सुडोमोनास फ्ल्युरोसन्स (१० ग्रॅम) किंवा कार्बेंडेझीम (३ ग्रॅम) प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तुरीसाठी रायझोबियम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू आणि ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. भुईमुगासाठी एसबी-११, जेएल-२४, एलजीएन-२ या वाणांचा वापर करून थायरमची बीजप्रक्रिया करावी. मक्याची अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षणासाठी सायॲन्ट्रानिलीप्रोल + थायामिथॉक्झाम (६ मिली प्रति किलो) बीजप्रक्रिया आवर्जून करून पीक व्यवस्थापन करावे.
तर केळी बागेत घड वाढीसाठी ००:५२:३४ (१५ ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी. आंबा बागेत ढगाळ वातावरणामुळे पर्णगूच्छ रोग टाळण्यासाठी रोगनाशकाची फवारणी करावी. नवीन फळबाग लागवडीसाठी (केळी, आंबा, सीताफळ) रोपे केवळ शासकीय नोंदणीकृत रोपटिकेतूनच खरेदी करावीत. वादळी वाऱ्याचा अंदाज लक्षात घेऊन लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार देऊन फळबाग, भाजीपालांचे व्यवस्थापन करावे. तसेच पशुधन व्यवस्थापन करताना अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे जनावरांचा गोठा कोरडा व हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. दुभत्या जनावरांची कास पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवावी. पावसाळ्यात जनावरे उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नयेत, तसेच कोवळा व हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे, असाही कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे.
Monday, 15 June 2026
आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू*
*- 'स्वयं' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*
लातूर,दिनांक (विमाका) : लातूर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी हे ऑनलाईन प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. बार्शी रोडवरील या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. हे अर्ज 'www.swayam.mahaonline.gov.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांनी या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा.
प्रवेशाबाबत अधिक माहिती हवी असल्यास शासनाने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांनी १८०० २६७ ०००७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल विनायक बिरादार यांनी केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत
मुंबई : शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉ. माणिक गुरसाळ यांनी ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या अंध विद्यालयाला भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
डॉ. गुरसाळ यांनी विद्यालयातील विविध वर्गांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी डॉ. गुरसाळ यांना आयएएस परीक्षा कशी असते, त्यासाठी कोणती तयारी करावी लागते यासंदर्भात प्रश्न विचारले. डॉ. गुरसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अत्यंत सहजतेने उत्तरे देत मार्गदर्शन केले व शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या
दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे उपसचिव विष्णुदास घोडके, अवर सचिव साईप्रसाद मुकदाडवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग समाधान इंगळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रूपाली पाटील, व्हिक्टोरिया मेमोरियल अंध महाविद्यालयाच्या प्राचार्या रजनी हिरमेठ; तसेच संस्थेच्या अध्यक्षा मीना देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शतकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेने समाजात शिक्षण आणि स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. सन 1902 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह निवास, भोजन, संगणक प्रशिक्षण, संगीत, क्रीडा आणि विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
मुंबईतील ताडदेव परिसरात असलेल्या या संस्थेने हजारो दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्रंथालय सुविधा; तसेच अन्य विविध कौशल्यविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.
Thursday, 11 June 2026
विकसित महाराष्ट्र - 2047 साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न
विकसित महाराष्ट्र - 2047 साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर
· पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट
· आकांक्षित जिल्हे-तालुक्यांच्या शाश्वत विकासावर विशेष भर
· युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचे नियोजन
नवी दिल्ली, दि. 11: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल व सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या (गव्हर्निंग कौन्सिल) अकराव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा रोड मॅप सादर केला. या बैठकीस केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोककुमार लाहिडी आणि सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकूण सकल देशांतर्गत उत्पन्नात सुमारे 14 टक्के योगदान देणारे महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित होत असल्या तरी सुशिक्षित, कुशल, निरोगी आणि सक्षम नागरिक हीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे. या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र - 2047 हे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले असून 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, 2035 पर्यंत दोन ट्रिलियन आणि 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागांनी 2029-30 पर्यंतच्या कालावधीसाठी कृती आराखडे तयार केले असून शाश्वत विकास उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करण्यावर राज्याचा भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आकांक्षित जिल्ह्यांची संख्या चारवरून दहापर्यंत आणि आकांक्षित तालुक्यांची संख्या 27 वरून 177 पर्यंत वाढविण्यात आली असून या भागांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत व्यापक सुधारणा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 ची सर्वसमावेशक अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले बहुविद्याशाखीय शिक्षण, मल्टिपल एन्ट्री-एक्झिट प्रणाली, कौशल्य आधारित अभ्यासक्रम, इंटर्नशिप तसेच एआय, रोबोटिक्स, डेटा सायन्स आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश करण्यात येत आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात देशातील पहिली जागतिक दर्जाची एज्युसिटी विकसित करण्यात येत असून ती देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षण केंद्र ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्व प्राथमिक शिक्षण मजबूत करण्यासाठी ‘पोषण भी – पढाई भी’, आरंभ, स्मार्ट अंगणवाडी आणि सक्षम अंगणवाडी यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. बालस्नेही शिक्षण वातावरण निर्माण करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर आणि अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण सुरू आहे. शालेय शिक्षणात महाराष्ट्राची परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये प्रचेस्टा -१ कडे वाटचाल सुरू आहे. राज्यात 2 कोटी आठ लाखांपेक्षा अधिक ‘अपार आयडी’ तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणणे, डिजिटल वर्ग, व्यावसायिक शिक्षण तसेच मुली, आदिवासी व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षण सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे.
कौशल्य विकास, स्टार्टअप आणि नवसंशोधनाला चालना
राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून राज्यात 3 लाख 30 हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नवसंशोधन धोरण 2025 अंतर्गत पुढील पाच वर्षांत 1 लाख 25 हजार उद्योजक घडविणे आणि 50 हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एआय, डीप-टेक, फिनटेक आणि शाश्वतता या क्षेत्रांवर विशेष भर दिला जात असून ‘महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी’ विकसित करण्यात येत आहे. तसेच कुशल युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी' ही संस्था स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रात व्यापक विस्तार
आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य कटिबद्ध असून आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार पॅकेजेसची संख्या 2399 पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात 4537 रुग्णालये या योजनांशी संलग्न करण्यात आली आहेत.
शहरी भागांसाठी स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात आले असून 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरू आहे. मेडिसिटी संकल्पनेद्वारे वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तृतीयक आरोग्यसेवा आणि आयुष प्रणाली यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महिला सक्षमीकरणाला गती
महिला सक्षमीकरण हे आर्थिक विकासाचे प्रमुख साधन असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उमेद अभियानाअंतर्गत राज्यात 50 लाख लखपती दिदी झाल्या असून ही संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचा मानस आहे. बचत गटांच्या उत्पादनांसाठी 13 जिल्हास्तरीय उमेद मॉल्स उभारण्यात येत आहेत.
लाडकी बहीण योजनेतर्गत सध्या 1.66 कोटी महिला लाभार्थी असून या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता आणि आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्वसमावेशक विकासावर भर
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून संधी निर्माण करण्यावर राज्याचा भर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 100 नवीन वसतिगृहे उभारण्यात येत असून त्यात २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची व्यवस्था होणार आहे.
प्रशासनात तंत्रज्ञान आणि सुधारणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने 800 हून अधिक नागरिक आणि व्यवसाय सेवांची प्रक्रिया पुनर्रचना केली आहे. महासारथी आणि महाडीबीटी 2.0 द्वारे नागरिक सेवा अधिक सुलभ करण्यात येत आहेत. अर्जातील रकाने आणि कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे. महाराष्ट्र एआय धोरण 2026 अंतर्गत 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि 1.5 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी क्षेत्रासाठी महाअॅग्री-एआय धोरण महाअॅगएक्स आणि महाट्रेस यांसारखे डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
गडचिरोलीसाठी विशेष विकास आराखडा
गडचिरोली जिल्ह्यासाठी नक्षलग्रस्त भागोत्तर विकास कार्ययोजना राबविण्यात येत असून पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. गडचिरोलीला भारतातील पहिले मोठे इंटिग्रेटेड स्टील हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना
‘एक राज्य, एक जागतिक पर्यटन स्थळ’ योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि नाशिक या ठिकाणांचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. राज्यभरात 100 पर्यटन उप-परिपथ विकसित करण्याचे उद्दिष्ट असून धार्मिक, वारसा, जल, बेट आणि अनुभवात्मक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.राज्यात 63.85 लाखांहून अधिक एमएसएमई कार्यरत असून 2.5 कोटींहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतातील एकूण एफडीआयपैकी सुमारे 31 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचे नमूद करून
महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 अंतर्गत 20.3 लाख कोटींच्या गुंतवणुकीची पाइपलाईन तयार झाली आहे. मैत्री प्रणालीद्वारे सिंगल विंडो क्लिअरन्स, वेळेत मंजुरी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्यास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकसित भारत 2047 साठी महाराष्ट्र शासनाची कटिबद्धता व्यक्त करत केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सहकार्याने देशाला समृद्ध, आत्मनिर्भर आणि न्याय्य राष्ट्र बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.
<><><><><><>



.jpg)
.jpg)