Followers

Thursday 26 December 2019

महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन





उस्मानाबाद,दि.26,(जिमाका)- महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
      यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वमर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. टिपरसे, तहसिलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे,मंदिर प्रशासनाचे श्री. झंपलवाड, श्री.इंतूले, श्री. गणेश मोटे आदींची उपस्थिती होती.

Friday 13 December 2019

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते होणार उद्घाटन


*स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांची माहिती*

उस्मानाबाद, दि. 13 -
जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेली पन्नास वर्षापासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते  93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. 10 जानेवारी 2020 रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी दिली. उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या सहवासामुळे साहित्यक्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. या संमेलनाची आयोजक मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने जय्यत तयारी सुरु आहे. संमेलनाध्यक्ष पदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे. साहित्य संमेलन अधिकाअधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्फत आखणी सुरू आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना निमंत्रित करण्यात आले होते. उस्मानाबादकरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्घाटन सोहळ्यास येण्याचे मान्य केले आहे.

महानोर यांच्या लेखणीतून साकारलेली अजिंठा, कापूस खोडवा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पळसखेडची गाणी, पक्षांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता, यशवंतराव चव्हाण, रानातल्या कविता, शरद पवार आणि मी, शेती, आत्मनाश व संजीवन ही पुुस्तके वाचकांचा मनाचा ठाव घेतात.

जैत रे जै, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ही गाणी मराठी रसिकजनांच्या ओठी आजही कायम आहेत.

ना. धों. महानोर यांना भारत सरकारने 1991 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.  200 साली त्यांच्या पानझड या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2009 साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

संमेलनात तीन दिवस चालणार्‍या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळू शकणार आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. धों. महानोंर यांच्या निवडीचे आयोजक मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच मराठवाड्यातील साहित्यिक, विविध संस्था, संघटनांनी स्वागत केले आहे.