Followers

Saturday, 14 September 2024

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद







योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण !

 एकाच छताखाली विविध योजनांची माहिती

धाराशिव : केंद्र, राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कोटला मैदानावर विविध शासकीय विभागांची दालने एकाच छताखाली उभारण्यात आली. दालनाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती नागरिकांनी या ठिकाणी जाणून घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

या दालनांमधून महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जल जीवन मिशन आदी विभागाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती संबंधित नागरिकांना अधिकारी, कर्मचारी यांनी दिली. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, पोषण अभियान, पूरक पोषण आहार, लेक लाडकी आदी योजनांसह विविध योजनांची दालनांमध्ये माहिती देऊन नागरिकांमध्ये योजनांबाबत जागृती करण्यात आली.

महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्याकडून नमो महिला सशक्तीकरण अभियान, गट निर्मिती, फिरता निधी, अर्थसहाय्य, प्रशिक्षण आदींबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महिलांना उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तर माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा माझी परस बाग, आनंददायी शिक्षण, आकांक्षित तालुका असलेल्या परंडा तालुक्याबाबत शिक्षण विभागाच्यावतीने ठरवलेल्या उद्दिष्टांची जागृतीही या ठिकाणी प्रात्यक्षिकांसह करण्यात आली.

लाडक्या बहिणीमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार




धाराशिव : राज्य शासनाचा महिला सशक्ती करणावर भर असून महिलांना सशक्त, आत्मनिर्भर होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण  योजनेअंतर्गत मिळालेल्या रक्कमेमुळे गरीब परिस्थिती असलेल्या महिलांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी  सावंत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन   धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरातील कोटला मैदान येथे करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री लाडकी  बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या निवडक प्रतिक्रिया पुढील प्रमाणे...

लाडक्या बहीण योजनेसाठी लाडके भाऊ मुख्यमंत्री यांचे आभार

    पतीचे निधन झाल्याने कुटुंबाचा आधारच गेला.शिवणकाम करून मी घर चालवते. आर्थिक चणचण कायमच भासते.  परंतु ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये बँक खात्यात आले. हे पैसे  मिळाल्याचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही,असे उदगार आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील 39 वर्षीय कविता युवराज आंधळे यांचे.

 कविता आंधळे म्हणतात माझ्यासारख्या गरीब परिस्थिती असलेल्या महिलांसाठी एक एक रुपयाही खूप मोलाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण  योजनेचे दरमहा 1500 रुपये मिळत असल्याने माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. ही योजना सुरू केल्याबद्दल लाडके भाऊ मुख्यमंत्री यांचे मनापासून आभार.

         तेर येथीलच अलका चंद्रकांत नाईकवाडी या शेतकरी महिला लाभार्थी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे संसाराला आर्थिक हातभार लागत असून योजना  अशीच पुढे चालू ठेवण्याची मागणी केली.

आरोग्याच्या  देखभालीसाठी योजना महत्त्वपूर्ण

 शिराढोण येथील 63 वर्षाच्या रोशन बी इसाक शेख  म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्याने या वयात होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसाठी ही रक्कम खूप उपयोगी पडत आहे.पूर्वी  दवाखान्याच्या खर्चासाठी घरच्यांवर अवलंबून रहावे लागत होते. पण आत्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे घरच्यांवरही आर्थिक ताण येत नाहीय.या रक्कमेतून मी औषधांचा खर्च तर भागवतेच सोबत पौष्टिक फलाहार ही घेते. त्यामुळे  माझे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे.महिलांच्या आरोग्य देखभालीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचे श्रीमती शेख सांगतात.

Thursday, 12 September 2024

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

 


छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेची तथा ध्वजारोहणा संबंधी काळजीपूर्वक नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित विभागास दिले.

 

विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी सिध्दार्थ उद्यान येथे होणाऱ्या मुख्य शासकीय  ध्वजारोहणाच्या नियोजनाबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त (सा.प्र.) जगदिश मिनीयार  तसेच पोलीस विभाग, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, विद्युत विभाग, सामाजिक वनीकरण, अग्निशमन विभाग, सामाजिक वनीकरण, समाज कल्याण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

श्री गावडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी कार्यक्रमस्थळी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर स्वातंत्रसैनिक, लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच ऐनवेळी उपस्थित राहणारे पाहुणे यांची व्यवस्था  तसेच राजशिष्टाचाराप्रमाणे काळजी घेत आसन व्यवस्था करण्याचे निर्देशही श्री. गावडे यांनी संबंधितांना दिले.

Wednesday, 4 September 2024

आठ भाग्यवान लाडक्या बहिणींच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

 




उदगीर,:- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित महिला सशक्तीकरण अभियानात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आठ लाभार्थ्यांचा साडी, गुलाबपुष्प आणि प्रतिकात्मक धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आपला सन्मान होत आहे, हे अविश्वसनीय आहे, अशा भावना लाभार्थींनी व्यक्त केल्या.                     

या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील श्रीमती शिल्पा संतोष राठोड, श्रीमती स्वाती कासले, श्रीमती कल्पना सोनकांबळे, श्रीमती प्रियंका भोसले, श्रीमती प्रियंका जगताप या पाच लाभार्थींना गुलाबपुष्प, साडी आणि प्रतिकात्मक धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.  

तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत श्रीमती नागमणी शिवाजी मलकापूरे यांना दोन मजली घराची प्रतीकात्मक चावी, साडी, गुलाब पुष्प व सुरेखा सुतार यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाअंतर्गत साडे चार लाखांचा प्रतिकात्मक धनादेश, साडी व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी श्रीमती गजराबाई अंधारे यांनाही  यावेळी सन्मानित करण्यात आले.

 आपण स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की, राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात येईल. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, आमचा राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते साडी धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. हे आमच्यासाठी अविश्वसनीय आहे. हे सर्व आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाले आहे. आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार.   

संवाद व संबोधन कार्यक्रम आनंद सोहळा होतो तेंव्हा ... उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, रांगोळी आणि नवी उमेद






            उदगीर, (लातूर):  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबोधनात काय ऐकायला मिळणार मुख्यमंत्री अर्थात लाडक्या बहिणींचा भाऊ नवीन काय संदेश देणार... तर देवेंद्र फडणवीस नवीन काय बोलणार अशा सर्व उत्सुकतांना घेऊन जिल्हाभरातील महिलांच्या उदगीर येथील हजारोंचा समुदाय आज सेलीब्रेशन मूडमध्ये होता. त्यामुळे पोस्टर, बॅनर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी हस्तांदोलन तर कुठे रक्षा बंधन असा एकूणच आनंददायी माहौल उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर होता. त्यामुळे संवाद संबोधनाचा कार्यक्रम आनंद सोहळा झाला होता. 

            या आजच्या कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजनासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, विविधांगी घोषवाक्य प्रत्येकाचा वेगळा ड्रेसकोड आणि महाराष्ट्राच्या वैभवाची सुरेल संगीत मैफील यामुळे आनंद मेळावा आणखी मजेदार झाला.   

या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिला सरपंच पिवळ्या रंगाचे फेटे परिधान करून आल्या होत्या. त्यांच्या हाती राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री महोदयांचे छायाचित्र असलेले फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या फलकांवर विशेषत्वाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांच्या फलकांचा समावेश होता.

आकर्षक व्यासपीठ

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्गावर आकर्षक कमानी उभारण्यात आल्या होत्या. सोबतच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमासाठी मुख्य व्यासपीठ विविध रंगीबेरंगी पुष्पगुच्छांनी सजविण्यात आले होते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आणि विशेषत्वाने देशाला महाराष्ट्राची महिला सशक्तीकरणाच्या योगदानातून नवी ओळख देणाऱ्या रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. तसेच व्यासपीठासमोरील जागेत कृषि विभागाच्यावतीने काढण्यात आलेली बाजरा, भगर आदी विविध धान्यापासून रांगोळी काढून मिलेट वर्ष साजरे करताना नागरिकांनी आपल्या आहारात कडधान्याचा वापर करण्याचा 'मिलेट हट'च्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता.

आशयपूर्ण रांगोळ्या

साधारणत: रांगोळी हा कलात्मक प्रकार त्यातील रंग छटा आणि रेखाचित्रांवर असते. मात्र, आज आनंद मेळाव्यात काढण्यात आलेली रांगोळी आशयघन होती. रांगोळीला काही बोलायचे होते, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व तृणधान्यांचा वापर याचा संदेश या रांगोळीतून दिला जात होता.   

शहरात मान्यवरांचे आकर्षक कटआऊट्स

आजच्या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक नगरी उदगीर शहरात येणाऱ्या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचे लक्षवेधक कटआऊट्स शहरात तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.

मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. संदीपान जगदाळे व सहकारी लातूर, जल्लोष ग्रूप नागपूर आणि येडवे व बिदरकर गुरुजी, सोलापूर यांच्या चमूने उपस्थितांसमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

लातूरच्या आगळ्यावेगळ्या येळवसचे आकर्षक दालन

लातूर-धाराशिव जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘येळवसअर्थात वेळ अमावस्याचे स्वतंत्र दालन स्टेजसमोर  तयार करण्यात आले होते. या दालनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाच्या स्थळी राज्य शासनाच्या कृषी विभाग, रोजगार उद्योजकता व कौशल्य विकास विभाग, समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, जिल्हा आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली होती.  

**** 

आर्थिक पाठबळाने आत्मनिर्भरता आल्याचा महिला लाभार्थ्यांचा सूर

उदगीर(लातूर) , दि. 4 (जिमाका) :- राज्य शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध उपयुक्त योजना राबवीत आहे. यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारी लखपती दिदी योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, लेक लाडकी योजना यासारख्या योजनांद्वारे महिला सक्षमीकरण करण्याला चालना देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीने लाडक्या बहिणींमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भगिनींनी या योजनेमुळे आर्थिक निर्भरता आल्याचा सूर व्यक्त केला . 

या योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच इतर महिलाही त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती घेत स्वतः सक्षम होण्यासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. स्वत:च्या खात्यामध्ये आलेले पैसे आणि त्याचे स्वामित्व स्वत:कडे असणे याबद्दलचा आनंद महिलांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होत होता.  

आज उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य लाभांच्या योजनांच्या लाभार्थी महिला आनंद मेळाव्यात भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शासनाच्या योजनेतून लाभ मिळाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला आहेच, पण त्याचबरोबर आनंद सोहळ्यास स्वतः राष्ट्रपतींनी महिलांना प्रोत्साहित केल्याच्या भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.

त्यातील काही निवडक बोलक्या प्रतिक्रिया

घरातल्या अर्थकारणाला कलाटणी....

श्रीमती रेश्मा युनुस अतार  (रा. कुमटा खु. ता. उदगीर) सध्या बन शेळकी रोड उदगीर येथे तीन मुले व पतीसह किरायाने राहते. रेशमाचे पती रंगकाम करतात. कधी काम मिळते तर कधी नाही. त्यामुळे घर भाडे मुलांच्या शाळेची फी आणि घर खर्च भागवणे अवघड होत होते. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि 15 ऑगस्ट रोजी माझ्या खात्यात तीन हजार रुपये आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आल्याने या पैशाने प्रथम मुलांची थकलेली शाळेची फी भरली. आता दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम माझ्या सारख्या गरिबांसाठी मोठी नसली तरी कमीही नाही. या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून माझ्या घरखर्चाला खूप मोठा आधार मिळाला आहे. माझ्यासारख्या इतर महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी योजना कायम सुरू राहिली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याबाबत शासनाचे आभार.

कुटूंबांला आर्थिक हातभार

उदगीर तालुक्यातील वायगाव येथील मनीषा वाघमारे या ३५ वर्षीय अविवाहित असून त्या आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. परंतु आर्थिक अडचण ही कायमचीच. त्या म्हणतात की, ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यावर आले आणि मला खूप आनंद झाला. या योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक हातभार लागला आहे. या रकमेतून आई-वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च करणे सहाय्यक ठरणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून धन्यवाद.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या रकमेतून मुलाची मागील दोन महिन्यांची फी भरली. त्यामुळे मुलगा रोज मोकळ्या मनाने शाळेत जाऊ लागला. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या योजनेसोबतच राज्य शासनाने मुलांसाठी अधिकच्या शाळा सुरू करण्याची भावना श्रीमती नीता बालाजी डाके, धामणगाव (ता. शिरूर अनंतपाळ) यांनी व्यक्त केली. 

बचत गटाला बळकटी

जळकोट तालुक्यातील सुल्लाळी गावच्या आम्रपाली सोनकांबळे या समता ग्रामसंघ बचत गटात काम करतात. या कामी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून म्हैस व इतर जोडधंद्यांसाठी तीन लाख रुपये तसेच वंचित घटक निधी प्राप्त झाला आहे. त्याचा आरोग्य आणि स्वच्छतेसाठी उपयोग होतो. त्यातच लाडकी बहीण योजनेचा मला लाभ मिळाला आहे. या आर्थिक सहायतेमुळे मी आत्मनिर्भर झाले आहे. याचे श्रेय शासनास असून शासनाचे मनःपूर्वक आभार.  

आत्मनिर्भरतेत आनंद 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 15 ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये खात्यात आले. त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. या रकमेचा उपयोग आम्ही मुलांचे शिक्षण, घर खर्चासाठी करणार आहोत. आता पैशांसाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागत नाहीत. त्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो असून  आम्ही सर्व सहाजणी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलो असल्याचे उदगीर येथील लोणी एमआयडीसीतील श्रीमती शेख मौलन काझी, श्रीमती सोफिया बी मगदूम शेख, श्रीमती शबाना शेख मुस्तफा, श्रीमती इरफानाबी शेख, श्रीमती रबाना शेख हिदायत व श्रीमती संगीता बारसोळे यांनी सांगितले. तसेच ही योजना अशीच पुढे चालू ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन


 






नांदेड : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.

 

यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतीश्री याही उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंगजी, सल्लागार जसवंतसिंग बॉबी, अधिक्षक राज देविंदरसिंगजी, पुजारी बाबा ज्योतिदरसिंगजी जत्थेदार, संत बाबा बलविंदरसिंगजी आदींची उपस्थिती होती.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लंगरला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देवून पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

 

पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलरी व किचन्स, खेळणी व्यवसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यवसायिक समशेरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर

 




राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; सर्व निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची ग्वाही

लातूर : जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पिक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. 

शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुसकान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. हा समारंभ झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोघेही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. २ सप्टेंबर रोजी उदगीर, जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना तातडीने नुकसान भरपाईबाबत आश्वस्त केले.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल. संकट काळात सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. यावेळीही शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला.

अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल. पंचनाम्याचे अहवाल येताच नुकसानभरपाईबाबत पुढील कार्यवाही तातडीने  केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.