प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे
परीक्षा नियंत्रक,
केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम )
माजी संचालक – श्री गुरु गोबिंद सिंघ जी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड,
भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत की, ज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर जी, हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य, न्याय, करुणा, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असताना, त्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक्षण झाले आहे.
गुरु तेगबहादूर जी : थोडक्यात जीवनपरिचय
१ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेगबहादूर जी हे सहावे शीख गुरु श्री गुरु हरगोबिंद साहेब यांचे ते तेजस्वी पुत्र होते. बालपणापासूनच त्यांच्या जीवनावर अध्यात्म, शौर्य आणि सेवाभावाचे संस्कार कोरले गेले. वेद-उपनिषदे, इस्लामी तसेच भारतीय तत्त्वज्ञानाच्या सखोल चिंतनातून त्यांच्या विचारांना सर्वधर्मसमभाव आणि उदात्त मानवतावादाची दिव्य झळाळी प्राप्त झाली. गुरु तेगबहादूर जी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते एक प्रभावी सामाजिक सुधारक होते. त्या काळात भारतीय समाज जातीय भेदभाव, धार्मिक अत्याचार, अंधश्रद्धा आणि राजकीय दडपशाहीने ग्रासलेला होता. अशा परिस्थितीत त्यांनी समाजाला सत्य, समानता आणि नैतिकतेचा मार्ग दाखवला.
धर्मस्वातंत्र्याचा पुरस्कार
भारतीय इतिहासात मुघल सम्राट औरंगजेब आणि शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर जी, ही दोन व्यक्तिमत्त्वे परस्परविरोधी विचारधारांचे प्रतीक म्हणून समोर येतात. एकीकडे सत्ता, कट्टरता आणि धर्मांतराची सक्ती यांचे प्रतिनिधित्व करणारा औरंगजेब, तर दुसरीकडे धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सत्यासाठी प्राणांची आहुती देणारे गुरु तेगबहादूर जी—या संघर्षातून भारतीय समाजाला नैतिक मूल्यांची नवी दिशा मिळाली.
औरंगजेब (इ.स. १६५८–१७०७) हा मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट होता. तो अत्यंत कुशल प्रशासक आणि पराक्रमी सेनानी असला, तरी त्याची ओळख प्रामुख्याने धार्मिक असहिष्णुता आणि जबरदस्तीच्या धर्मांतर धोरणांमुळे होते. त्याने जिझिया कर पुन्हा लागू केला, अनेक हिंदू मंदिरे पाडली आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला.
त्याच्या कारकिर्दीत विशेषतः काश्मीरमधील हिंदू पंडितांवर अमानुष अत्याचार झाले. धर्मांतर न स्वीकारल्यास कारावास, छळ आणि मृत्यू अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण करण्यात आली. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. काश्मीरमधील पीडित पंडितांनी जेव्हा मदतीसाठी गुरु तेगबहादूर जी यांच्याकडे धाव घेतली, तेव्हा त्यांनी हा प्रश्न केवळ एका समाजाचा न मानता संपूर्ण मानवतेचा प्रश्न म्हणून स्वीकारला. त्यांच्या दृष्टीने धर्म बदलणे ही अंतःकरणाची बाब होती; ती तलवारीच्या धाकाने लादता येत नव्हती. गुरु तेगबहादूर जी यांनी औरंगजेबाच्या अन्यायी धोरणांना उघड आव्हान दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणे हे अधर्माचे लक्षण आहे. औरंगजेबाने गुरुजींना इस्लाम स्वीकारण्याचा आदेश दिला; परंतु गुरु तेगबहादूर जी यांनी तो ठामपणे नाकारला. या नकारामागे हट्ट नव्हता, तर तत्त्वनिष्ठा होती. जर गुरुजी नी स्वतः धर्मांतर स्वीकारले असते, तर लाखो लोकांकडून या अन्यायाला मौनसंमती मिळाली असती. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्याचा मार्ग स्वीकारला. गुरु तेगबहादूर जी यांचे हे सर्वात महान सामाजिक योगदान होय याला धर्मस्वातंत्र्याचे रक्षक असे ही संबोधता येईल . गुरुजी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर मानवी स्वातंत्र्याचे सजग प्रहरी होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव, समता आणि आत्मसन्मान या मूल्यांचा पुरस्कार केला.
त्यांच्या धर्मांतरास उघड विरोधा नंतर इ.स. १६७५ साली दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेगबहादूर जी यांना अमानुष यातना देऊन त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. हे बलिदान कोणत्याही राजकीय सत्तेविरुद्ध नव्हते, तर विचारस्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले महान बलिदान होते. गुरुजींचे बलिदान झाल्या नंतर औरंगजेबाची सत्ता जरी तात्पुरती टिकली, तरी इतिहासाच्या न्यायालयात तो दडपशाहीचा प्रतीक ठरला; तर गुरु तेगबहादूर जी मानवतेचे अमर नायक बनले. म्हणूनच त्यांना “हिंद की चादर” असे गौरवाने संबोधले जाते.
गुरुजींनी केवळ शीख धर्मियांसाठी नव्हे, तर हिंदू धर्मीयांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला. “जर गुरु तेगबहादूर धर्म स्वीकारतील, तर सगळे काश्मिरी पंडित इस्लाम स्वीकारतील” असे औरंगजेबाला सांगण्याचा धैर्यपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय म्हणजे धार्मिक सहिष्णुतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान होते. त्यांच्या या धाडसी व समाज वाचवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाने समाज एकत्र होण्यास बळ मिळाले. धर्मस्वातंत्र्य, मानवी सन्मान आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले हे ऐतिहासिक बलिदान होते. त्यांच्या या बलिदानामुळे भारताच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासाला नवी दिशा मिळाली. त्यांचे पुत्र श्री गुरु गोबिंदसिंग जी यांनी पुढे खालसा पंथाची स्थापना करून अन्यायाविरुद्ध संघटित लढ्याचा मार्ग दाखवला.
मानवाधिकारांचे आद्य पुरस्कर्ते
आज आपण मानवाधिकारांची चर्चा करतो, पण गुरु तेगबहादूर जी यांनी १७व्या शतकातच मानवी हक्कांचा पुरस्कार केला. धर्म मानण्याचा अधिकार, विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार हे मूलभूत मानवी हक्क आहेत, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. त्यांचे बलिदान हे कोणत्याही एका धर्मासाठी नसून संपूर्ण मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी होते.
जातीय भेदभावाविरुद्ध संघर्ष
त्या काळातील भारतीय समाज जातिभेदाच्या खोल दरीत अडकलेला होता. जन्मावर आधारित उच्च-नीचतेच्या कठोर रेषांनी माणसामाणसांत भिंती उभ्या केल्या होत्या. सामाजिक प्रतिष्ठा, धार्मिक अधिकार आणि मानवी सन्मान हे काही मोजक्या वर्गांपुरते सीमित झाले होते. अस्पृश्यता, भेदभाव आणि अन्याय हे समाजजीवनाचे अंग बनले होते. अशा विषम आणि अन्यायी सामाजिक रचनेत मानवी समानतेचा विचार मांडणे हे क्रांतिकारक धैर्याचे लक्षण होते.
याच अंधाऱ्या काळात गुरु तेगबहादूर जी यांनी शीख परंपरेतील “एक ओंकार” या तत्त्वाचा आशय समाजजीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीने ईश्वर एकच असून, त्याची निर्मिती असलेला प्रत्येक मानव समान आहे. जात, धर्म, वर्ण किंवा पंथ यांवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठतेला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांच्या बाणीतून माणसाच्या अंतःकरणातील शुद्धता, आचरणातील नैतिकता आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित होते. सामाजिक समतेचा हा संदेश केवळ उपदेशापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष आचरणातून व्यक्त झाला गुरु तेगबहादूर जी यांनी जातिभेदाच्या जखमांवर करुणेचा लेप लावला आणि समाजाला समतेच्या दिशेने नेण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच त्यांचे कार्य केवळ धार्मिक नव्हते, तर मूलगामी सामाजिक सुधारणा घडवणारे होते. त्यांच्या विचारांनी पुढील पिढ्यांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली.
अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला विरोध
गुरु तेगबहादूर जी यांच्या बाणीत आत्मचिंतनाला विशेष महत्त्व आहे. मनुष्याने प्रथम स्वतःच्या अंतःकरणाचा शोध घ्यावा, इच्छांचे बंधन ओळखावे आणि विवेकाच्या प्रकाशात जीवन जगावे, असा त्यांचा आग्रह होता. वैराग्य म्हणजे संसारापासून पलायन नव्हे, तर संसारात राहूनही आसक्तीवर विजय मिळवणे, हे त्यांनी स्पष्ट केले. संयम, सहनशीलता आणि धैर्य ही खरी साधना असून, संकटांच्या काळातही मन स्थिर ठेवणारा मनुष्यच खरा भक्त आहे, असा त्यांचा संदेश आहे. त्यांच्या मते ईश्वरभक्ती ही केवळ शब्दांत, वेशात किंवा विधींमध्ये व्यक्त होत नाही; ती माणसाच्या आचरणात, व्यवहारात आणि सेवाभावात प्रतिबिंबित झाली पाहिजे. म्हणूनच गुरु तेगबहादूर जी यांची बाणी ही आत्मशुद्धीची आणि मानवी मूल्यांची अमूल्य देणगी ठरते. त्यांनी अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि निरर्थक कर्मकांडांवर कठोर टीका केली. त्यांच्या बाणीत आत्मचिंतन, वैराग्य, संयम आणि ईश्वरभक्तीवर भर दिला आहे.
ते म्हणतात
“तीर्थ फिरौ, अरु दान करौ, अवरु न पूजा जाई।
अंतर की मलु न उतरै, ज्यों धोवै घरु बाहि॥”
त्यांचे म्हणणे होते की, खरी भक्ती ही माणसाच्या आचरणात दिसली पाहिजे, केवळ बाह्य आडंबरात नव्हे.
“काहे रे बन खोजन जाई।
सरब निवासि सदा अलिपतो, तोही संगि समाई॥”
गुरु तेगबहादूर जी यांनी सत्य, करुणा, दया, संयम आणि निर्भयता या नैतिक मूल्यांचा समाजात प्रसार केला. त्यांनी सांगितले की, संकटाच्या काळातही जो मनुष्य विचलित होत नाही, तोच खरा ज्ञानी आहे. त्यांच्या बाणीतून मानसिक स्थैर्य आणि आत्मबळ यांचा संदेश मिळतो. आजचा समाजही विविध प्रकारच्या सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक संघर्षातून जात आहे. अशा वेळी गुरु तेगबहादूर जी यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. धार्मिक सहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवतेचा सन्मान हे मूल्य आजही तितकेच आवश्यक आहेत. गुरु तेगबहादूर जी हे केवळ शीख धर्माचे गुरु नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या ३50 व्या बलिदान दिनानिमित्त आपण त्यांच्या सामाजिक सुधारणा, मानवतावादी विचार आणि निर्भय बलिदानाचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण समाजात न्याय, समता आणि सहिष्णुता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले पाहिजे.गुरु तेगबहादूर जी यांचे बलिदान हे इतिहासातील एक तेजस्वी दीपस्तंभ आहे, जो आजही मानवतेचा मार्ग उजळवत आहे.

No comments:
Post a Comment