Followers

Monday 17 September 2018

मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य - पालकमंत्री दिलीप कांबळे





        हिंगोली,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. निजामांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी हा मुक्तीसंग्राम लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह इतर थोर नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेल्याचे ते म्हणाले.
            मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिल्याने अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखंडातून मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेऊन मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषि विषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्याची आवश्यकता असल्याचे ही पालकमंत्री कांबळे यावेळी म्हणाले.
            प्रारंभी पालकमंत्री कांबळे यांनी देवडा नगर येथील उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन केले. यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेतली.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उप जिल्हाधिकारी निवडणूक गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपनिबंधक श्री. मैत्रवार,उपविभागीय व अधिकारी केशव वाबळे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घुबडे पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी - विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment