Followers

Friday 22 February 2019

दुष्काळग्रस्त भागातील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सर्वांसाठी आदर्शवत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सिनेअभिनेता अक्षयकुमार यांनी केली प्रत्येक जोडप्यास 1 लाख रुपयांची तर शहीद जवानांच्या कुटुंबांना ग्रामविकास विभाग व उमेद तर्फे 1 कोटी रुपयांची मदत

बीड दि. 22 – मराठवाड्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत विवाह करणे, हा अनेक कुटुंबांपुढे पडलेला मोठा प्रश्न आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एका चांगल्या कार्याला सुरूवात होत आहे. सगळा बडेजाव टाळून सर्वांना एकत्रित घेऊन संपन्न होत असलेला हा विवाह सोहळा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज येथे सांगितले.
  परळी येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व्दारा आयेाजित 89 जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सिनेअभिनेता अक्षय कुमार, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार,  खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, श्रीमती संगिता ठोंबरे,राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे , ,जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
  मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आदर्शवत वाटचालीवर चालत पंकजाताईंनी चांगल्या कार्याची सुरूवात केली आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एवढा मोठा समाज आज एकत्रित आला आहे. या जोडप्यांना हजारो लोकांचे आशिर्वाद मिळत असल्याने त्यांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद लाभणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, अक्षय कुमार यांनी दिलेली एक लाख रुपयांची मदत विवाह सोहळ्यातील सर्व नवरदेवांनी आपल्या पत्नीच्या नावे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवून त्यात जमेल तशी भर घालावी, जेणेकरुन त्यांचे वैवाहिक जीवन सुखकर होईल.
  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की,  मुलींचे लग्न वेळेत झाले पाहिजे असे सर्व आई-वडिलांना वाटत असते. परंतु दुष्काळाच्या परिस्थितीत हे सर्वांनाच शक्य आहे असे नाही. अशा प्रकारच्या  सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. मी गरीब जनतेसाठी काम करीत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत गरीब जनतेच्या विकासासाठीच काम करीत राहणार. सिनेअभिनेता अक्षय कुमार यांनी आज मी प्रथमच एवढ्या मोठ्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहत आहे असे सांगून आपल्या नववधूची काळजी तर घ्याच पण आपल्या आई-वडिलांचीही तितकीच काळजी घ्या, असा सल्ला या  मंगलप्रसंगी नवदांपत्यांना दिला.
यावेळी अभिनेता अक्षय कुमार यांनी प्रत्येक नवविवाहित जोडप्यास 1 लाख रुपये मदत दिली. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत बौध्द धर्मीय नवविवाहित दाम्पत्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयाची मदतही करण्यात आली. ‘भारत के वीर’ या अभियानांतर्गत ‘उमेद’ तर्फे 58 लाखांचा धनादेश तर ग्रामविकास विभागातर्फे शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी मदत म्हणून 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांना सुपूर्द करण्यात आला. शासनाने ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू केल्याबद्दल आणि महात्मा ज्येातीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये पत्रकारांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड जिल्हा पत्रकार संघातर्फे सत्कारही यावेळी  करण्यात आला. 

राज्यात 5 वर्षात 50 हजार कि.मी.च्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


           





नांदेड-लातूर रोड गुलबर्गा नवीन रेल्वे  मार्गास  राज्य शासन 50 टक्के  मदत करेल.
लातूर जिल्हयाने जलसंधारणाचा  नवीन पॅटर्न  निर्माण केला.
मराठवाडयाचा पाणी प्रश्न वॉटर ग्रीडच्या माध्यमातून सोडविणार.

लातूर, दि. 22:- जागतिक स्तरावर  दळणवळणाच्या  चांगल्या सोयीसुविधांमुळे  उद्योग शेती, व्यवसायाला  चालना मिळण्याबरोबरच  शैक्षणिक  आरोग्याच्या  दर्जेदार सुविधा  उपलब्ध्झालेल्या  आहेत. केंद्र राज्य शासनाच्या माध्यमातून मागील चार-पाच वर्षात  50 हजार  किलो  मीटरच्या  रस्त्यांच्या कामांची  सुरुवात झाली आहे.  यातील  सात हजार  कि.मी. राष्ट्रीय महामार्ग, 22 हजार कि.मी.चे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे  तर  सात हजार कि.मी. चे राज्यमार्गाची कामे प्रगतीपथावर असल्याची  माहिती  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
अहमदपूर येथे आयोजित  लातूर जिल्हा पॅकेज अंतर्गत  केंद्रीय रस्ते वाहतूक  राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, (सा.बा. ) राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने  11 हजार 680 कोटीच्या विविध विकास कामांचे  लोकार्पण  भूमीपूजन  सोहळया प्रसंगी  मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक  ,महामार्ग जलसंपदा मंत्री  नितीन गडकरी, कामगार कल्याण,कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर , खासदार डॉ.सुनील गायकवाड, आमदार सर्वश्री विनायक पाटील,सुधाकर भालेराव, प्रताप पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी आमदार गोविंद केंद्रे, विभागीय  आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकरी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी  अधिकारी विपीन इटनकर, एमएसआरडीसीचे  मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे, गणेश हाके, नागनाथ निडवदे  इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात  15 हजार कि.मी. चे राष्ट्रीय महामार्ग, 10 हजार कि.मी. चे राज्यमार्ग तर मुख्यमंत्री ग्रामसडक  योजनेंतर्गत 30 हजार कि.मी. च्या  ग्रामीण रस्त्यांच्या कामांना सुरुवात झालेली आहे. यामुळे राज्यातील  प्रत्येक  गाव रस्त्यांनी  जोडले जाऊन विकासाला अधिक चालना मिळणार  आहे. राज्याच्या  इतिहासात  प्रथमच  एवढया  मोठया प्रमाणावर  रस्त्यांची  कामे सुरु असल्याचे  त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री  कृषि सन्मान  योजनेतून  देशातील  शेतकऱ्यांनी  दरवर्षी  प्रती  शेतकरी  सहा  हजार  रुपयाप्रमाणे  75 हजार कोटी  थेट बँक खात्यावर  जमा केले जाणार आहेत. राज्य शासनाने  राज्यातील  शेतकऱ्यांना  21 हजार कोटीची कर्ज माफी  देऊन दिलासा दिला आहे. तसेच  ही योजना  शेवटच्या  शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत  सुरुच असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या माध्यमातून  गुजरात महाराष्ट्र या दोन राज्यात  नदीजोड प्रकल्पांतर्गत सन  2010 मध्ये  झालेल्या कराराचा सर्वाधिक लाभ  गुजरातला मिळत असल्याने तो करार  या शासनाने  रद्द केला असून महाराष्ट्राला लाभ मिळेल असा नवीन करारावर काम सुरु असल्याचे  श्री. फडणवीस यांनी सांगून  राज्य शासनाने एकात्मिक  जल आराखडा तयार केला आहे. असा आराखडा  तयार करणारे देशातील  महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडयाचा पाण्याचा प्रश्न  सोडवून हा  मराठवाडा  सुजलाम-सुफलाम करण्यासाठी  प्रयत्न केले जात आहेत.  मराठवाडा वॉटर  ग्रीडच्या  माध्यमातून  पाईपलाईनमधून  मराठवाडयाच्या  सर्व भागात  समप्रमाणात पाणी  देण्याचे  काम केले जाणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. वॉटर ग्रीडच्या डीपीआरला मान्यता देण्यात आली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी  सात ते आठ  वर्षे कालावधी लागेल  त्यासाठी सुमारे  25 हजार कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
 राज्यात जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे या माध्यमातून दुष्काळावर  मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे अनेक  गावे पाणीदार झालेली  आहेत. लातूर  जिल्हयाचा लौकीक  शैक्षणिक  क्षेत्रात  मोठया  प्रमाणावर आहे. पण  नेहमीच टंचाई मध्ये  असणाऱ्या लातूर जिल्हयाने जलसंधारण क्षेत्रात  मोठी कामगिरी  करुन देशपातळीवर  जलसंधारणच्या कामांत  प्रथम  पारितोषिक  मिळवून दुष्काळावर मात केली आहे. लातूरचा   जलसंधारणात नवीन  पॅटर्न निर्माण केल्या बद्दल  लातूरवासियांचे अभिनंदन श्री. फडणवीस यांनी केले.
लातूरच्या रेल्वे बोगी प्रकल्पांमुळे  परिसरातील  15 ते 20 हजार बेरोजगारांना रोजगार  मिळेल. या प्रकल्पाचे कामे वेगाने  सुरु असून  प्रकल्पाची  व्याप्ती  वाढल्यास अनेक  उद्योगाना चालना मिळेल. तसेच  महिला बचत गटाची  चळवळ  जिल्हयात गतीमान असून  या गटांना मोठया प्रमाणावर खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात आल्याचे  श्री. फडणवीस यांनी सांगितले.
राज्य शासनाने  ऑक्टोबर  2018 मध्ये  राज्यात  दुष्काळ जाहीर करुन  नोव्हेंबर  डिसेंबर  मध्ये केंद्रीय पथकांनी  पाहणी केली. तर केंद्राने  पाच  हजार  400 कोटीचा  निधी  दुष्काळातील  उपाय योजनांसाठी  मंजूर  केला राज्य  शासनाने  दोन  हजार कोटी  रुपये  आतापर्यंत  वाटपही केले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.असंघटित कामगारांसाठी  पेन्शन योजना केद्राने  सुरु केली आहे. तर राज्याने बांधकाम कामगारांना  केंद्राचे  आडीच लाख  कामगार  विभागाचे  दोन लाख घरासांठी दिले जात आहेत.देशात  आजपावेतो  पाच लाख  घरकुले पूर्ण झाली असून पाच  लाख घरकुलांचे  काम सुरु आहे  2022 प्रर्यत प्रत्येक  बेघर व्यक्तीला घरकूल मिळेल., असे त्यांनी सांगितले. याकरिता  राज्यातील  10 लाख अतिक्रमणे  मंजूर  करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे  त्यांनी म्हटले.
नांदेड-लातूर रोड- गुलबर्गा या रेल्वे  मार्गासाठी  केंद्रीय रेल्वेमंत्री  यांच्याकडे  पाठपुरावा केला जाणार असून हा रेल्वेमार्ग  मंजूर केला जाईल गरज पडल्यास  या रेल्वे  मार्गासाठी  राज्य शासन  50 टक्के  आर्थिक सहकार्य करेल, अशी  ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
देशात  2014 मध्ये  पाच  हजार कि.मी. चे महामार्ग होते. आज 22 हजार  436 कि.मी. चे महामार्ग आहेत. आज लातूर जिल्हयात  जिल्हा पॅकेज  अंतर्गत औसा-चाकूर, चाकूर लोहा, मांजरा नदी वर  बंधारा बांधणे, लोखंडी सावरगाव ते रेणापूर फाटा, लातूर ते पानगाव, उमरगा ते औसा, अहमदपूर ते पिंपळा,  जहिराबाद ते लातूर आदि रस्त्यांच्या  कामांसाठी  11 हजार  680 कोटींच्या कामांचा  मंजूरी  देण्यात आली असून  त्यातील  तीन हजार  895  कोटींच्या कामांचा शुभारंभ आज  होत असल्याचे  केंद्रीय  वाहतूक   महामार्ग मंत्री गडकरी  यांनी सांगितले.
 राज्यात  जलसंधारणाची  कामे उत्कृष्ट  झाली असून  मुख्यमंत्री फडणवीस  यांचे  तसेच  राष्ट्रीय जलपारितोषिक  मिळाल्या बद्दल  लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ,जिल्हाधिकारी नागरिकांचे  श्री. गडकरी यांनी  अभिनंदन कौतूक केले.
पिंजर -दमणगंगा  प्रकल्प तापी-नर्मदा प्रकल्प पूर्ण  झाल्यास  या प्रकल्पातील  पाणी गोदावरीत सोडले जाऊन जायकवाडी  प्रकल्पात आणले जाणार आहे. त्यामुळे  मराठवाडयाचा  पाणी प्रश्न  कायमस्वरुपी  सोडविला  जाऊन सुमारे  साडेपाच लाख हेक्टर  शेतजमीन  सिंचनाखाली  येईल, असे श्री. गडकरी यांनी सांगितले.
राज्यातील साखर कारखान्यांनी  साखरेऐवजी  इथेनॉल निर्मिती  करावी. केंद्र शासन  59 रुपये प्रति लिटरने  इथेनॉल  घेईल, असे श्री. गडकरी  यांनी  सांगून पीक पध्दतीमध्ये क्रांतीकारी  परिवर्तन  झाल्याशिवाय शेतीमालाला  भाव मिळणार नाही. लातूर जिल्हयाने  शैक्षणिक  पॅटर्न  तसेच  जलसंधारण  पॅटर्न निर्माण केला असून आता हरित पॅटर्न निर्माण करण्यासाठी लातूरकरांनी प्रयत्न करावेत, असे सांगून आष्टा मोड ते उदगीर  या रस्त्यांसाठी  273 कोटीचा  निधी मंजूर केल्याचे  श्री. गडकरी यांनी सांगितले.
 लातूरसह मराठवाडयाला  पाणी   रोजगार मिळाला पाहिजे तसेच  नांदेड-लातूर रोड- गुलबर्गा  रेल्वे  मार्गास  मंजुरी  मिळावी जिल्हयातील  प्रत्येक  नदीवरील  पुलाच्या ठिकाणी  ब्रीज कम बॅरेजची कामे व्हावीत, अशी अपेक्षा  पालकमंत्री संभाजी पाटील  निलंगेकर यांनी व्यक्त केली. यावेळी  आमदार विनायक पाटील यांचे ही भाषण झाले. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी  देशाला परम वैभावाकडे  घेऊन जावे,असे आवाहन केले.
प्रारंभी  जम्मू-काश्मीर  मधील  पुलवामा येथील  दहशतवादी  हल्लयातील  शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस  केंद्रीय मंत्री गडकरी  यांनी छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेचे  पूजन केले दीपप्रज्वलन  करुन  तसेच डिजिटल पध्दतीने कळ दाबून विविध विकास कामांचे लोकार्पण  भूमीपूजन  करण्यात आले.
 यावेळी मुख्यमंत्री फडणवीस  केंद्रीय  मंत्री गडकरी  यांच्या  हस्ते  103 वर्ष पूर्ण  केल्याच्या निमित्ताने  शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक  मुख्य अभियंता  विनय कुमार  देशपांडे यांनी केले . तर आभार  रामभाऊ  बेल्लाळे यांनी मानले या कार्यक्रमास  परिसरातील  हजारो  नागरिक उपस्थित होते.