Followers

Sunday, 23 February 2025

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे




 राजधानीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भावपूर्ण समारोप

दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येणार – अजित पवार

संस्कृतीची वाहक असलेल्या भाषेची निगा राखणे सर्वांचे कर्तव्य – डॉ. भवाळकर

 

नवी दिल्लीदि.23 : भाषा ही आपली ओळखअस्मिताआणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले. मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईलअशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली.

राजधानीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत गेले तीन दिवस सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सायंकाळी झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमराठी भाषामंत्री उदय सामंतसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकरलोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डाडॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबेकार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळेकोषाध्यक्ष प्रकाश पागेनिमंत्रक संजय नहारशैलेश पगारियायुवराज शहा यांच्यासह साहित्य महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

जे जे मराठीते ते जोपासण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी  - श्री.शिंदे

मराठीला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून यासाठी साहित्यिकविचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न व्हायला हवेतअशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणालेराज्याच्या कारभारात मराठीचा वाढता वापर होत आहे. सर्वसामान्यांच्या व्यवहार व शिक्षणात मराठीचा वापर वाढण्याची गरज आहे. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावे मराठी अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपये दिले असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. राज्य सरकारने राज्यातल्या ग्रंथालयांना अनुदान वाढवून दिले आहे. नवलेखकांकडून कथाकादंबरीकवित या सर्वच क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यामधून वर्तमानाचा वेध घेवून आजच्या पिढीचे प्रश्न मांडण्याचे धाडस केले जात आहे. या लेखकांच्या साहित्याची दखल घेण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे. मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन केले जावेअशी सूचना करतानाच रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठासाठी पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही श्री. शिंदे म्हणाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीतील विविध साहित्यप्रवाहांचा संगम आहे. महाराष्ट्राच्या भूमीत संतांनी भक्ती संप्रदाय निर्माण केलातरवीरांनी शक्ती संप्रदाय निर्माण केला. विविध लोककलांनी मराठी भाषा समृद्ध होत गेली. आता मराठी भाषेच्या अभिजातपणाचा सूर्य उगवलेला आहेत्याचा प्रकाश सर्वत्र पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मराठीचा वेलू गगनावरी नेण्यासाठी जे जे मराठीते ते जोपासण्याची भूमिका सर्वांनी घ्यावीअसे आवाहन करून श्री. शिंदे म्हणालेमराठी संस्कृती जपण्यासाठी आपण टोकाचे आग्रही असले पाहिजे. विविध घटकांच्या एकत्रिकरणातून मराठी संस्कृती आणि समाज तयार होतो. तो टिकविण्यासोबतच वाढविला पाहिजे. दोन वर्षांनी 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. येत्या दोन वर्षात मराठी भाषेने गरुड झेप घ्यावीमराठी ही आईज्ञानेश्वर माऊलीछत्रपती शिवरायछत्रपती संभाजी महाराजबहिणाबाईमहात्मा फुलेलोकमान्य टिळकडॉ.बाबासाहेब आंबेडकरस्वातंत्र्यवीर सावरकर अशी सर्वांचीच भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत झालेले हे संमेलन दीर्घकाळ स्मरणात राहीलअसे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू - उपमुख्यमंत्री पवार

मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईलअशी घोषणा करून उपमुख्यमंत्री पवार म्हणालेमहाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीला साजेशा अशा या वास्तूसाठी आगामी अर्थसंकल्पात शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देईल. राज्य शासन अतिशय चांगल्या भावनेने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मदत करत असते ही बाब लक्षात ठेऊन साहित्यिकांनी स्वाभिमानाने साहित्यनिर्मिती करावी. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत काही उणीवा असतील तर त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. मराठी ज्ञानभाषा व्हावीमराठीची उपयुक्तता वाढावीती बहुजात आणि बहुज्ञात व्हावीयासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मराठी भाषेच्या संवर्धनासाठीप्रसारासाठी शासन निधी कमी पडू देणार नाहीतसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहीलअसेही श्री पवार यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले. विठ्ठल भक्तांचा मेळा दरवर्षी पंढरीत जमतो. त्याचप्रमाणेसंमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी साहित्यिकांचा मेळा साहित्य पंढरी निर्माण करतो. भक्तिभावसमाधान आणि नवीन ऊर्जा या दोन्ही पंढरीचे विशेष गुणधर्म असून साहित्य संमेलनातून मिळणाऱ्या उर्जेतून नवे साहित्य निर्माण व्हावे. साहित्यिकांच्या लेखणीत समाजाला जागृत करण्याचीयोग्य दिशा देण्याची  क्षमता असते. तिचा वापर सकारात्मक बदलासाठी व्हावा. नवोदित लेखकांना गुणवत्तेनुसार संधी देण्याची भूमिका प्रथितयश साहित्यिकांनी घ्यावी. तसेच साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मराठी भाषिक तरुणांचा सहभाग वाढायला हवाअशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.

सध्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढी समोर आला आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्यिकही होते. तुळापूरवढूला त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात  कुसुमाग्रज अध्यासन लवकरच सुरू होत असल्याची माहिती देऊन मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणालेसाहित्याचा खरा संस्कार या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले चाकावरचे साहित्य संमेलन हा अनोखा उपक्रम असून यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त अशा यात्री संमेलनाचे नियमित आयोजन व्हावे. त्यास शासनाकडून मदत केली जाईल. मराठी भाषेचा मंत्री म्हणून या विभागाचा कार्यभार सांभाळताना आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून  मराठीच्या विकासासाठी निष्ठेने प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले. देशाच्या राजधानीत मराठीचा जल्लोष होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री दर्डा म्हणालेमराठी वाचन संस्कृती जगवण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे. लोकांची वाचनाची आवड भागविण्यासाठी ग्रंथ विक्रीस प्रोत्साहन द्यावे. नव्या पिढीकडून मातृभाषेचा वापर वाढवण्यासाठी शिक्षणात मराठीचा आग्रहाने अंर्तभाव करणे आवश्यक आहे.

मराठी शाळांच्या सुधारणांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्याभाषा ही संस्कृतीची वाहक असते. तिची निगा राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. चांगले ठराव झाले. ते प्रत्यक्ष आले पाहिजेत. सीमा भागात त्या त्या भाषिकांची संख्या लक्षात घेऊन द्वैभाषिक शाळा सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दुय्यम स्तरावरची मराठी शिकवली जाते. त्यात सुधारणा व्हावी. परदेशी भाषांप्रमाणेच भारतातील इतर भाषा शिकण्याची सोय हवी. शासनाने त्यासाठी कृतिशील पावले उचलावीत. मराठी भाषा वाढण्यासाठी घराघरातील मुले मराठीत शिकली पाहिजेत याची सर्वांनी काळजी घ्यावी. ज्ञान क्षेत्र जर समृद्ध करायचे असेल तर ज्ञानाप्रती तळमळआस पाहिजे. तसा समाज ज्ञानसंपन्न होतो. सीमा प्रदेशात संस्कृतीचे अभिसरण घडत असते. भूतां परस्परे जडोमैत्र जीवांचेही संत ज्ञानेश्वरांची उक्ती आत्मसात करत आपण स्नेहप्रेम वाढवूयाअशा शब्दात त्यांनी आपल्या भावपूर्ण भाषणाचा समारोप केला.

रिद्धपूर येथे स्थापित मराठी विद्यापीठात नियमित कामकाज तातडीने सुरू व्हावेत्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद व्हावीबृहनमहाराष्ट्रातील संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावेबोलीभाषांच्या संवर्धनासाठी बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी आदी बारा ठराव यावेळी करण्यात आले.

Friday, 21 February 2025

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 








 # राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात

#  स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – फडणवीस

 #  संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी -  तारा भवाळकर

नवी दिल्ली  : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री Narendra Modi  यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित  करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे,  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे , कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार  आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणाले, मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे.   1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.  या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी 'माझ्या मराठाचि बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके' असे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे, असेही श्री मोदी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी  वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. वेदापासून विवेकानंदांपर्यंत  नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे. संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली.  मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणाले, मराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहे, सौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेत, समानता आणि समरसता आहे, मराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे. शक्ती, भक्ती आणि युक्तीदेखील आहे. देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. आधुनिक युगात ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे.


गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले. स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, वीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली. मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली. या साहित्याने देशप्रेमाचा जागर केला, जनतेला नवी ऊर्जा दिली. अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, मराठी साहित्याने समाजातील वंचित, शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले. मराठी भाषेने  समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत  विज्ञानही मांडले. महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले.


देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणाले, भाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देते, विकासाशी जोडते,  भेद करीत नाही. भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे. मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले. अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतीतील  उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले. भाषांनी स्वत: सोबत इतरांना समृद्ध केले. हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे. 

मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेल, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, साहित्य समजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य संमेलन, साहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे.  मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावे, युवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.  

शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा आग्रह आणि अभिमान – फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसी, ऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये  मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी  दिल्ली जिंकणार आहे. विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होते, आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा  होऊन, लोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली.  संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली.  कला, साहित्य, संस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतात, त्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी -  भवाळकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ.तारा भवाळकर म्हणाल्या, मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जीवंत रहाते. महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली  असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते.  या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी - पवार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री.पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री. मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, संत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला  समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान  अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहे, ते परस्पराला पूरक आहेत असेही श्री.पवार म्हणाले. 


श्री.नहार म्हणाले, दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेखणी आणि ग्रंथालयाचे महत्व पोहोचविणारे आहे. पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे होणारे उद्घाटन राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या सकारात्मक भूमिकेची पायाभरणी करणारे हे संमेलन आहे.


प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.   मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमिका अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर ,  विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.   

Wednesday, 19 February 2025

भारताच्या राजधानीतील मराठी साहित्यिक (विशेष लेख)

 


९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१,२२ आणि २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा.शरद पवार आहेत. या संमेलनाचे औचित्य साधून दिल्लीतील मराठी साहित्यिकांवर टाकण्यात आलेला प्रकाश.             

मराठीतील प्रसिद्ध कवी व गीतकार राजा बढे यांनी ‘दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा’ असे म्हटले आहे. उद्योग, राजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात अनेकांनी दिल्लीत आपले वर्चस्व निर्माण केले. सतराव्या - अठराव्या शतकात मराठी सैनिकांनी देखील दिल्लीत पराक्रम गाजवला. साहित्याच्या बाबतीत दिल्लीतही दारिद्रय नाही. हे दिल्लीतील साहित्य‍िकांचा परिचय करून घेतल्यानंतर लक्षात येते. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व सरहद, पुणे यांच्यावतीने आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी माणूस व संस्कृती याचा परिचय संपूर्ण जगाला होईल; हे सत्य नाकारता येत नाही. राजधानीत ४० ते ५० वर्षापासून स्थायिक असलेले काही लेखक मराठी साहित्य व संस्कृतीची सेवा करताना दिसतात. अगदी एकविसाव्या शतकातील काहीजण मराठीत समर्थपणे लेखन करीत आहेत. त्यांच्या लेखनकार्याचा धांडोळा घ्यावा, हे या लेखामागचे  प्रयोजन आहे.

            प्रस्तुत लेखाच्या सुरुवातीला मिरजकर कुटुंबाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रा. निशिकांत मिरजकर यांनी दिल्ली विद्यापीठात तुलनात्मक भारतीय साहित्य आणि मराठी साहित्याचे ३० वर्षे अध्यापन केले. विद्यापीठ अनुदान आयोग, लोकसेवा आयोग, ज्ञानपीठ पुरस्कार व केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यासारख्या अतिशय महत्त्वाच्या संस्थेवर मिरजकर यांनी सल्लागार म्हणून काम केले. विद्यापीठाच्या अनेक शैक्षणिक प्रशासकीय पदावर मिरजकर कार्यरत होते. संत साहित्य, भारतीय साहित्य आणि तुलनात्मक साहित्य अशा विविध विषयावर त्यांची २० ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यापैकी अकरा ग्रंथ मराठीत लिहिलेली आहेत. तसेच हिंदी व इंग्रजी भाषेतही त्यांचे लेखन आहे. संत नामदेव व तुलनात्मक साहित्यावर महाराष्ट्रातील विविध चर्चासत्रात त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.

              निशिकांत मिरजकर यांचे श्री नामदेव दर्शन, श्री नामदेव : चरित्र काव्य आणि कार्य, नामदेवांची अभंगवाणी, नव्या वाटा नवी वळणे, साहित्य : रंग आणि अंतरंग असे महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित आहेत. संत नामदेव हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. कारण संत नामदेव हे मराठीतील पहिले कीर्तनकार, प्रवचनकार, पद्यात्मक आत्मकथन व चरित्र लिहिणारे तसेच शिष्याची समाधी बांधणारे मराठीतील पहिले संत. वारकरी संप्रदायाचा भारतात प्रचार आणि प्रसार करणारे पहिले राष्ट्रीय संत होते. अभंग हा रचनाप्रकार यादवकाळात संत नामदेवांनी समृद्ध केलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीत संत नामदेवांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. या दृष्टिकोनातून प्रा.मिरजकर यांचे चिंतन लक्षात घेण्यासारखे आहे. निशिकांत मिरजकर यांची पत्नी प्रा.ललिता मिरजकर या देखील नामांकित अशा दिल्ली विद्यापीठातील  आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य या विभागात मराठी आणि तैलानिक साहित्याच्या प्राध्यापक होत्या. यांनी श्रीधरांची कथाकाव्य, मला काय त्याचे, समग्र सावरकर इत्यादी ग्रंथाचे लेखन व संपादन केले आहे.

              दिल्लीतील अतिशय महत्त्वाच्या लेखिका व समीक्षक म्हणजे अर्चना मिरजकर या होत. यांचे पूर्ण शिक्षण दिल्लीत इंग्रजी माध्यमात झालेले असले तरी मराठी माणूस, भाषा, साहित्य व संस्कृती याविषयीची कृतज्ञता आपल्या लेखन व वाणीच्या माध्यमातून सतत त्या व्यक्त करतात. अर्चना मिरजकर या कॅनडाच्या दुतावासात वरिष्ठ माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून मागच्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अमेरिकन व ब्रिटिश दूतावासासाठी काम केलेले आहे. राजदुतांची भाषणे लिहिणे, भारत व विदेश संबंध या संदर्भात भारतीय प्रसार माध्यमाला माहिती देणे हे काम त्या करतात. टाइम्स ऑफ इंडिया व द हिंदू यांसारख्या प्रतिष्ठित दैनिकांत त्यांनी काम केले आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की, प्रशासकीय क्षेत्रात कामाचा व्याप खूप असतो. यातून साहित्यासाठी वेळ काढणे, हे म्हणावे तितके सोपे नसते. परंतु घरात असलेला मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा व अर्चना मिरजकर यांची जिद्द, तळमळ, साहित्यावर असलेली निष्ठा यामुळे हे सर्व शक्य झाले आहे.

            अर्चना मिरजकर यांची नऊ ते दहा ग्रंथ प्रकाशित आहेत. स्वयंसिद्ध, ग्रंथयात्रा, नदीकाठी, वाळवंटी, शकुंतला, मातीची माणसे इत्यादी. कथा, नाटक आणि दीर्घकथा त्यांनी लिहिल्या असून हॅलो कोण ? हे त्यांचे नाटक ई-साहित्याच्या वेबसाईटवर प्रकाशित आहे. स्वयंसिध्दा हा ग्रंथ महाभारतातील स्त्रियांवर आधारित असून यात प्रेरणादायी अशा कथा आहेत. सदरील ग्रंथाविषयी अर्चना मिरजकर यांचे वडील प्रा.निशिकांत मिरजकर लिहितात, अत्यंत प्रभावी व्यक्तीचित्रण, नाट्यात्मक प्रसंग लेखन आणि सुंदर निसर्गचित्रे यामुळे या कथा वाचनीय बनले आहेत. अर्चना मिरजकर यांची भाषा इतकी ओघवती आहे की, एखादी कथा वाचायला घेतली की ती पूर्ण वाचल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे हे पुस्तक अत्यंत रंजक आणि चोखंदळ वाचकांनी आपल्या संग्रही ठेवण्यासारखे आहे.

            अर्चना मिरजकर या यूट्यूब चॅनलवर ग्रंथयात्रा ही मालिका चालवतात. जवळपास १०० पेक्षा अधिक मराठी ग्रंथांचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे. हे सर्व व्हिडिओ मराठी भाषेबरोबरच इंग्रजीतही आहेत. प्रत्येक मराठी ग्रंथांचा परिचय दोन भाषेत करून देणे, हा भारतातील पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. परंतु त्यासाठी दोन्ही भाषेवर प्रभुत्व असावे लागते. मराठी कलाकृतीचा परिचय विदेशातील लोकांना व्हावा म्हणून त्यांनी इंग्रजीत ग्रंथांचा परिचय करून दिला. मराठीतील १०२ पुस्तकांवर मराठीत १०२ व इंग्रजीत १०२ असे एकूण २०४ व्हिडिओ त्यांनी तयार केलेले आहेत. यात संत साहित्यापासून ते आधुनिक साहित्यापर्यंतच्या सर्व अजरामर ग्रंथांचा समावेश आहे. एखाद्या ग्रंथाचा परिचय वस्तूनिष्ठपणे कसा करून द्यावा, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून ग्रंथयात्रा या मालिकेकडे पाहता येईल. इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असतानाही अर्चना मिरजकर यांचे पाय जमिनीवर आहेत. याला निश्चितच मराठी संत व संस्कृती कारणीभूत असावी. ‘मातीसाठी रे लढावं. मातीसाठी रे मरावं. बेटा माती लई थोर. त्याला कसं ईसराव’ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या या ओळीची प्रचिती मिरजकर कुटुंबाच्या बाबतीत येतो. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीविषयीचा सार्थ अभिमान अर्चना मिरजकर या कृतीच्या माध्यमातून सतत व्यक्त करतात.

            आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी माणसाला परिचित असलेले अतिशय महत्त्वाचे लेखक म्हणजे डॉ.ज्ञानेश्वर मुळे हे होत. आंतरराष्ट्रीय मराठी मंचच्या माध्यमातून मराठी भाषा व साहित्य विश्वात सगळीकडे कशा पद्धतीने पोहोचता येईल? याचा प्रयत्न ते सातत्याने करीत असतात. मराठी माध्यमात पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (आयएफएस) म्हणून त्यांनी उत्तमपणे कार्य केले. ते विदेश मंत्रालयात सचिव देखील होते. रशियातील मास्को व जपानच्या दुतावासात प्रथम सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले. एक वैचारिक अभ्यासक, समीक्षक, कवी व आत्मकथाकार म्हणून ज्ञानेश्वर मुळे यांचे मराठीतील योगदान कोणालाही नाकारता येत नाही.

             ज्ञानेश्वर मुळे यांचा माती पंख आणि आकाश हे आत्मकथन सर्व वाचकापर्यंत पोहोचले. विदेशातील कार्य व प्रवास हे या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी ग्रामीण भागातील मातीत त्यांची जडणघडण झाली. असे हे लेखक आपल्या प्रयत्नाच्या बळावर आकाशाला गवसणी घालतात. माणूस आणि मुक्काम, ग्यानबाची मेक व नोकरशाहीचे रंग हे त्यांचे मराठीतील लेख संग्रह प्रकाशित आहेत. दूर राहिला गाव, रस्ताच वेगळा धरला, स्वतःतील अवकाश इत्यादी कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. साप्ताहिक साधना याबरोबरच मराठीतील अनेक दैनिकातून त्यांचे असंख्य लेख प्रकाशित झालेले आहेत. आरती प्रभू यांच्या कविता समजून घेणे तितके सोपं नाही, परंतु नक्षत्राचे देणे या कवितासंग्रहावरील साधनांमध्ये प्रकाशित झालेला त्यांचा लेख चिंतनाचा प्रत्यय आणून देतो. ज्ञानेश्वर मुळे यांनी विलोभ या ग्रंथाचे संपादन केले. यात मराठीतील कविता त्यांनी संग्रहित केले आहेत. विशेष करून या ग्रंथातील कवी व कवयित्री या दिल्लीत स्थायिक असलेले आहेत. ज्ञानेश्वर मुळे यांनी कामाचा व्याप स्वतःहून वाढवून घेतलेला आहे. मराठी, माणूस, भाषा व साहित्य सातासमुद्रापार गेले पाहिजे. यातच ते खरा आनंद शोधताना दिसतात. आपल्या कामाचा आवाका ते बोलण्यातून वागण्यातून कुठेही जाणवू देत नाहीत. ते एक शांत, संयमी व संवेदनशील असे हे सृर्जनात्मक लेखक आहेत.

             राजधानीतील मराठी साहित्यात हेमा देवरे व काही प्रमाणात सुधीर देवरे यांचे लेखन तितकेच महत्त्वाचे आहे. हेमा देवरे यांनी विश्व विदेश सेवेचे, राजनीतीच्या हिंदोळ्यावर आणि वितळलेले ढग हे तीन महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. सुधीर देवरे हे प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. काही काळ विदेश मंत्रालयात सचिव पदावर तर इंडोनेशियात भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना शिष्यवृत्ती देऊन आमंत्रित केले होते. जर्मनी, साऊथ कोरिया, ब्रह्मदेश, वाशिंग्टन, मास्को आणि युक्रेन इत्यादी अनेक देशात सुधीर देवरे प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. त्यामुळे हेमा देवरे यांनी विदेशात विविध क्षेत्रातील अनुभव घेतलेला होता. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण होते. त्यातून या ग्रंथाची निर्मिती झाली. या संपूर्ण अनुभवावर आधारित विश्वविदेश सेवेचे हा ग्रंथ वाचकांना नवीन माहिती देऊन जातो. सुधीर देवरे यांचे देखील राजकीय, सामाजिक व आर्थिक विषयांवर लेख प्रकाशित आहेत.

             दैनिक सकाळचे सल्लागार संपादक, ब्लॉगर व पत्रकार विजय नाईक मागच्या ५५ वर्षापासून दिल्लीमध्ये स्थायिक आहेत. विजय नाईक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत. दक्षिण आफ्रिका व अमेरिका या देशात भ्रमंती करून त्यांनी लेखन केले. इ.स. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात युद्ध वार्ताहर म्हणून, श्रीलंकेतील तमिळ वाघ व कारगिल आदी युद्धात त्यांनी निर्भीडपणे वार्तांकन केले. पंतप्रधान व राष्ट्रपतीसह इतर वेगवेगळ्या निमित्ताने ५२ देशात प्रवास करून वार्तांकंनाचे काम विजय नाईक यांनी अतिशय प्रामाणिक, निर्भीडपणे व निष्ठेने केले. त्यामुळे दिल्ली दरबारी मराठी पत्रकारात यांना विशेष स्थान आहे. मंडेलाच्या देशात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, शिष्टाईचे इंद्रधनु, हवा-हवाई , शी जिनपिंग, साऊथ ब्लॉक नवी दिल्ली इत्यादी वैचारिक ग्रंथांबरोबरच त्रिकोण कादंबरी त्यांची प्रकाशित आहे. नैना ही या कादंबरीतील नायिका असून तिच्या संघर्षावर लेखकाने प्रभावीपणे कादंबरीच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. एकंदरीत राजकारणातील स्पर्धा व अंतर्गत हेवेदावे, राष्ट्रवाद, राजकीय धोरण व अंमलबजावणी इत्यादी असंख्य अशा प्रासंगिक विषयावर अभ्यासपूर्णपणे व संशोधनात्मक पातळीवर विजय नाईक यांनी लेखणी चालविली.

               दिल्लीतील सांस्कृतिक चळवळीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या म्हणजे निवेदिता मदाने - वैशंपायन. या माध्यम समन्वयक, अनुवादक आणि मुक्त पत्रकार आहेत. बालसाहित्यातील दोन पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला. त्यांची बालसाहित्याची पाच द्विभाषिक पुस्तके प्रकाशित आहेत. बृहन्‍महाराष्ट्राच्या आमची दिल्ली, दिल्ली मराठी प्रतिष्ठान व सार्वजनिक उत्सव अशा वेगवेगळ्या समितीत त्यांचा आत्मीयतेने पुढाकार राहत असतो. महाराष्ट्रातील विविध दैनिकांतून मराठी माणूस व संस्कृती याविषयी त्यांनी सातत्याने लेखन केले. दिल्ली डायरी या सदरात ते प्रासंगिक लेखन करतात. मराठी जगत नावाचा त्यांचा सदर दैनिक लोकसत्तामध्ये चालू होता. दिल्लीमध्ये मराठी भाषा व संस्कृती संदर्भात जे काही कार्यक्रम होतात ते रंगमंचावरील नाटक, मराठी चित्रपट, मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अशा अनेक कार्यक्रमांच्या बातम्या ते अतिशय तळमळीने देत असतात. मराठी साहित्यिकांच्या अनेक मुलाखती त्यांनी घेतलेले आहेत. एकंदरीत मराठी साहित्य व संस्कृतीविषयी त्यांचं नातं अतिशय घट्ट आहे. हे दिल्लीत राहूनही त्यांनी कमी होऊ दिलं नाही. आपल्या भाषेची अस्मिता आपणच जपली पाहिजे. ही त्यांची धडपड जागोजागी लक्षात येते. मराठी संस्कृतीशी एकजीव होणाऱ्या वैशंपायन विविध पातळीवर अतिशय कौतुकास्पद कार्य करीत आहेत.

             दिल्लीत मराठी माणूस व साहित्यिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमाने बांधून ठेवण्याचं काम जीवन तळेगावकर सातत्याने करतात. तळेगावकर दूरसंचार व्यवस्थापन क्षेत्रात गुरुग्राम येथे कार्यरत आहेत. जागतिकीकरणाच्या प्रतीक्षेत मराठी हा कवितासंग्रह आणि साठवणीतील महात्मा हा वैचारिक ग्रंथ त्यांचा प्रकाशित आहे. ते नॅशनल बुक ट्रस्टचे लेखक व अनुवादक आहेत. अक्षरनामा वेबपोर्टलवर तसेच दैनिक सकाळमधून अनेक ग्रंथाचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे. दिल्लीत जोश प्रकाशन संस्था ते चालवतात. सार्वजनिक गणेशोत्सव समिती गुरुग्रामचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. मराठी भाषिकांना प्रेरणा व ऊर्जा मिळावी या नि:स्वार्थ भावनेने जीवन तळेगावकर राजधानीत काम करीत आहेत.

             नयना सहस्त्रबुध्दे या सुद्धा दिल्लीतील एक महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांचा स्त्रीभान हा ग्रंथ्र इ.स. २०२० मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. हा ग्रंथ ललित प्रकारात येतो. भारतीय स्त्री शक्ती व स्त्रीवाद या अनुषंगाने त्यांचे लेखन आहे. ब्लॉग लेखन, वैचारिक लेखन याबरोबर काही ग्रंथाचे संपादन देखील त्यांनी केले आहे. सुचेता अभ्यंकर या सुद्धा एक महत्त्वाच्या कवयित्री आहेत. उत्तम गायिका, खट्टा मिठा हा ब्लॉग चालविणाऱ्या लेखिका म्हणून त्यांचा परिचय आहे. अमलताश आणि अपराजिता हे दोन महत्त्वाचे मराठीतील त्यांचे कवितासंग्रह आहेत.

             दिल्लीतील सह्याद्री मराठी सोसायटीमध्ये एक ग्रंथालय सुरू करून समर्थपणे काम करणाऱ्या एक चळवळीतील लेखिका म्हणजे प्रांजली लेले. या दयानंद आर्य या शाळेत ग्रंथपाल आहेत. तसेच सोसायटीतील लहान-लहान मुलांना ग्रंथालयातील ग्रंथ वाचता यावे, त्यांना मराठी साहित्य विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्या सतत धडपडत असतात. त्यांच्या या सोसायटीत ४० ते ५० महाराष्ट्रातील लोकांची घरं आहेत. माझे पान शोपीझन, आम्ही साहित्यिक, मराठी कविता समूह व अक्षरधन इत्यादी अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रांजली लेले यांचे साहित्य प्रकाशित आहे. अनेक समीक्षणात्मक लेख व कथा यांच्या विविध डिजिटल माध्यमातून प्रकाशित झालेले आहेत. सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील सण व उत्सव अतिशय आनंदाने त्या साजरा करीत असतात.

         ऋचा मायी जवळपास २५ वर्ष दिल्लीत वकील म्हणून स्थायिक होत्या. ब्लॉगवर जवळपास ६०० पेक्षा अधिक त्यांच्या कथा प्रकाशित आहेत. ५० कविताही त्यांनी लिहिल्या. फेसबुकवरती त्या सातत्याने लेखन करतात. 'ऋचामाई वर्डप्रेस' यावर त्यांचे लेख व लघुकथा वाचता येतील. अल्पाक्षररमणीयता हे त्यांच्या कथेचे बलस्थान आहे.

राजन हर्षे देखील अनेक वर्ष दिल्लीत प्रशासकीय, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात कार्यरत होते. देश-विदेशात त्यांनी भ्रमंती केली. ‘पक्षी उन्हाचा साथ विद्यापीठांच्या आवारात’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित आहे. विविध विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी या ग्रंथातून मांडले. मातृभाषा मराठी आणि महाराष्ट्र या विषयावर साधनांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित आहेत. काही वर्षे दिल्लीत साउथ एशियन यूनिवर्सिटीमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर होते. तिथेच त्यांना संकल्प गुर्जर नावाचा विद्यार्थी लाभला. संकल्प गुर्जर यांनी देखील या विद्यापीठात संशोधनाचे काम करताना असंख्य अभ्यासपूर्ण लेख लिहिले. विविध लेखांचे अनुवाद व मुलाखती त्यांच्या साप्ताहिक साधनांमधून प्रकाशित झालेले आहेत. संकल्प गुर्जर यांची 'हिरवे पान : पत्रे' हा ग्रंथ प्रकाशित आहे. त्यांनी सार्क विद्यापीठातील दिवस या ग्रंथाचे संपादन देखील केले. हा ग्रंथ साधना प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाला. भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान व श्रीलंका या आठ सदस्य राष्ट्रांची विद्यापीठ सार्क म्हणजेच दिल्ली येथे असलेले दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होय. विद्यापीठात आठ देशातील विविध भाषेतील विद्यार्थी शिकण्यासाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या समोरील समस्या व त्यातून ते काढत असलेले मार्ग, अनुभव याचे सर्व वर्णन प्रस्तुत ग्रंथात आले आहे.

            याशिवाय स्मिता देशमुख यांचा काव्यसरिता हा कवितासंग्रह तितकाच अनमोल आहे. प्रमोद खाडीलकर हे आयआयटी दिल्ली येथे प्राध्यापक असून नाटकाची निर्मिती प्रक्रिया हा त्यांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. निलेश कुलकर्णी हे व्यवस्थापन पदवीधर असून त्यांची स्वतःची कंपनी आहे. ते सुद्धा कवी-लेखक आहेत. अंजू कांबळे यांनी देखील विविध विषयांवर लेखन केले. डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी विलोभ नावाच्या संपादित कवितासंग्रहात दिल्ली येथील अठरा कवी कवयित्रींच्या कविता प्रकाशित केल्या आहेत. त्यात काही मराठी कवी व कवित्रींचा समावेश आहे. तसेच मराठी साहित्य व संस्कृती याचा विस्तार झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या श्रीमती शशी कुलकर्णी यांची धडपड खरंच अंतर्मुख करणारी आहे.

             दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले एकविसाव्या शतकातील अतिशय महत्त्वाचे लेखक, तरुण अभ्यासक म्हणून प्रा.शरद बाविस्कर यांची ख्याती आहे. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथे फ्रेंच विषयाचे प्राध्यापक असले तरी मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. इ.स. २०२१ साली त्यांचा भुरा हा आत्मकथन प्रकाशित झाला. मराठी समीक्षक व वाचकांनी या आत्मकथनाची विशेष नोंद घेतली. अनेक महत्त्वाचे पुरस्कार या ग्रंथाला मिळाले. दहावीत इंग्रजी विषयात नापास झालेला एक शेतकऱ्याचा मुलगा जिद्द व चिकाटीच्या बळावर फ्रेंच भाषा शिकतो. प्रदेशात जाऊन शिक्षण घेतो व भारतातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे काम करतो. हा प्रवास म्हणावा तितका सोपा नाही. शिक्षण, समाज, जीवनातील संघर्ष व आधुनिकता इत्यादी अनेक विषयावर भुरा या आत्मकथनातून लेखकाने सहजपणे भाष्य केले आहे. जानेवारी २०२५ पासून दैनिक लोकसत्तामध्ये प्रा.शरद बाविस्कर पाश्चिमात्य तत्त्वज्ञानावर आधारित मराठीत सदर चालवीत आहेत. वाचन व चिंतनाची सखोलता, खंडण-मंडणात्मकता, आशय व अभिव्यक्ती या दृष्टिकोनातून त्यांचे लेख वाचकांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत.

             मराठी साहित्य व संस्कृतीच्या जडणघडणीत दिल्लीतील मराठी संस्था ज्यात दिल्ली मराठी प्रतिष्ठान, महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज, बृहन्‍महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र सांस्कृतिक समिती तसेच उपनगरातील गुरुग्राम, नोएडा, फरीदाबाद व गाजियाबाद येथील मराठी संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीतील मराठी भाषिक आषाढी एकादशीला अंतर लांब असल्यामुळे देहू, आळंदी व पंढरपूर येथे प्रत्येक वर्षी जाऊ शकत नाहीत. म्हणून दिल्ली मराठी प्रतिष्ठानने सांकेतिक वारीला सुरुवात केली. एक दिवस हे सगळे वारकरी, विठ्ठल भक्त एकत्र जमतात. महाराष्ट्रापासून दूर असले तरी वारकरी संप्रदायाशी त्यांचे नाते अतूट आहे. गुढीपाडवा, गणपती उत्सव व दिवाळी पहाट या माध्यमातून मराठीतील भावगीत, अभंग व महाराष्ट्र संस्कृतीचा जागर या प्रतिष्ठानच्यावतीने घातला जात आहे. यात प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांचा खूप मोठा वाटा आहे. दिल्ली येथील विविध माध्यमांमध्ये काम करणारे महाराष्ट्रातील अनेक पत्रकार आहेत. ज्यांनी वैचारिक स्वरूपाचे लेखन मोठ्या प्रमाणात केले आहे.

              दिल्लीत स्थायिक झालेले अनेक लोक भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आलेले असले तरी ते हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर ते अधिक करतात. कारण इथे विदेशातील विविध क्षेत्रातील लोक देखील कार्यरत आहेत. विशेष करून हिंदी भाषिक अनेक राज्य दिल्लीच्या सभोवताली असल्यामुळे दैनंदिन व्यवहारात हिंदीचा वापर अधिक केला जातो. अशाही परिस्थितीत मराठी साहित्यिक माय मराठी विषयी आपल्या लेखनाद्वारे सतत ऋण व्यक्त करतात. अजूनही त्यांचे नाते मराठी भाषा व संस्कृतीची घट्ट जोडलेले आहे. हे खरचं कौतुकास्पद म्हणावे लागेल. तीन महिन्यापूर्वी मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे निश्चितच हे संमेलन मराठी भाषिक व दिल्लीतील मराठी माणूस व साहित्यिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे ठरेल.-         

म.ई.तंगावार

उदगीर जि.लातूर (महाराष्ट्र)

भ्र.९८९००६५६९०

ईमेल : metangawar@gmail.com

संकलन : विभागीय माहिती कार्यालय, लातूर

लातूर जिल्ह्यातील बालसाहित्य (विशेष लेख)


लातूर जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची ओळख करुन द्यावयाची झाली तर या जिल्ह्यातील बाललेखकांची, कवींची लेखनी सकस आणि समृद्धच आहे. मराठी, कानडी, तेलगू आणि दखनी भाषेचा वावर या जिल्ह्यात आहे. तीन राज्याच्या सीमा असल्याने या परिसरातील बोली भाषेचा गोडवा बालसाहित्य लेखनात उमटलेला दिसतो. दिल्लीच्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त बालासाहित्यावर प्रकाश टाकणारा हा लेख. 

मुलांसाठी अक्षरांचे सेतू बांधणं खूपच कठीण असते. साहित्याच्या प्रांगणात विविध वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या लेखकांची संख्या खूप असली तरी बालसाहित्य लेखन करणाऱ्या लेखकांची संख्या खूप कमी आहे. बालकांचे बालविश्व घडविण्यासाठींचे लेखन करणे तितके सोपे नसते. मुलांसाठी अक्षरांचे सेतू बांधणं खूपच कठीण काम असते. लेखक वयाने मोठा असला तरी बालसाहित्य लेखन करतांना बालकांचे बालमन होऊनच पालकांच्या बालमनांशी नाते जोडण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करावा लागतो. तेव्हाच ते लेखन अजरामर टिकून राहते. हसऱ्या, वाढत्या वयात फुलपाखरांसोबत आनंदाने खेळणारी मुले खूपच कल्पक आणि अनुकरण करणारी असतात. पुस्तकांच्या पानांवरचे रंगीत चित्र बालकांच्या मनाला खुणवत असतात. म्हणूनच चित्रांचे जग त्यांना खूप आवडते.

आपल्या अवतीभोवती, घरातील परिसरातील सजीव असो, की निर्जीव ते आपल्या नाजूक पापणीतून न्याहळत असतात. प्रत्येक वस्तूंचे नवल त्याला वाटू लागते आणि कोवळ्या बोटांनी त्या पकडण्याचा आणि तोंडात टाकण्याचा प्रयत्न करत असतात. तर गालातल्या गालात हसतात आकाशातला चंद्र जरी दूर असला तरी त्याच्याकडे पाहत आपलंसं करुन घेतात. आजी आजोबांच्य गोष्टीत रममाण होऊन पुस्तकांची रंगीत पाने चाळत, पानावरील गोष्टीत मिसळून जातात. अशातूनच बालकांच्या बालमनाची जडण-घडण होत जाते. बालवयात झालेले संस्कार हे दीर्घकाळ टिकणारे असतात. राष्ट्रप्रेम, निसर्ग प्रेम, मित्र प्रेम, परोपकार, पशुप्राण्यांवरील प्रेम, विज्ञाननिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता, अशा अनेक मुल्यांची पेरणी याच वयात नीटपणे करता येते. मनोरंजनातून प्रबोधन करत मुलांचे भावविश्व घडविण्याचा आणि फुलवण्याचा प्रयत्न आपल्या लेखनीतून बालसाहित्यिकच करु शकतात. आणि मग ही मुले कथा, कवितेला बोबड्या बोलीतून सूर लावत ठेका धरुन जमेल, तसे नाचू लागतात.

झुक झुक झुक झुक अगीनगाडी | धुरांच्या रेषा हवेत काढी |

पळती झाडे पाहूया | मामाच्या गावाला जावूया || ’’

ही बालकविता असो किंवा चिऊताईच घरटं,चांदोमामा चांदोमामा, फुलपाखरु, येरे येरे पावसा, नाच रे मोरा, वासुदेव आला, चल गं सई, नंदीबैल, धरतीची आम्ही लेकरं, जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, अशा शेकडो कविता आजही मुलं गुणगुणायला लागतात. अमरेंद्र गाडगीळ, सुधाकर प्रभू, भा.रा. भागवत, लीलावती भागवत, सरिता पत्की, राजा मंगळवेढेकर, यदुनाथ थत्ते, पंढरीनाथ रेगे, सुमती पायगावकर, साने गुरुजी, ना.धो.ताम्हणकर, प्र.के. अत्रे, विं. दा. करंदीकर, वि.वा. शिरवाडकर, लीला दिक्षीत, बालकवी मंगेश पाडगावकर, महावीर जोंधळे ते अगदी अलीकडे ल.म. कडू, विजया वाड, एकनाथ आव्हाड, सुरेश सावंत पर्यंत अनकानेक सकस लेखकांनी बालसाहित्याचे दालन यथाशक्ती सुंदर सजवलेलं आहे.लातूर जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची ओळख करुन द्यावयाची झाली तर या जिल्ह्यातील बाललेखकांची, कवींची लेखनी सकस आणि समृद्धच आहे. मराठी, कानडी, तेलगू आणि दखनी भाषेचा वावर या जिल्ह्यात आहे. तीन राज्याच्या सीमा असल्याने या परिसरातील बोली भाषेचा गोडवा बालसाहित्य लेखनात उमटलेला दिसतो. गुरंढोरं, शेतीमाती आणि आपल्या संस्कृतीशी इमान राखत राबणाऱ्या हातातून पिकलेले आणि बहरलेले कष्टांचे मळे येथील बालसाहित्यिकांच्या लेखनीला बळ देणारे नक्कीच आहेत. श्री. दि. इनामदार यांची जन्मभूमी ही लातूरच आहे. बालकवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. लातूर जिल्ह्यातील खामगाव (खाडगाव) येथे निजामाच्या राजवटील शिक्षण पूर्ण केले. त्यांची घरी पाळलेल्या बैलावरची कविता बालभारतीच्या शालेय पुस्तकात होती.

तुझ्या शेतात राबुन माझी सरली हयात

नको करु हेटाळणी आता उतार वयात

नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर

नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर

        श्री. दि. इनामदार यांनी चांदोबा येरे ये, झुक झुक गाडी, फूल फुलता राहिना, नभ मातीच्या कुशीत, हे माय मातृभूमी इ. बालकवितासंग्रह प्रकाशित केलेले आहेत. अजबगाणी, डरॉव डरॉव, बागडणारी गाणी, अक्षरगाणी, धम्माल गाणी, आगळ्यावेगळ्या कविता, मजेचे थेंब, डिंग डाँग डिंग प्राण्यांची गाणी, एक टाळी गाण्याची, गाणी वेचू चला… ही त्यांची गाजलेली बालगीतांची संपदा आहे.

बालसाहित्य लेखनातला हा मोहरा लातूर जिह्याच्या मातीतून उगवला. दिल्ली येथे झालेल्या भारतीय बालशिक्षा परिषदेच्या संमेलनात मराठी भाषेतील वैशिष्टयेपूर्ण बालवाङ्मयाच्या लेखनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. विनोदी शैलीतून कविता सादर करत मुलांचे मने जिंकणारे विनय अपसिंगेकर यांची ढगांचा गाव, ढगांची शाळा, कोल्ह्याचा दवाखाना बालकवितासंग्रह प्रकाशित आहेत.

रमेश चिल्ले यांचे निळे तळे, गोष्टी आजोबांच्या, येरे येरे पावसा, फुगा गेला फुटुन (बालकविता), भारत सातपुते यांचे नागू वेडा कसा ? (बालकादंबरी) वृषाली पाटील पैशांचं झाड (बालकविता), विश्वनाथ मुडपे अंबारी, आटोळा (बाल कविता) मुडपे यांची कविता बालमनोभावाचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणारी आहे. मुलांच्या अवती भोवतीचं जग समजावं, मनोरंजनाबरोबर मुलांवर संस्कार व्हावे  या उद्देशाने अत्यंत साध्या सोप्या शब्दातून लयबद्धतेने त्यांच्या कविता वाचताना दिसून येतात.

रामदास केदार यांचा बन्याची शाळा (कथासंग्रह ) गंप्या गुराखी (बालकादंबरी), चिमणी चिमणी खोपा दे (बालकथा) कपाटातील पुस्तक (बालकविता) डोळयात दाटले पाणी, शामची आई कवितेतून बालसाहित्य वाटा आणि वळणे (समीक्षा ग्रंथ) प्रकाशित झालेला आहे. परभणी आकाशवाणी केंद्रावरुन बालमंडळ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 52 बालसाहित्यिकांची ओळख त्यांनी करुन दिलेली आहे.

विलास सिंदगीकर पाठ्यपुस्तकातील कवी आहेत. ढगा ढगा धाव रे, पाऊसझडी, आनंदगाणी, अमृतधारा (बालकविता) राज्य शासन पुरस्कारप्राप्त कवी असून ग्रामीण कथाकार म्हणून महाराष्ट्रात मोठी ओळख त्यांची आहे. संजय ऐलवाड यांचे पिंटुची आकाशवारी, भित्रा थेंब, बिबट्याचे पिल्‌लू (बालकथा) मुलाफुलांची गाणी (बालकविता), वारूळ (बालकादंबरी) प्रकाशित झाले असून पुणे येथे केसरी वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करतात. बालकांच्या मानसिकतेचा विचार करुन अर्थगर्भीत आणि चेतनायुक्त कविता संजय ऐलवाड यांच्या आहेत. दत्तप्रसाद झवतर जंगलाची शाळा,  पळा रे पळा देवा मला पाव (बालकविता), निवृत्ती शिंदे जाईन सदैव पुढेच,  वाघोबांची शाळा (बालकविता), नागनाथ कलवले झोपडी,  भास्कर बडे आंजीमाय (बालकादंबरी),  प्रकाश घादगीने नक्कल पडली महाग, गोप्याची दोस्त मंडळी(बालकथा) श्रीराम गुंदेकर ढगांची तहान,  रसुल पठाण निसर्गाशी जुळवू नाते (बाल कविता) सुबोध, सरळ भाषाशैली, कृतीयुक्त शब्द रचना अर्थपूर्ण आशय आणि सामर्थ्य प्रसन्नता रसुल पठाण यांच्या कवितेला लाभलेली दिसते.

धनंजय गुडसुरकर चिवचिवाट (बालकविता),  बाबा आमटे यांच्या जीवनावर शालेय मुलांसाठी 150 हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. बालाजी बिरादार कावळ्याची शाळा (बालकविता) नंदकुमार बालुरे माय (बालकादंबरी), अनंत कदम अ. आईचे (बालकविता) प्रकाशित असून वाचक संवाद ही चळवळ सातत्याने ते  घेतात.  त्यांचा वाचक संवाद हा कार्यक्रम दखलपात्र ठरणारा आहे.

डॉ. हंसराज वैद्य पक्षांची झाली फुले,  राजाई (बालकविता) लोहारा ही जन्मभूमी असून नांदेड येथे व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. त्यांची काही बालगीते प्रसिद्ध गायकांनी स्वरबद्ध केलेली आहेत. अंकुश सिंदगीकर हसरी फुलं (बालकथा), सुगंध माझ्या मातीचा(बालकविता), मुरहारी कराड चांदोबाच्या घरी, नव्या जगातील मुले (बालकविता), अनिता येलमटे घे भरारी असे साहित्य आहेत. स्मिता मेहकरकर स्वच्छतेचे पाईकआम्ही (बालकविता) प्रकाशित असून मनोरंजन आणि परिवर्तन यांचा सुरेख संगम करून प्रसाद युक्त आणि ओजस्वीतेने काव्याला स्मिता मेहकरकर यांनी फुलविले आहे. शंकर बोईनवाड यांचा चिवचिव चिमणी कोल्हेवाडीचा बाजार (बालकाव्य) प्रकाशित झालेली आहेत.

ऋषीकेश गुजलवार येरे येरे पावसा (बालकविता) प्रतीक्षा लोहकरे वडील समजून घेताना (बालकविता), ताजोद्यीन पठाण शाळेतील दिवस (बालकादंबरी), चंद्रदीप नादरगे पानाफुलांच्या दुनियेत, बालमित्र हे बालकविता संग्रह इत्यादी साहित्यिक लेखन करतात.

बालकांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावा, त्यांची मने प्रज्वलित व्हावी. उद्याचा उत्तम युवा नागरिक बनावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मनोरंजनातून प्रबोधन कसे करता येईल ? मुलांच्या मनात वाचनाची गोडी कशी निर्माण होईल, म्हणून या जिल्ह्यात बालकांसाठी काही सांस्कृतिक चळवळी निर्माण झाल्या. 1990 पूर्वी उदगीर येथील विद्यावर्धिनी विद्यालयात नि.म.वडगावकर यांनी बालकुमार साहित्य संमेलन दत्ता ससे यांच्या अध्यक्षतेखाली घेतले. यावेळी बाबा भांड, महावीर जोंधळे, भालचंद्र देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. तर बालकांसाठी श्यामलाल विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालेचे अधिवेशन घेण्यात आले. चंद्रशेखर धर्माधिकारी या अधिवेशनाचे उद्घाटक होते. 2001 ला रमेश चिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे बालकुमार साहित्य प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. शाळेत जाऊन कविसंमेलनाचा उपक्रम राबविला गेला. या प्रतिष्ठानांतर्गत बालसाहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुण्याची शाखा रामदास केदार यांच्या अध्यक्षतेखाली उदगीरात स्थापन झाली. या संस्थेंतर्गत लाल बहादूर शास्त्री विद्यालयात विभागीय मराठी बालकुमार साहित्य  संमेलन घेण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष स्वाती राजे, प्रसाद अक्कानूर, तत्कालीन राज्यमंत्री संजय बनसोडे तर समारोप कवीवर्य इंद्रजीत भालेराव, केंद्रीय कार्यकारीणी मसापचे सदस्य रामचंद्र तिरुके होते. भव्यदिव्य असे बालकांसाठीचे संमेलन घेण्यात आले. बालसाहित्य लेखकांचा पुरस्कार देऊन ही संस्था सन्मान करते.

ज्ञान विज्ञान- तंत्रज्ञानाने प्रगती करुन यशांचे उंच शिखर गाठत असलो तरी या धावत्या वेगात मुलांचे बालपण आपण हरवून बसलो. आनंदाने खेळणारी मुले पेन, वही आणि सुंदर अक्षरांपेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवर खूप प्रेम करतो आहे. मुले हसण्यापेक्षा चिडचिड स्वभावाची होत आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मुलांचे वय आणि मन लक्षात घेऊन शाळा परिसर आणि निसर्गाशी त्यांचे नाते जोडले पाहिजे. आनंददायी शिक्षणाची गरज आहे. धास्तीच्या धडयांपेक्षा शिस्तीचे धडे खूप महत्वाचे आहेत. नाहीतर ही कोमलमनांची बालके सतत तणावात राहून अनेक मनोविकृतीला बळी पडतील. म्हणून आज अशा बालकुमार मेळाव्याची गरज आहे.

-         प्रा.रामदास केदार, शिवाजी महाविद्यालय , वाढवणा (उदगीर, जि. लातूर)

मो.क्रं.9850367185

पुनर्मुद्रित लेख : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अश्मक स्मरणीकेतून साभार


Tuesday, 18 February 2025

मराठी संपादकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान ( विशेष लेख)

                            




                     

 "सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिणारे लोकमान्य टिळक नि इंग्रजांना प्रखर लढा देणारे संपादक पंडित बाबुराव पराडकर नि माधवराव सप्रे यांचा वारसा पुढे नेणारे निर्भिड संपादक आजही कधी नव्हे तेवढे हवे आहेत. जेव्हा जनसामांन्यावर अन्याय, महागाई, रोगराई व रोजगार नि शेतकरी - दलितांचे व महिलांचे जीवन असह्य होते तेव्हा तेजस्वी पत्रकारिता पुढे येते. लोकशाही व्यवस्था पारतंत्र्यात असताना जे लोकमान्य टिळक, पराडकर नि सप्रे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर जवळकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, दिनबंधूकार कृष्णराव भालेकर यांना  जमले ते आज लोकशाही व्यवस्था असताना का जमू नये याचा विचार आजच्या संपादक नि पत्रकारितेने करायला हवा. नाही का ?

 

पत्रकारिता हे क्षेत्र जनजागरणाचं  नि लोकशिक्षणाचं  प्रभावी माध्यम आहे, हे सर्वज्ञात आहे. लोकशाही व्यवस्थेतील पत्रकारितेला गुणवत्ता नि अर्थवत्तेचे नवे धुमारे फुटतात. लोकशाहीचं रक्षण नि संवर्धन पत्रकारितेचं मुलभूत काम आहे. कारण लोकशाही नसेल तर पत्रकारिता निर्जीव ठरू शकते व ठरतेही. तसेच हुकुमशाहीत ती पत्रकारिता नव्हे तर भाटकारिता ठरते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा पत्रकारितेचा मूलाधार नि तो स्वातंत्र्यातच प्राप्त होऊ शकतो. लोकशाही व्यवस्थेत स्वाभिमानानं नि  निर्भयपणे पत्रकारिता करणे आज किती कठीण जातंय हे आपण पाहतोच. पत्रकारितेला येनकेन प्रकारेन मिंधे करण्याचे प्रयत्न सत्तावान, धनवान, बलवान करताना आपण पाहतोच आहोत. तरीही लोकशाहीतच पत्रकारिता बहरू शकते, फुलू शकते आणि आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवून सत्तेलाही हलवू शकते हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.  म्हणूनच प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रगल्भ लोकमत बनवावे लागते नि लोकमत (Public Opinion) घडविण्याचं काम पत्रकारिता करते. ते शक्य होते ते पत्रकारिताही प्रगल्भ नि निर्भय असेल तरच. म्हणूनच लोकशाही व्यवस्थेतच पत्रकारिता फुलते-फळते आणि पत्रकारितेचा जीव लोकशाहीच्या मुठीत असतो तर लोकशाहीचे अस्तित्वच पत्रकारिता टिकवून ठेऊ शकते. कार्यपालिका, विधीपालिका व न्यायपालिका या तिन्ही खांबावर नजर ठेवणे, चूकत असतील, घटनेची चौकट मोडत असतील तर निर्भयपणे टीका करणे हे पत्रकारितेचं मूळ काम आहे. जनतेचे स्वातंत्र्य व पत्रकारितेचंही स्वातंत्र्य अबाधित राखणं नि गरज पडली तर त्यासाठी लढा देणे हा पत्रकारितेचा धर्म आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यातील मराठी संपादक-पत्रकारांचं तेजस्वी योगदान पाहणं उदबोधक ठरते.

मराठी पत्रकारिता नि स्वातंत्र्य लढा : टिळक-आगरकरपूर्व संपादक मराठी पत्रकारितेचा आरंभ 1832 साली हा ब्रिटिश आमदानीत झाला हे आपण जाणतोच. दर्पणकार पंडित बाळशास्त्री जांभेकर या थोर विद्वान संपादकाने मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यांनी दिग्दर्शन नावाचा मराठीतील पहिला ज्ञानसंग्रह प्रकाशित केला. मराठी नवसुशिक्षितांना अनेक विषयांचं ज्ञान बाळशास्त्री यांत देत असत. थोडक्यात दिग्दर्शनच्या माध्यमातून नवविचारांची व वैज्ञानिक दृष्टीतून व समाज सुधारणांची पेरणी ते मराठी समाजात करीत होते. नवा मानव व नवविचारी तरूणांचं मन घडवित होते. वैचारिक परिवर्तन करीत होते. आठ भाषांचा अभ्यास असणारे ते ज्ञानमहर्षिच होते पं. बाळशास्त्री जांभेकर. जनजागरण नि लोकशिक्षण व आधुनिकतेचे मूल्यं आपल्या मराठी समाजात रूजविणं यासाठी ते झटले. संपादक या नात्याने ते समाजशिक्षण होतेच ; पण शिक्षक म्हणूनही त्यांनी मौलिक जबाबदारी पार पाडली. एक उदाहरण पुरेसे आहे-स्वातंत्र्य लढ्यात पुढे अग्रणी ठरलेल्या दादाभाई नौरोजी यांचे ते गुरू होते. काँग्रेस संघटना स्थापन करण्यातील त्यांचे योगदान मौलिक राहिलेले आहे हे आपण जाणतोच. ब्रिटिश सरकार विरोधी संघटना बांधणारा नेता एका मराठी संपादकाने घडवावा हे केवढं मोठं देशपातळीवरील योगदान आहे बाळशास्त्री जांभेकरांचे.!

पंडित बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण मधील सहकारी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन यांचा आदराने उल्लेख करावा लागेल. समाजाला नवे वैज्ञानिक नि पाश्चात्य ज्ञान, प्रबोधनकारक विचार देण्यात भाऊ महाजन आघाडीवर होते. संपूर्ण मराठीतील पहिले नियतकालिक प्रभाकर या नावाने त्यांनी काढले. दोन दशकं त्यांनी आपले पत्र चालविले. त्याशिवाय त्यांनी ज्ञानदर्शन हे त्रैमासिकही प्रकाशित केले. शिवाय 'धुमकेतू' हे नियतकालिकही भाऊ महाजनांनी सुरू केले. मराठी समाजाचे प्रबोधन व्हावं, समाज जागृत व्हावा हेच ध्येय या थोर पत्रकार, संपादक नि प्राध्यापकाचं होतं. भाऊ महाजन यांचे कार्य मौलिक असूनही त्यांचे नाव फारसे माहिती नाही. मराठी समाजमन आधुनिकतेकडे घेऊन जाण्यात त्यांचं कार्य नाकारता येत नाही. पहिले मराठी कादंबरीकार म्हणूनही संपादक गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन यांचेच अमूल्य योगदान आहे. साहित्य, गद्य नि वैचारिक, विज्ञान साहित्याचे जनकही संपादक - पत्रकार आहेत, कारण पंडित बाळशास्त्री जांभेकर, प्रभाकरकार भाऊ महाजन हे वैचारिक नि ज्ञानविज्ञानाच्या गद्य साहित्याचे प्रारंभबिंदू आहेत. समाजसुधारणांचे नि प्रबोधन युगाचे कर्ते - करविते आहेत हे आपणास मान्य करावे लागेल असे पुरावे आता पुढे आले आहेत. बाळशास्त्रींचे दिग्दर्शन व भाऊ महाजनांचं ज्ञानदर्शनचे अंक त्याचा सबळ पुरावा आहे.

प्रभाकरकार गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन : धारदार लेखनाचा प्रबोधक व पहिले मराठी कादंबरीकार ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश नि दिनबंधू ज्ञानक्रांतीचा महाराष्ट्रात आरंभ करण्याचे सातत्यपूर्ण श्रेय मराठी संपादकांनाच द्यावं लागेल. ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, दिनबंधू, निबंधमाला, विविधज्ञानविस्तार आदि प्रारंभिक मराठी नियतकालिकांनी  जे वैचारिक लेखन, गद्यलेखन, ज्ञानविज्ञान लेखन मराठीत करून मराठी भाषेला समृद्धीच्या नव्या पर्वात नेले आहे, त्याचा चिकित्सक अभ्यास नि संशोधन आजवर नीटपण व समग्रतेने झालेले नाही, असे मला म्हणावेसे वाटते.

 

वृत्तपत्रांच्या सामर्थ्याविषयी बाळशास्त्रींना यथार्थ जाणीव होती. त्यासंबंधी आपल्या' दर्पण' च्या दुसऱ्याच अंकात त्यांनी असे लिहिले होते की, ' ही शक्ती आपल्या देशात पूर्वी असल्याचा इतिहासात दाखला नाही. सर्व जगामध्ये पाश्चात्य राष्ट्रांची जी प्रगती झाल्याचे आपणास दिसते, त्याचे प्रमुख कारण म्हणजे वृत्तपत्रे. ज्ञानप्रसाराचे आणि लोकजागृतीचे हे अद्भुत साधन आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे, सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, जनतेला तिची कर्तव्ये सांगणे, राज्यकर्त्यांच्या हुकुमशाहीला लगाम घालणे हे सामर्थ्य वृत्तपत्रांच्या अंगी आहे.

महात्मा जोतीबा फुले हे महाराष्ट्रातील बहुजन जागरणाचे (शेतकरी जमाती, शेतमजूर, दलित, महिला) अध्वर्यू राहिले आहेत. या बहुजन जागरणांनं या अज्ञानी व अंधश्रद्ध बहुजनांना मानवी अधिकारापासून  चातुर्वर्ण्य चौकटीमुळं शोषित रहावं लागलं. त्यांना सामाजिक न्याय उपलब्ध करण्यासाठी महात्मा फुले यांनी व सत्यशोधक समाजानं ग्रामजीवनात नि बहुजनात जागृती करण्यासाठी सत्यशोधक विचारधारेची नियतकालिकं निघाली नि त्याची सुरुवात महात्मा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली केली. टिळक-आगरकर यांचे काही वर्षे आधी ही पत्रकारिता उदयाला आली व त्यातून दीनमित्र, हंटर, विजयी मराठा, ब्राह्मणेतर आदि अनेक वृत्तपत्रं पुढील 60-70 वर्षात निघाली व खेड्यापाड्यातील अठरापगड जातींचे जनजागरण घडले नि ते पुढे लाखोंच्या संख्येने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले हे विसरता येत नाही. हा मुद्दा बरेचदा अनेकांच्या लक्षात येत नाही हे खरे आहे.

 

 

टिळक-आगरकरांचे अनमोल पर्व

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्र व बंगालचे नेतृत्व अनमोल आहे. मराठीतील महान व लढवय्या संपादकांनी महाराष्ट्रात तेजस्वी योगदान दिलंच; पण ते भारतातील महान संपादकांना प्रेरक राहिले. त्यामुळे हिंदी, दक्षिणेतील व पूर्वेतील अनेक थोर संपादकांस मराठी पत्रकारितने ज्वलंत प्रेरणा दिली.

 लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व सहकारी देशभक्तांनी केसरी व मराठा ही अनुक्रमे मराठी व इंग्रजीतील वृत्तपत्रं सुरू केली. अनेकांना हे माहिती नाही की, प्रारंभिक सहा वर्षे थोर समाजसुधारक नि देशभक्त गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे इंग्रजी नियतकालिक  मराठाचे संपादक होते. काही वर्षांनी आधी राजकीय का सामाजिक सुधारणा या वैचारिक मतभेदातून आगरकर बाहेर पडले व स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. पुढे आपल्या अंतापर्यंत लोकमान्य टिळक हे केसरीचे आक्रमक संपादक होते आणि ब्रिटिश सरकारविरोधी आग ओकणारी त्यांची पत्रकारिता होती. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे व अनेक भाषांमधील महान संपादकांचे प्रेरणास्रोत राहिले ही मराठी सारस्वताला नि माणसांना अभिमानानं छाती फुगून यावी असेच हे कार्य. लोकमान्य टिळक यांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन हिंदी या राष्ट्रभाषेच्या पत्रकारितेत दोन मराठी संपादकांनी केलेलं मौलिक योगदान अजरामर आहे. हिंदी पत्रकारितेचे पितामह मानले गेलेले स्वातंत्र्यसेनानी पंडित बाबुराव पराडकर हे अत्यंत प्रखर पत्रकारिता करणारे मूळ मराठी संपादक होऊन गेले. आपली लेखनी त्यांनी तलवारीगत धारदार केली होती. निर्भय पत्रकारिता कायम असते व बलदंड इंग्रजी साम्राज्यास आव्हान देण्याची हिंमत अनेकदा त्यांनी केली. जुलमी सरकारविरोधी आवाज उठवणं हे पत्रकारितेचं मूलभूत साहसी काम त्यांनी केलं. हिंदी पत्रकारितेत देशभक्तीचा नवा इतिहास रचला पंडित पराडकर यांनी. परंतु आजही अनेक पत्रकारांनाही त्यांची फारशी माहिती नाही हे खेदजनक होय. पं. बाबुराव पराडकर यांच्याप्रमाणेच मध्यप्रदेशात ज्वालाग्रही लढाऊ पत्रकारिता करणारे दुसरे महान पत्रकार- संपादक आहेत पंडित माधवराव सप्रे. त्यांनी हिंदी पत्रकारितेत जहाल पत्रकारिता केली व त्यांनी हिंदी केसरी सुरु केला नि इंग्रजीविरुद्ध झुंजारपणे लढा दिला. ते लेखक – कथाकार व साहित्यिकही होते. हिंदी कथेचे ते जनक मानले जातात. पत्रकारिता नि साहित्य क्षेत्रात या दोघांनी महान कामगिरी केली.

 

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा अग्रलेख लिहिणारे पारतंत्र्यात लिहिणारे लोकमान्य टिळक नि इंग्रजांना प्रखर लढा देणारे संपादक पंडित बाबुराव पराडकर नि माधवराव सप्रे यांचा वारसा पुढे नेणारे निर्भिड संपादक आजही कधी नव्हे तेवढे हवे आहेत. जेव्हा जनसामांन्यावर अन्याय, महागाई, रोगराई व रोजगार नि शेतकरी - दलितांचे व महिलांचे जीवन असह्य होते तेव्हा तेजस्वी पत्रकारिता पुढे येते. लोकशाही व्यवस्था पारतंत्र्यात असताना जे लोकमान्य टिळक, पराडकर नि सप्रे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर जवळकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, दिनबंधूकार कृष्णराव भालेकर यांना जमले ते आज लोकशाही व्यवस्था असताना का जमू नये याचा विचार आजच्या संपादक नि पत्रकारितेने  करायला हवा. नाही का ?

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक दास्यमुक्तीची पत्रकारिता महान समाजक्रांतिकारक व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता थेटपणे स्वातंत्र लढ्याशी संबंधित आहे, कारण त्यांचा लढा हा स्वकियांच्या दास्यातून – चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या शतकानुशतकांच्या गुलामीतून दलित समाजाला मुक्त करणारा नि त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवू पाहणारा होता. त्यातूनच त्यांनी 1920 च्या व 30 च्या दशकात आपत्ती वृतपत्रे अन्यायाला व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काढली. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता व प्रबुद्ध भारत ही त्यांची नियकालिकं Voice of the voiceless मुक समाजाचा आवाज बनलेली  मानवी  हक्काची व सामाजिक स्वातंत्र्याचीच लढाई होती. ही लढाई स्वकियांशीच असल्यानं व स्वकियांनी लादलेल्या जातीय गुलामीविरुध्दची  जटिल नि कठीण अशी स्वातंत्र्याची लढाई होती. विषमतेची पाळेमूळं नष्ट करण्याची लढाई होती. ती त्यांनी आपल्या नियतकालिकांच्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं लढली. यश मिळवलं, ते भारतीय घटनेत समानता देऊन नि कायद्यानं अस्पृश्यता नष्ट करून… मराठवाडाचे पत्रमहर्षि आ. कृ. वाघमारे यांची एकमेवाव्दितीय झुंजार पत्रकारिता मराठवाडा प्रदेश हैद्राबादच्या निजामाच्या हुकुमशाही राजवटीच्या जुलमी राजवटीत होता. भारतातील स्वातंत्र्य युद्ध शिगेला पोहचल्यावर स्वातंत्र्यसेनानी पत्रमहर्षि मराठवाडाकार आ. कृ. वाघमारे यांनी 1938 साली पुण्यातून मराठवाडा साप्ताहिकाचा आरंभ केला. हैद्राबाद मुक्तीचे आंदोलन मुखपत्र असल्याने कधी निजामाने तर कधी इंग्रजांनी त्यावर बंदी आणली. अशा जुलमी राजवटीला भिणारे आ. कृ. वाघमारे थोडेच होते. निर्भयपणे ते या बंदीविरूद्ध लढले. आपली जिद्द नि झुंजारवृत्ती तसूभरही ढळू दिली नाही. लढाऊ बाण्याच्या या शूर संपादकाने एका अंकावर बंदी आली की दुसरे नाव घेऊन दुसरे गाव गाठून आपला अंक नि लढा चालूच ठेवला. कधी पुणे, कधी औरंगाबाद(आत्ताचे छत्रपती संभाजीनगर), कधी मुंबई तर कधी हैद्राबाद गाठलं पण अंक बंद पडू दिला नाही ते नाहीच. एकूण बारा नावं बदलली. आधी मराठवाडा मग नागरिक, संग्राम, समरभूमी, हैद्राबाद स्वराज्य, मोगलाई, सत्याग्रह, कायदेभंग, रणदुदुंभी, संजिवनी व कथाकल्प अशी वेगवेगळी नावं घेतली. एका नावावर बंदी आली की दुसरं नाव तयार.. जगाच्या इतिहासात अशी लढाई एखाद्या वृत्तपत्रांनं दिली नसेल. 1948 ला मग औरंगाबादहून (आत्ताचे छत्रपती संभाजीनगर) मराठवाडा नावावर प्रकाशन सुरू केलं. 1964 ला ते दैनिक केलं नि दुर्दैवानं त्याच दिवशी ते निधन पावले नि थोर संपादक अनंत भालेराव पुढे दै. मराठवाडाचे संपादक झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सत्तेविरूद्ध असं लढण्याची हिंमत बाळगणारे संपादक व पत्रकार आज लोकशाहीतही हवेत.

 

-डॉ. सुधीर गव्हाणे,

      माजी कुलगुरू(यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,     

                    नाशिक तथा एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

      पुर्नमुद्रित लेख

उदगीर येथील 95 व्या अ.भा.म.सा.संमेलनाच्या   

            ‘अश्मक’स्मरणिकेतून साभार