Followers

Monday 4 May 2020

नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी खाजगी आस्थापना ठराविक कालावधीतच चालू ठेवण्याचे आदेश - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे


        उस्मानाबाद, दि. 4 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार राज्यामध्ये दि. 4 मे, 2020 पासून दिनांक 17 मे, 2020 पर्यंत  लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या लॉकडाऊन कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (कोविड 19) रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
            उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (कोविड-19) रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील  सर्व  दुध केंद्रे, भाजीपाला केंद्रे व भाजीपाला फिरते विक्रेते, कृषी विषयक बि-बियाणे, खते केंद्रे व कृषी अवजारे, स्पेअर पार्टसची दुकाने व इत्यादी सर्व खाजगी आस्थापना या ठराविक कालावधीतच चालू ठेवणे आवश्यक आहे.
              जिल्हादंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (कोविड-19) रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा  एक भाग उस्मानाबाद जिल्हयातील खालीलप्रमाणे आस्थापना नमुद कालावधीत चालू ठेवण्याबाबत आदेशित करीत आहे.
              1. भाजीपाला, किराणा दुकाने व सर्व आस्थापना सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 8.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत चालू राहतील.
             2. दुध, बि-बियाणे, खते यांची दुकाने संपूर्ण आठवडाभर चालू राहतील.
             3. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये लोकांना बसता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट संपूर्ण आठवडाभर चालू राहतील. त्यामध्ये किचन, होम डिलिव्हरी व पार्सल सेवा चालू राहतील.
            4. पानटपरी व तंबाखू दुकाने बंद राहतील.
            5. अमृततुल्य/चहाची दुकानामध्ये ग्राहकांना बसता येणार नाही. त्यांना युज ॲन्ड थ्रो चे कप वापरता येतील. तसेच पार्सल सेवा देता येईल.
            6. दुकानदारांनी त्यांच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांसह मास्क, स्वच्छ रुमाल, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, गॉगलचा वापर करणे बंधनकारक राहील.
            7. ग्राहकांनी देखील दुकानामध्ये मास्क, स्वच्छ रुमाल,  सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, गॉगलचा वापर करणे बंधनकारक राहील.
           8. दुकानादारांनी त्यांचे दुकानासमोर ग्राहकांची गर्दी होणार नाही. या दृष्टीने बॅराकेडींग करणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांना दुकानाचे काऊन्टरचे बाहेरुनच वस्तूंची डिलिव्हरी देणे बंधनकारक आहे.   
           9. ग्राहकांनी त्यांचे रहिवासाचे क्षेत्रातील दुकानातूनच वस्तुंची खरेदी करावी.
           10. दुकानदारांनी ग्राहकांना आगाऊ मागणी (प्रिबुकींग) करण्यासंदर्भात प्रोत्साहीत करावे व ग्राहकांना होम डिलीव्हरीसाठी प्राधान्य द्यावे.
           11. सर्व आस्थापना सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी 8.00 ते 1.00 या कालावधीत सुरु राहतील. त्यांनी ग्राहकांकडून फोन बुकींग करुन घेवून होम डिलीव्हरी देण्यास प्राधान्य द्यावे.
           12. सर्व प्रकारच्या अत्यावश्यक, अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंच्या पार्सल सेवेला परवानगी  राहील.
           13. सर्व दुकानदार, ग्राहकांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.
           14. औषधी दुकाने 24 तास सुरु राहतील.
           15. केश कर्तनालय, सलूनची  दुकाने बंद राहतील परंतु ते घरी जाऊन सेवा देऊ शकतील.
           16. ई-कॉमर्स, कुरिअर व पार्सल सेवा सुरु राहतील.
           17. बँका, पतसंस्था, सर्व आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था चालु राहतील.
           18. अॅटो, चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी असेल. दुचाकी वाहनांवर एकाच व्यक्तीस प्रवासास परवानगी राहील.
           19. बांधकाम, रस्ते, इतर विकास कामे चालु राहतील. बांधकाम करणाऱ्या व्यक्तींनी बांधकाम सुरु करतेवेळी कामावरील मजुरांच्या यादीसह मुख्याधिकारी, नगरपरिषद, ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांना कळविणे आवश्यक आहे. मजुरांची वैध परवानगी, पासशिवाय आंतरजिल्हा वाहतुक करता येणार नाही.
           20. कोणत्याही व्यक्तीला वैध परवानगी, पासशिवाय जिल्ह्यात येता येणार नाही. जिल्हयात बाहेरील व्यक्ती आली तर नागरिकांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास 02472-225618 या क्रमांकावर कळविणे आवश्यक आहे.
            या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करुन त्याबाबतचा दैनंदिन अहवाल पोलिस उपअधिक्षक (गृह) उस्मानाबाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प.उस्मानाबाद, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद , जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर पालिका प्रशासन जि.का.उस्मानाबाद, सर्व Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, सर्व Incident Commander  तथा तालुका दंडाधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगरपंचायत, सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायत, जिल्हा उस्मानाबाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.
          या आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
             या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 17 मे 2020 पर्यंत  लागू राहील.

                                                       *****

No comments:

Post a Comment