Followers

Sunday, 29 March 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान

 


• १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची उत्कृष्ट कामगिरी

 लातूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सन्मान करण्यात आला.

 यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील प्रशासनिक कार्यालयांसाठी १५० दिवसांचा विशेष ई-प्रशासन कृती आराखडा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नागरिकाभिमुख करण्याचा हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

 लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने १ जून २०२५ पासून या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली होती. यामध्ये संकेतस्थळ सुधारणा, सेवा हमी कायदा (आरटीएस), ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि जीआयएस व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबींचा समावेश होता. या सर्व बाबींच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात लातूर जिल्ह्याने २०० पैकी एकूण १७९.२५ गुण प्राप्त करून राज्यातील पहिल्या पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपूर्ण टीमने राबवलेल्या या उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. या सन्मानामुळे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 १५० दिवसांच्या या महत्त्वाकांक्षी ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना विविध सेवा अधिक गतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा कल्पकतेने वापर करून कार्यालयीन कामकाज अधिक अचूक व गतिमान करण्यात आले. या उपक्रमांचे मूल्यमापन होऊन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यातील पहिल्या पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ‘टीम वर्क’मुळे ही कामगिरी शक्य झाली, हा संपूर्ण टीमचा गौरव आहे, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

Maharashtra DGIPR 

CMOMaharashtra 

Collector & District Magistrate, Latur

No comments:

Post a Comment