धाराशिव : "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी आपल्या विचारातून,वाणीतून आणि सर्वोच्च बलिदानातून मानवी समानतेचा संदेश दिला आहे.त्यांच्या ३५० व्या बलिदान पर्वानिमित्त त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात यावे.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदि समागम वर्षानिमित्त जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठकीत श्री.कडवकर बोलत होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.मापारी,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी पी.एम.पारधे,विद्यापीठ उपकेंद्राचे प्रा.रमेश चौगुले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाकाळ, संतोष अडवाणी, प्रदीप रोहीडा, संजय आडवाणी, विस्तार अधिकारी (शिक्षण ) श्रीमती. मैदर्गी, तहसीलदार (महसूल) श्री. प्रकाश व्हटकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
श्री.कडवकर म्हणाले की,जिल्ह्यातील विविध शाळा,माध्यमिक शाळा व महाविद्यालयांनी गावात प्रभात फेरी काढून हिंद दी चादर यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध घोषणा देऊन कार्यक्रमाचे आयोजन करावे.विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व,निबंध व चित्रकला स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात यावे.या सर्व स्पर्धांमधून गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या विचारांचा जागर करण्यात यावा.असे श्री.कडवकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात असलेले सिख,सिकलकर, बंजारा,लबाना, सिंधी,मोहियाल,वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव (वारकरी) या संप्रदाय व समाजातील लोकांशी संपर्क करून नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला जे येण्यास इच्छुक आहे त्यांची यादी गाव पातळीवर ग्रामसेवकांनी तयार करून गटविकास अधिकाऱ्यांमार्फत त्यांना या कार्यक्रमाला नांदेड येथे घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात यावी.नांदेड येथील कार्यक्रमासाठी सेवाभावी वृत्तीने नागरिकांनी लंगरसाठी साहित्य व वस्तु देऊन आपले योगदान द्यावे.तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा.असे श्री कडवकर यावेळी म्हणाले.

No comments:
Post a Comment