Followers

Thursday, 9 July 2026

हिंगोली, परभणी, लातूर, नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

 

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

लातूर, दिनांक ०९ (विमाका) : हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये आज (ता.९ जुलै) मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.  मध्यरात्री ०१:३७ वाजता बसलेल्या पहिल्या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. यानंतर पहाटे ०२:१५, ०२:१७ आणि ०३:२३ वाजताही अनुक्रमे ३.६, ३.९ आणि ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली येथे होता.  या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.


नागरिकांना आवाहन

भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी तातडीने घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जावे. दगड-मातीचे कच्चे बांधकाम असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीची आणि सूचनांचीच नोंद घ्यावी, असे आवाहन संबंधित जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

 

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

लातूर ,दिनांक ०७ (‍विमाका) : लातूर विभागातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, हळद आणि अंजीर या १० फळपिकांसाठी ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन २०२६’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत महसूल मंडळ हा घटक धरून लातूर विभागातील जिल्ह्यांमध्ये विमा संरक्षण दिले जाणार असून, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने शेतकऱ्यांना विहित मुदतीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी न होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला घोषणापत्र देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या खात्यातून विम्याचा हप्ता कापला जाणार नाही. अधिसूचित क्षेत्रात स्वतःची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही या योजनेस पात्र आहेत. मात्र, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. योजनेअंतर्गत प्रति शेतकरी किमान क्षेत्र मर्यादा २० गुंठे (०.२० हेक्टर) आणि कमाल क्षेत्र मर्यादा दोन्ही हंगाम मिळून ४ हेक्टरपर्यंत राहील.

लातूर विभागातील जिल्ह्यांसाठी जिल्हा समूह निहाय विमा कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार परभणी, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांसाठी 'भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड' (AICIL), लातूर जिल्ह्यासाठी 'बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' तर हिंगोली जिल्ह्यासाठी 'इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

पीकनिहाय अंतिम मुदत 

मृग बहार २०२६ अंतर्गत संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, द्राक्ष आणि हळद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२६ ही आहे. तर सीताफळ आणि अंजीर या पिकांसाठी शेतकऱ्यांना ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करता येईल.

आवश्यक कागदपत्रे व महत्त्वाच्या अटी 

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, ॲग्रिस्टॅक नोंदणी (Agristak), बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा (७/१२ व ८अ) आणि जिओ टॅग फोटो असणे आवश्यक आहे. तसेच डिजिटल पीक सर्वेक्षण (DCS) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीएससी (CSC) सेतू केंद्रावरून अर्ज करण्यासाठी शासनाने प्रति शेतकरी ४० रुपये सेवा शुल्क निश्चित केले आहे. योजनेत कोणताही गैरप्रकार किंवा बोगस विमा उतरविल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पुढील ५ वर्षांकरिता विमा योजनेच्या लाभापासून वंचित केला जाईल, अशी माहितीही कृषी विभागाने दिली आहे. या योजनेची सविस्तर माहिती www.pmfby.gov.in किंवा www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे.

Wednesday, 8 July 2026

नांदेड शहर व नायगाव मतदारसंघातील वीज पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणार –राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ८ : नांदेड शहर व नायगाव मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, नवीन रोहित्रे बसविणे, जीर्ण तारा बदलणे तसेच नवीन वीज प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून धोकादायक झालेल्या तारा व खराब वितरण पेट्या (डिस्ट्रीब्युशन बॉक्स) बदलण्याचे काम करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.
सदस्य राजेश पवार यांनी नांदेड शहर व नायगाव मतदारसंघातील वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेबाबत चर्चा उपस्थित केली होती.

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, नांदेड शहरातील वीज पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी गेल्या काही वर्षांत विविध कामे करण्यात आली आहेत. शहरात ११० नवीन रोहित्रे बसविण्यात आली असून ६५ एबी स्वीच कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीच्या कामांदरम्यान संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
नांदेड शहरासाठी नवीन ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच विष्णुपुरी परिसरातील वाढत्या विकासाच्या गरजा लक्षात घेऊन नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. त्यानुसार भविष्यात आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, आयटीआय चौक यांसारख्या गर्दीच्या भागांमध्ये अंडरग्राउंड केबलिंगसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. तो अंतिम झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातील. यापूर्वी झालेल्या अंडरग्राउंड केबलिंगच्या कामांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशीही करण्यात येईल, असेही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात फेस रिकग्निशन आणि थंब इम्प्रेशन आधारित उपस्थिती प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामावर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे प्रकार रोखता येतील, असेही त्यांनी नमूद केले.

00000

Tuesday, 7 July 2026

शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट


मुंबई, दि 7 : जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागाचा यामध्ये समावेश आहे. 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

 


या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पूर्वार्धाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.  शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

*******


धाराशिव जिल्ह्यात तीन लाख ८९ हजार २३ शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक आयडीची नोंदणी पूर्ण - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव, दि.७ जुलै (जिमाका):  राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अँग्रीस्टॅक (AgriStack) उपक्रमात धाराशिव जिल्हा सातत्याने उल्लेखनीय प्रगती करत आहे. ७ जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ७७ हजार ४४ खातेदारांपैकी ३ लाख ८९ हजार २३ शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली आहे. धाराशिव जिल्ह्याची एकूण प्रगती ८१.५५ टक्क्यांवर पोहोचली आहे. ६ जुलै रोजी एकाच दिवसात जिल्ह्यात २५ नवीन नोंदणीची भर पडली. तालुकानिहाय पाहता तुळजापूर येथे सर्वाधिक ९,धाराशिव येथे ६,भूम, उमरगा आणि परंडा येथे प्रत्येकी ३,वाशी येथे १ नोंदणी झाली.कळंब आणि लोहारा तालुक्यात त्या दिवशी नवीन नोंदणी झाली नाही.


तालुकानिहाय प्रगतीमध्ये कळंब तालुका ८६.२९ टक्के नोंदणीसह अव्वल असून,त्यापाठोपाठ उमरगा (८५.७१ टक्के),वाशी (८५.०७ टक्के),लोहारा (८३.२६ टक्के), परंडा (८२.६६ टक्के),भूम (८०.२१ टक्के),धाराशिव (७९.५९ टक्के) आणि तुळजापूर (७५.५० टक्के) असा क्रम आहे.

अँग्रीस्टॅक ही देशातील शेती क्षेत्राला डिजिटल बळ देणारी महत्त्वपूर्ण प्रणाली असून,प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र डिजिटल कृषी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार केला जात आहे.या आयडीमुळे शेतकऱ्यांची जमीन,पिके आणि शासकीय योजनांशी संबंधित माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि वेगवान होईल.

भविष्यात पीकविमा,पीक नोंदणी, कृषी अनुदाने, पीक कर्ज,नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई,कृषी सल्ला,विविध शासकीय योजना तसेच शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) यांसारख्या अनेक सेवांसाठी अँग्रीस्टॅक फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हा आयडी तयार करून घेणे ही काळाची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की,ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अँग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही,त्यांनी विलंब न करता जवळच्या कृषी विभाग, ग्रामस्तरीय सुविधा केंद्र किंवा संबंधित नोंदणी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. अँग्रीस्टॅक फार्मर आयडी हा भविष्यातील डिजिटल कृषी व्यवस्थेचा पाया ठरणार असून, शासकीय योजनांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे हा क्रमांक असणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या कृषीविषयक सेवांचा लाभ वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा,यासाठी सर्व शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून या डिजिटल उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा,असेही त्यांनी आवाहन केले.

नांदेड-मुंबई, टनकपूर-नांदेड दरम्यान नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू


-
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवा झेंडा

लातूर, दिनांक ०६ (विमाका): मराठवाड्याच्या रेल्वे संपर्कात आज मोठी भर पडली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज व्हिडिओ कॉन्सनसिंगद्वारे नांदेड-मुंबई आणि टनकपूर-नांदेड या नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या सोहळ्यासोबतच टनकपूर-पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तारही करण्यात आला. या विशेष प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे विचार मांडले आणि जनतेचे अभिनंदन केले.


नांदेड रेल्वे स्थानकांवर उत्साहाचे वातावरण

या  प्रसंगानिमित्त नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड रेल्वे स्थानकावरील सोहळ्याला खासदार अशोकराव चव्हाण, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण आणि खासदार बळवंत वानखेडे उपस्थित होते. विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ राजूरकर, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रद्धा, पर्यटन आणि विकासाला मिळणार चालना

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले, टनकपूर-नांदेड एक्सप्रेसची सुरुवात ही जनतेच्या दीर्घकाळापासूनच्या अपेक्षेची पूर्तता आहे. ही नवीन रेल्वे सेवा उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक मजबूत करेल. नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱ्या भाविकांसाठी ही मोठी सुविधा ठरेल. नांदेड-मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाडा परिसरातील, विशेषतः वाशीम, हिंगोली आणि वसमत येथील प्रवाशांना मुंबईशी अधिक सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे जाळ्यांचे सक्षमीकरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारतीय रेल्वेने केलेल्या प्रगतीचा रेल्वेमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. या कालावधीत ३७,००० किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग टाकले असून रेल्वे जाळ्याचे ९९.६ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारा व सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. बुलेट ट्रेन आणि समर्पित मालवाहतूक मार्ग (Dedicated Freight Corridors) प्रकल्प वेगाने प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे अभिनंदन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नवीन रेल्वे सेवांच्या प्रारंभाबद्दल नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ही सेवा वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी थेट आणि अत्यंत सोयीची ठरेल, असे त्यांनी सांगितले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या गाडीमुळे दोन्ही राज्यांतील श्रद्धा, पर्यटन आणि विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

सामाजिक व आर्थिक विकासाला गती

नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले, या दोन नवीन रेल्वे सेवांमुळे नांदेड आणि मराठवाड्याचा देशातील प्रमुख शहरांशी संपर्क अधिक सुदृढ होईल. महापौर कविता मुळे यांनी ही एक्सप्रेस विद्यार्थी, भाविक आणि व्यावसायिकांसाठी विशेष लाभदायक ठरेल.परिसराच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल, असा विश्वास व्यक्त केला. खासदार डॉ. गोपछडे आणि खासदार चव्हाण यांनीही या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत पर्यटनाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

Monday, 6 July 2026

आळंदी व देहू येथे येणाऱ्या वारकऱ्यांनी पुण्यातच वारीमध्ये सहभागी व्हावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

                      मुंबई, दि. ६ :   इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी, भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे.  देहू व आळंदी येथे न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.



            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. काही वारकरी बांधव पुणे शहरापर्यंत आले असल्यास त्यांनी पुणे शहरातच थांबावे,  असेही आवाहनही मुख्यमंत्र्यांनी  केले आहे.

०००