शेतकऱ्यांसाठी १००% अनुदानावर कडधान्य बियाणे; 'महाडीबीटी'वर अर्ज प्रक्रियेला सुरुवात
- महिला शेतकऱ्यांसाठी ३० टक्के आरक्षण; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
लातूर, दिनांक 11 (विमाका) : खरीप हंगाम २०२६ करिता 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियाना'अंतर्गत शेतकऱ्यांना तूर, मूग आणि उडदाच्या बियाण्यांचे १०० टक्के अनुदानावर वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 'ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी'चा वापर करून 'महाडीबीटी' प्रणालीवर लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांनी केले आहे.
या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पाच वर्षांच्या आतील वाणाचे ४ किलोचे बियाणे आणि त्यासोबत जैविक खताची पाकिटे मोफत दिली जाणार आहेत. या बियाणे संचाचे (Seed Kit) वाटप 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, चालू सन २०२६ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. या निमित्ताने शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने एकूण लाभार्थ्यांपैकी किमान ३० टक्के लाभ महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin किंवा https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा. योजनेबाबत अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, अर्ज प्रक्रियेत किंवा योजनेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment