Followers

Wednesday 10 October 2018

पोलिसांनी नागरिकांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवावी-मुख्यमंत्री देवेंद फडणवीस



औरंगाबाद, दि.10 (जिमाका) :- लोकशाहीत संवादाला अतिशय महत्व असते, त्यावरुन आपल्याबद्दलची प्रतिमा तयार होते, पोलीस ठाण्यात गेल्यास आपणास संरक्षण मिळेल, न्याय मिळेल, गुन्हेगारांना शिक्षा होईल, असा विश्वास सामान्य नागरिकांमध्ये निर्माण करावा असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह उपस्थित होते.
लोकांशी संवाद साधल्याने पोलिसांप्रतीची आत्मियता, आपल्याला पोलिसांकडून न्याय मिळेल हा विश्वास, समाजामध्ये व्यापक प्रमाणात दृढ होण्यास मदत होते.  दाखल गुन्ह्यांतील दोषसिध्दीचे, गुन्हेगारांना योग्य शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी नागरिक, पोलीस तसेच पोलिसांच्या सरकारी वकीलांसोबतचा संवाद महत्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे शासन पोलिसांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्याची माहिती देऊन पोलीस विभागात एक सकारात्मक वातावरण कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहावे, असे सांगून श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, महिलांवरील अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यांना नियंत्रीत करण्यासाठी गुन्हेगार हा अनोळखी आहे की नातेवाईक, परिचयातील आहे या आणि इतर बाबींचे विश्लेषण योग्य पध्दतीने करावे. जेणेकरुन त्याद्वारे योग्य उपाय योजना करुन गुन्ह्यांवर प्रतिबंध घालता येईल. त्याचप्रमाणे दोषसिध्दीचे प्रमाण वाढून गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी सबळ पुरावे, साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण कमी करण्यावर प्रामुख्याने भर देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी. तांत्रिक पुराव्याचा वापर करण्याचे प्रमाण वाढवावे, ज्यामध्ये पुरावा फितुर होण्याची शक्यता नसते. ऑनलाईन तक्रारी नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात नागरिकांना जनजागृती करुन माहिती द्यावी. अधिक सतर्कतेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, गंभीर गुन्ह्यांप्रमाणे निगडीत मोबाईल, दुचाकी चोरी, घरफोडी या घटनांचा तपासही तत्परतेने करुन जनसामान्यांना न्याय द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या.
 पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी औरंगाबाद शहरात महानगर पालिकेद्वारे बसविण्यात आलेल्या 50 सीसीटीव्ही कॅमेराद्वारे 6200 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 30 बॉडी वार्नर कॅमेरे घेण्यात आले असून याद्वारे वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रित करण्यात येत असल्याचे सांगितले. शहरातील बीड बायपास रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी स्पीड गनचा वापर करुन वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित नियमबध्द होण्याच्या दृष्टीने भरीव प्रयत्न करण्यात येत आहे. कम्युनिटींग पोलीस अंतर्गत तरुणांना रोजगाराच्या संधी, महिलांसाठी जागेवर काम देणाऱ्या स्वयंसेवी संस्थासोबतचा प्रकल्प, ऑपरेशन मुस्कान, सेफ सिटी प्रकल्प, यासह विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली.
यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलीस यांनी ऑनलाईन फसवणूकीच्या तक्रारींची नोंद संबंधितांने तात्काळ पोलिसांकडे केल्यास ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, इतर ऑनलाईन विक्री कंपन्यांना पोलीस ॲपद्वारे माहिती देऊन या व्यवहारातील आर्थिक प्रक्रिया थांबविण्यास सांगतात व तक्रारदारांचे होणारे आर्थिक नुकसान टळते. अशाप्रकारचे ॲप विकसित केले असून त्यामार्फत औरंगाबाद ग्रामीणमध्ये ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदारांना आठ लाख रुपये परत मिळवून दिले, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी यावेळी दिली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करुन यापध्दतीची यंत्रणा राज्यातील सर्व पोलीस विभागांनी राबविली पाहिजे असे म्हटले.

No comments:

Post a Comment