Followers

Sunday, 29 March 2026

“डिजिटल परिवर्तनाची दमदार झेप छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचा ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात द्वितीय क्रमांक"

 विशेष लेख       

                                               


छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी ही प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाची ठोस साक्ष ठरली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात या कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयांच्या कार्यपद्धतीचे संकेतस्थळ व्यवस्थापन, ‘आपले सरकार’ सेवा, ई-ऑफिस प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), GIS तंत्रज्ञान तसेच नागरिकांशी संवाद यांसारख्या विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने या सर्वच निकषांमध्ये प्रभावी कामगिरी करत एक आदर्श निर्माण केला आहे.

कार्यालयाच्या संकेतस्थळामध्ये वापरकर्ता सुलभता, जलद पेज लोडिंग, मोबाईल सुसंगतता आणि WCAG 2.0 मानकांनुसार प्रवेशयोग्यता सुनिश्चित करण्यात आली आहे. तसेच NIC मार्फत सुरक्षा ऑडिट करून संकेतस्थळ अधिक सुरक्षित करण्यात आले आहे. नागरिकांना आवश्यक माहिती, आरटीएस सेवा, विविध शासकीय योजना तसेच डॅशबोर्डच्या माध्यमातून कामकाजाची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देत नागरिकांना घरबसल्या सेवा मिळवून देण्यात येत आहेत. तक्रार निवारण वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून अपीलचे प्रमाण अत्यल्प राखण्यात यश मिळाले आहे.

ई-ऑफिस प्रणालीचा वापर करून कार्यालयीन कामकाज पूर्णपणे डिजिटल करण्यात आले आहे. यामुळे फाईल निपटारा कालावधी २०-३० दिवसांवरून ७-१५ दिवसांपर्यंत कमी झाला आहे. डिजिटल स्वाक्षरी आणि ई-साइनचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यात आले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनांचा वापर करून पत्रव्यवहार, नोंदी तयार करणे, डेटा विश्लेषण आणि निर्णय प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यात आली आहे. याचबरोबर AI आधारित शेती उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना डेटा-आधारित मार्गदर्शन देण्याचे कामही करण्यात आले आहे.

नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी WhatsApp Chatbot आणि WhatsApp Channel तयार करण्यात आले असून, त्याद्वारे शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, अर्जाची स्थिती आणि तक्रार निवारण सुलभ करण्यात आले आहे.

GIS तंत्रज्ञानाच्या साहाय्याने १५० हून अधिक स्तर तयार करून प्रशासकीय सीमा, पायाभूत सुविधा, जलपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण सुविधांचे सविस्तर मॅपिंग करण्यात आले आहे. उपग्रह व ड्रोन प्रतिमांच्या मदतीने अचूक डेटा संकलित करून शहरी नियोजन, कर वसुली आणि प्रशासनिक निर्णय प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. PM Gati Shakti प्लॅटफॉर्मशी एकत्रीकरण तसेच ‘UDDAN’ प्रकल्पाद्वारे डिजिटल पत्ता प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

हिंगोली, जालना आणि लातूर जिल्ह्यांमध्येही GIS आधारित उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून ग्रामीण रस्ते, शासकीय जमिनी आणि पायाभूत सुविधांचे मॅपिंग प्रभावीपणे करण्यात आले आहे.

या सर्व उपक्रमांच्या एकत्रित परिणामामुळे कार्यालयीन कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा वितरणामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत ई-गव्हर्नन्स क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा संकल्प या यशातून अधोरेखित झाला आहे.

गणेश फुंदे

सहायक संचालक

विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

Maharashtra DGIPR

No comments:

Post a Comment