Followers

Friday, 6 February 2026

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील





नांदेड येथे ‘प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संवाद’ यशस्वीपणे संपन्न                                                                                                                                                                                                                                                                        नांदेड :- ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी आणि उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. 

स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकातील नव्या निर्णयांमुळे कृषी, ग्रामीण व डीप टेक क्षेत्रातील नवोपक्रमांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी  सांगितले                                                                                                                                                                                                                                श्री. गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे ‘प्रादेशिक स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त डॉ. पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी श्री. गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक महेश कोकरे यांच्यासह स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटक यांची उपस्थिती होती                                                                                                                                                                                                                                    डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, “महाराष्ट्र स्टार्टअप धोरणाअंतर्गत राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेला सर्वसमावेशक सहाय्य दिले जात आहे. स्टार्टअप परिसंस्था केवळ महानगरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणे हे राज्याचे स्पष्ट धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले. याच अनुषंगाने, स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश करताना केंद्र सरकारने स्टार्टअप मान्यतेची चौकट अधिक सक्षम व भविष्याभिमुख केल्याचे डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले. नव्या अधिसूचनेनुसार स्टार्टअपसाठी उलाढाल मर्यादा २०० कोटीं रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, डीप टेक स्टार्टअपसाठी स्वतंत्र श्रेणी निर्माण करून त्यांची वयोमर्यादा २० वर्षे आणि उलाढाल मर्यादा ३०० कोटी रुपयांपर्यत निश्चित करण्यात आले आहे. तसेच सहकारी संस्थांनाही स्टार्टअप मान्यतेत समाविष्ट करून कृषी, ग्रामीण आणि समुदायाधारित नवोपक्रमांना नवे बळ देण्यात आले आहे. या धोरणामुळे येणाऱ्या काळात गाव समृध्द होणार असून, यासाठी प्रत्येक गावपातळीवरील नवकल्पना देशपातळीवर न्यायची आहे. यासाठी महाविद्यालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे मत डॉ. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.                                                                                                                                                                                                                                                                  तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर 'इनोव्हेशन सिटी' विकसित करण्यात येत असून, ही जगातील एक अद्वितीय संकल्पना ठरणार आहे. स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग आणि गुंतवणूकदार यांना एकाच परिसंस्थेत आणून नवकल्पनांना जागतिक स्तरावर नेण्याचा उद्देश या प्रकल्पातून साध्य होणार आहे.”अशी माहिती यावेळी डॉ. पाटील यांनी दिली. 

संचालक डॉ. महेश कोकरे यांनी सर्वह इन्क्युबेशन फाऊंडेशन (SARVAH Incubation Foundation) बाबत स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित १०,००० चौ. फूटांच्या नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता क्षेत्र (Innovation & Entrepreneurship Space) ची माहिती देण्यात आली. या माध्यमातून नांदेड व मराठवाडा विभागात एक सक्षम स्टार्टअप व नाविन्यपूर्ण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे असे डॉ. कोकरे यांनी सांगितले. 

यावेळी विद्यार्थ्यांनी व स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या नवकल्पनांचे सादरीकरण, थेट संवाद सत्र आणि डेमो स्टॉल्सद्वारे पाहणी करण्यात आली.                                                                                                                                                          हा संवाद कार्यक्रम नाविन्यपूर्ण विकास, प्रादेशिक उद्योजकता आणि युवकांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग असून, नांदेडसारख्या प्रादेशिक शहरांना स्टार्टअप नकाशावर अग्रस्थानी नेण्यास निश्चितच महत्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमाला विद्यार्थी, स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Thursday, 29 January 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती




पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ,  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे,  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,  मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.


प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश आगरवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून  श्रद्धांजली अर्पण केली.

#अजितपवार

Wednesday, 28 January 2026

राज्याचे 'खंबीर नेतृत्व', मराठवाड्याचा 'आधारवड' कोसळला!






प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व  हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून राज्याचा गाडा समर्थपणे हाकत. ते राज्याचे नेते होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठवाडा विभागावर त्यांचा विशेष लोभ होता. दादा मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे, पण धाराशिव त्यांचे सासर. त्यामुळे मराठवाड्याचे 'जावई' म्हणून त्यांचा या भागावर जीव होताच, पण बीड जिल्ह्याचे 'पालकमंत्री' म्हणून त्यांनी जिल्ह्याला पितृवत प्रेम दिले.

तखत श्री हजूर अबचलनगर साहिब जी गुरुद्वारातील ती 'अखेरची' भेट

अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २५ जानेवारीला दादा मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर, नांदेडच्या पवित्र भूमीत होते. नांदेड येथील 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'  गुरुद्वारात ते नतमस्तक झाले.  सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पवित्र गुरुद्वारात अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले. 'कडा प्रसाद' ग्रहण केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. दर्शन झाल्यानंतर ते गुरुद्वारा परिसरात थांबले.  'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'जीं चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊन, बाहेर येईपर्यंत दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री महोदय यांनी पवित्र गुरुद्वारातून एकत्रितपणे ऐतिहासिक 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शताब्दी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदानाकडे प्रस्थान केले. राज्याचे नेतृत्व म्हणून ज्येष्ठता आणि पदाचा मान राखण्याची त्यांची ही कृती सर्वांनाच भावली. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सन्मान केला.

 पालकमंत्र्यांचा 'धडाका' आणि 'विक्रमी नोंद '

बीडमध्ये त्यांनी विकासाचा विक्रम रचला होता. १ जानेवारी २०२६ ला वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक केले होते.

केवळ इमारती नाहीत, तर निसर्गाशी नाते जोडत त्यांच्याच उपस्थितीत बीडमध्ये एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याची नोंद 'इंडिया रेकॉर्ड' (India Book of Records) मध्ये झाली. तरुणांवर त्यांचे विशेष प्रेम होते, म्हणूनच खेळाडूंसाठी क्रीडा विभागाचा २५ कोटींचा निधी मंजूर करून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'टर्फ ग्राउंड' बीडकरांना दिले.

 सहकार आणि अर्थाची जोड

प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते असलेल्या दादांनी बीडमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागाच्या भव्य 'सहकार संकुला'चे भूमिपूजन केले. सर्व सहकारी कार्यालये एकाच छताखाली असावीत, हा त्यांचा आग्रह होता. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी बीडच्या विकासाला कधीच निधी कमी पडू दिला नाही. १७ सप्टेंबर २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अहिल्यानगर-बीड’ रेल्वेचे उद्घाटन झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये, ही अर्थमंत्री म्हणून दादांनीच मंजूर केले होते.

हृदयाची काळजी घेणारे 'दादा'

बीड जिल्हा रुग्णालयात 'कार्डियाक कॅथलॅब' देऊन त्यांनी गोरगरिबांच्या हृदयाची सोय केली. दुर्दैवाने, बीडकरांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे हृदय मात्र आज थांबले.

एकीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे सुकाणू समर्थपणे सांभाळणारे 'वित्त व नियोजन मंत्री' आणि दुसरीकडे बीडच्या प्रत्येक प्रश्नावर बारकाईने लक्ष घालणारे 'पालकमंत्री'... अशी दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. धाराशिवचे जावई आणि बीडचे पालक असलेल्या या विकासपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली!

#अजितपवार 

 

- डॉ. श्याम टरके

 सहायक संचालक (माहिती),

 विभागीय माहिती कार्यालय, लातूर.

Saturday, 24 January 2026

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा चरणी नतमस्तक

 


​नांदेड : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नांदेड येथे हजेरी लावली. त्यांनी ऐतिहासिक तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा येथे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे पोहोचले. गुरुद्वारा परिसरात प्रवेश करताच त्यांनी 'बोले सो निहाल'च्या जयघोषात पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से.नि.भाप्रसे) यांची उपस्थिती होती. 

हिंद दी चादर शहीदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 




नांदेड:- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी भाविकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच औषधे, काठ्या, कृत्रिम अवयव व चष्म्यांचे वाटप करण्यात येत असून हजारो नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत आहेत. या शिबिरात श्री गुरु ग्रंथ साहिब सेवा संस्थेच्या गुरु का लंगर डोळ्याचा दवाखानाच्या वतीने भरीव सहभाग देऊन योगदान देत आहेत. 

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रंगमंच परिसरात तसेच इतर दर्शनी भागात, लंगरच्या ठिकाणी स्क्रीनिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासोबतच कार्यक्रमाची लाइव्ह लिंक https://youtube.com/live/Am_ofc2n8ig?feature=share  उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पिण्याचे पाणी व सुरक्षा, लंगरची व्यवस्था यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा शहीदी समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


०००००

हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”

 





मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी

श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम

नांदेड, दि. २४ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरादेवीचे, महंत, सुनील महाराज,बाबुसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोड यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.  सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. 

भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे.


भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान




नांदेड:- असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले. 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला.

विराजमान प्रसंगी गुरुबाणीचे मंगल पठण, अरदास व कीर्तन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गुरुबाणीच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भारावून गेला. भाविकांनी सर्व मर्यादांचे पालन करीत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत गुरुग्रंथ साहिबांना नमन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पाणी व सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.