Followers

Monday, 29 December 2025

मानसिक आरोग्य कायद्याचा लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव

 



लातूर : ‘मानसिक आजार ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. 'मानसिक आरोग्य कायदा-2017' चा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांचे हक्क जपले पाहिजेत,’ असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांनी केले.

 लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित 'मानसिक आरोग्य आढावा मंडळाच्या' बैठकीत ते बोलत होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शीतल तळीखेडकर, अशासकीय सदस्य आर. बी. जोशी, आर. एम. क्षीरसागर आणि डॉ. सुधीर बनशेळकीकर उपस्थित होते.

 न्या. जाधव म्हणाले, समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. मंडळाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून रुग्णांना न्याय मिळवून द्यावा. यावेळी सदस्य सचिव डॉ. एस. व्ही. ढगे यांनी मंडळाच्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली.

 *स्वतंत्र कक्षाची स्थापना* 

आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात या मंडळासाठी आता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

Thursday, 18 December 2025

अनोखा लातूर पॅटर्न: 'वेळ अमावस्या' -मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव!

 




मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळी लातूरच्या कृषी संस्कृतीला तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात,


*"काळ्या आईची कुशी, पिकं जोमाने डुलती,*

*माझ्या राजाचं हे रान, जणू हिरवं सोनं..."* 


या ओळींचा खरा प्रत्यय लातूरच्या 'वेळ अमावस्येला' येतो. हा केवळ एक सण नाही, तर हा मातीशी नाळ जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण लातूर जिल्हा शेतात असतो, निसर्गाच्या ऋणाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा केला जातो.


येळवस, दर्शवेळ किंवा वेळ अमावस्या अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणाची परंपरा तब्बल सातशे वर्षांची आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा हा भाग पूर्वी निझाम राजवटीत असल्याने येथे कानडी भाषेचा प्रभाव आजही जाणवतो. कानडीत 'वेल्ली' म्हणजे पीक. पिकांची पूजा म्हणून हा शब्द रूढ झाला असावा. तसेच निसर्गाची योग्य 'वेळ' साधणे म्हणजे हा सण होय. एरवी अमावास्या अशुभ मानली जाते, पण लातूरमध्ये ही अमावास्या शेतकऱ्यांसाठी 'पर्वणी' असते. या दिवशी शहरातील घरे बंद असतात आणि शिवार माणसांनी फुलून जाते.


या उत्सवाचे स्वरूप पूर्णपणे निसर्गपूजेचे आहे. शेतकरी शेतात कडब्याची 'कोपी' बांधतात. तिचे तोंड पूर्वेकडे असते, जे समृद्धीचे लक्षण मानले जाते. कोपीमध्ये पाच दगड मांडून त्यांची 'पंचमहाभूते' किंवा 'पांडव' म्हणून पूजा केली जाते. मूर्तीची नाही, तर मातीची आणि उभ्या पिकांची पूजा या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती दिली जाते. शेतात पेटवलेल्या चुलींच्या धुरामुळे पिकांवरील कीड नष्ट होते, तर नैवेद्यासाठी आलेले पक्षी पिकावरील अळ्या वेचतात. म्हणजेच कृषी विज्ञान आणि परंपरेचा हा एक अनोखा संगम आहे.


या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे चविष्ट आणि आरोग्यदायी 'वनभोजन'. बाजरीची भाकरी, अनेक पालेभाज्यांपासून बनलेली पौष्टिक 'भज्जी', ज्वारीच्या पिठाची 'आंबिल' ही या दिवसाची खास मेजवानी असते. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ शरीरासाठी औषधी ठरतात. विशेष म्हणजे या दिवशी सर्व जाती-धर्मातील सर्वजण एकाच पंगतीत जेवतात, यातून सामाजिक समतेचे दर्शन घडते. या सणामुळे बाजारपेठेत कोटींची उलाढाल होते आणि जिल्ह्याचे अर्थचक्र गतिमान होते. 


थोडक्यात सांगायचे तर, वेळ अमावस्या हा केवळ एक सण नसून निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करणारी लातूरकरांची ती एक समृद्ध अशी जगावेगळी जीवनशैली आहे.


-डॉ. श्याम टरके,

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, लातूर.

Wednesday, 17 December 2025

माळेगाव यात्रा : ग्रामीण संस्कृतीची प्रयोगशाळा !


मराठवाडा संतांची, वीरांची भूमी आहे. याच भूमीतील नांदेड जिल्ह्यात माळेगाव आहे. लोहा तालुक्यातील या गावात मोठी यात्रा भरते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. दक्षिण भारतात ही यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. माळेगाव केवळ धार्मिक स्थळ नाही. ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारे मोठे व्यापारी केंद्र आहे. या यात्रेला आजपासून (ता. 18 ते 25 डिसेंबर) सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने या यात्रेवर प्रकाश टाकणारा हा लेख.


















माळेगाव यात्रेला जवळपास चार शतकांची परंपरा आहे. मोगल, निजाम काळापासून या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऐतिहासिक काळापासून माळेगाव घोड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. आजही तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील व्यापारी येथे येतात. या ठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे देखणे, सुंदर असे मंदिर आहे.



माळेगाव यात्रा म्हणजे लोककलांचे माहेरघरच. येथे कलगी-तुरा, वाघ्या-मुरळी, गोंधळ आणि भारूड सादर होतात. तमाशा, लावणी येथील मुख्य आकर्षण असते. नामांकित तमाशा फडांची जुगलबंदी येथे रंगते. तमाशासोबतच 'मौत का कुआँ' सारखे प्रकारही येथे दिसतात.



इतर यात्रांमध्ये प्रामुख्याने फक्त देवदर्शन असते. पण माळेगाव यात्रा वेगळी आहे. येथे कृषी प्रदर्शन आणि कुस्त्यांची दंगल पाहायला मिळते. पशु प्रदर्शन या यात्रेचे हृदय आहे. येथे हजारो जनावरांची खरेदी-विक्री होते. राजस्थानच्या पुष्कर मेळ्यानंतर घोड्यांच्या व्यापारासाठी ही दुसरी मोठी बाजारपेठ आहे. यात्रेत सर्वधर्मीय लोक आनंदाने सहभागी होतात. ही यात्रा म्हणजे उत्तम, असे सामाजिक सलोख्याचे प्रतीकच आहे.




माळेगाव यात्रा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पाच ते सात दिवसांतच येथे कोट्यवधींची उलाढाल होते. चेतक, मारवाडी, पंजाबी अशा उच्च जातीचे घोडे विक्रीला येतात. या घोड्यांची खरेदी-विक्री किंमत चकित करणारी असते. यासह येथे गाढवांचीही मोठी बाजारपेठ भरते. वीटभट्टी व्यावसायिक आणि परराज्यातील व्यापारी येथे गाढवे खरेदी करतात. याशिवाय उंट, बैल, गायी आणि शेळ्या-मेंढ्यांचीही विक्री होते. कृषी अवजारे आणि खाद्यपदार्थांचीही मोठी उलाढाल होते.






अडचणीच्या काळात ही यात्रा शेतकऱ्याला आधार देते. पशुधन विकून आलेला पैसा शेतीसाठी वापरला जातो. यात्रेत शेतकऱ्यांना नवीन बियाणे आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तसेच यात्रेतून स्थानिक मजुरांना रोजगार मिळतो. पूर्वी यात्रेत कृषी विषयक वस्तूंची देवाण-घेवाण (Barter System) होत असे. आता रोखीने आणि 'युपीआय'द्वारे (Online) व्यवहार होतात. पूर्वी बैलगाडीतून येणारे भाविक चारचाकी गाड्यांमधून येतात.

 




माळेगावची ही यात्रा केवळ उत्सव नाही. ती ग्रामीण संस्कृतीची एक प्रयोगशाळा आहे. आधुनिकीकरणाच्या काळातही यात्रेने आपली ओळख जपली आहे. हजारो हातांना काम देणारी ही यात्रा खऱ्या अर्थाने 'वैभवशाली' अशीच आहे.

-          डॉ. श्याम टरके,

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, लातूर