Followers

Tuesday 27 November 2018

जिल्ह्यातील एकही बालक गोवर- रूबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत




लातूर,दिनांक 27:- जिल्ह्यातील 9 महिने  ते 15 वर्षे वयोगटातील एकही बालक गोवर- रूबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची आरोग्य यंत्रणा व पालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले.
            जिल्हा प्रशासन,जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय गोवर रूबेला लसीकरण शुभारंभ जिल्हा परिषद कन्या शासकीय वसाहत शाळेत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवदास काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन ईटनकर,अधिव्याख्याता डॉ. राजाराम पवार,आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, आय. एम. ए.चे डॉ. भऱ्हाटे उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, गोवर-रूबेला लसीकरण कार्यक्रम जिल्हाभरात सहा आठवडे चालू राहणार आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या बालकास लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी  केले.  या लसीकरण शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची कन्या कुमारी शास्वती  व  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर  यांचे चिरंजीव आयान यांच्यासह उपस्थित असलेल्य बालकांना लसीकरण करून कार्ड वाटप करण्यात आले.     
            यावेळी महापौर सुरेश पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन ईटनकर, आरोग्य सभापती प्रकाश देशमुख व  नगरसेविका श्रीमती यादव यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती माधुरी वलसे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी मानले. 

Monday 19 November 2018

डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायकरित्या वापरणे गरजेचे - माहिती संचालक यशवंत भंडारे





  औरंगाबाद, दिनांक 16-  आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये “डिजीटल पत्रकारिता” ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहे. या माध्यमाची पोहोच आणि गतिमानता ही बलस्थाने लक्षात घेऊन डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे यांनी आज येथे केले.

एमजीएम महाविद्यालयाच्या सभागृहात आज जिल्हा माहिती कार्यालय व एमजीएम महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त “डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान” या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक यशवंत भंडारे, दै. सकाळ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड,  एमजीएम महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या संचालिका प्राचार्या डॉ. रेखा शेळके, माहिती अधिकारी वंदना थोरात, मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, यांची उपस्थिती होती. 
श्री भंडारे यावेळी म्हणाले की, समाजाच्या सकस वाढीसाठी लोकशाही मुल्यांची जपवणूक आवश्यक आहे. त्यामध्ये माध्यमांची भूमिका ही सातत्याने महत्वपूर्ण राहिलेली असून त्या पार्श्वभूमिवर डिजीटल माध्यम जे कमी वेळात असंख्यांपर्यंत एखादी गोष्ट, माहिती पोहचवते त्याच्याकडे सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, भावनिक या सर्व दृष्टीकोणातुन बघणे गरजेचे आहे. साधन आणि साध्य याचा योग्य तो मेळ बसवूण त्याचा वापर हा विधायक कामांसाठीच केला जाणे हे भान वापरकर्त्यांनी प्राधान्याने जपणे ही डिजीटल पत्रकारितेसमोरचे आव्हान आहे, असे सांगूण श्री भंडारे म्हणाले की, राष्ट्रउभारणीचे काम करण्यासाठी, त्या कामाला योग्य ती दिशा देण्यासाठी माध्यमांचा प्रामुख्याने डि‍जीटल माध्यमांचा वापर करतांना काही बंधने आणि मर्यादा पाळणे नीतीमुल्यांचा आदर राखणे हे आजच्या काळात जास्त गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने या माध्यमांचा योग्य वापर करावा, असे आवाहन श्री. भंडारे यांनी यावेळी केले.
संपादक संजय वरकड म्हणाले की, प्रसार माध्यम हे प्रदीर्घ काळापासून आपले स्थान अबाधित ठेऊन आहे. या मुद्रीत माध्यमाने डिजीटल माध्यमांशी सांगड घालून बदलत्या काळाचा वेग ग्रहन केला आहे. डिजीटल माध्यम हे आजचे लोकप्रिय माध्यम बनले असून प्रामुख्याने स्मार्टफोनमुळे आज प्रत्येकजन पत्रकार झाला आहे. त्यामुळे माहितीचा प्रचंड साठा आज उपलब्ध होत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुळात पत्रकारिता ही  संकल्पना विस्ताराने समजून घेणे आवश्यक आहे. एकदा ही संकल्पना तिची नीतीमुल्ये समजून घेता आली म्हणजे माध्यम कोणतेही असो इलेक्ट्रॉनिक, डिजीटल, प्रिंट त्या-त्या माध्यमाचा ठराविक ग्राहक समजून घेणे आणि त्यानुसार माहिती देणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमक काय करायच आहे याबाबत ठाम असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग करून आपल्या क्षमतांचा विकास करणे आजच्या डिजीटल माध्यमांमुळे सोपे झाले आहे. संधींची संख्या ज्याप्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात स्पर्धाही वाढत आहे. हे लक्षात घेऊन आपल्या इच्छित क्षेत्रामध्ये नीतीमुल्ये जपून काम करावे, असे आवाहन श्री वरकड यांनी यावेळी केले.
श्रीमती भोसले म्हणाल्या की, माध्यमांचे काम प्रबोधन करणे हे आहे मात्र त्यासाठी आपल्याकडे असलेल्या माध्यमाचा योग्य वापर करण्याची ठाम भूमिका पत्रकारांनी  घेणे हे आजच्या काळात गरजेचे आहे. विशेषत: डिजीटल माध्यमासारख्या क्षेत्रात काम करत असतांना हे तंत्रज्ञान नेमक कस वापरायचं, कुणासाठी वापरायचं, यातून काय साध्य होणार आहे याचा फारसा गांभिर्याने विचार न करता आज व्हॉट्सअप वरून सर्रास मेसेज, व्हिडीओ यांच्या प्रसारणातुन समाजावर नेमका काय परिणाम होईल याचे गांभिर्य लक्षात न घेता एकमेकांना पाठवले जातात. हे सामाजिक स्वाथ्याच्या, सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे. हे लक्षात घेऊन डिजीटल माध्यम हाताळले पाहिजे. फेकन्यूजबाबत दक्षता घेऊन प्रत्येकाने आपण माध्यम वापरतोय की आपला वापर केला जातोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे श्रीमती भोसले यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी केले. सूत्रसंचलन माहिती सहायक श्याम टरके यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. विशाखा गारखेडकर, प्रा. श्रीमती सोनी, प्रा. श्रीमती देशपांडे यांच्यासह प्रत्रकार बांधव, विद्यार्थी उपस्थित होते

Sunday 18 November 2018

लातूर-पंढरपूर कार्तिकी स्पेशल रेल्वेचा खा.सुनील गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ


    
          लातूर दि.19:- जिल्हयातील भाविक-भक्तांना  कार्तिकी एकादशी  निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी लातूर-पंढरपूर  कार्तिकी  रेल्वेचा शुभारंभ  खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
    या कार्तिकीचे  स्पेशल रेल्वे  शुभारंभ कार्यक्रमास महापौर सुरेश पवार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार  समितीचे सदस्य निजाम शेख , बालाजी पाटील चाकूरकर, गुरुनाथ मगे,नागनाथ सरवदे, विजय कुमार गायकवाड, लातूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक विमलकुमार तिवारी, पी.के. मिश्रा, श्रीकांत रंगनाथ उपस्थित होते.
      यावेळी खासदार सुनील गायकवाड म्हणाले की, कार्तिकी एकादशी  निमित्त्‍ लातूर येथून कार्तिकी स्पेशल रेल्वे बरोबरच बिदर-पंढरपूर, अदिलाबाद-पंढरपूर रेल्वे गाडया खास भाविक भक्तांची सोय व्हावी म्हणून  सुरु केलेल्या आहेत. तरी या सुविधेचा  सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार गायकवाड यांनी केले.

Friday 16 November 2018

राज्य वीज वितरण कंपनीने टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन सूक्ष्म आराखडा सादर करावा-पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर


* शासनाच्या प्राधान्यक्रम योजनांचा पालकमंत्र्यांकडून सविस्तर आढावा
* कृषि विभागाच्या आरोग्यवर्धक ज्वारीचे  पदार्थ घडीपत्रिकेचे विमोचन
* लोकराज्य मासीकाच्या माहे नोव्हेंबर 2018 च्या अंकाचे विमोचन

         



      लातूर,दि.16:-  टंचाई काळात राज्य वीज वितरण कंपीनीच्या  डीपी नसणे, डीपी करिता  ऑईल नसणे व वीज पुरवठा  खंडित होणे  या कामांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष  निर्माण होऊ शकतो.  त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  संभाव्य टंचाई  कृती आराखडयाप्रमाणे  वीज विभागाचा सूक्ष्म आराखडा स्वतंत्रपणे सादर करावा , असे निर्देश कामगार कल्याण,कौशल्य विकास,भूकंप पुनर्वसन,माजी सैनिक कल्याण  मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  आयोजित जिल्हा आढावा बैठकीत श्री. निलंगेकर  बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत , पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, मनपा आयुक्त  कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. संजय ढगे, आत्मा प्रकल्प संचालक डी. जाधव, आदिसह सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
 पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की,राज्य वीज वितरण विभागाने  जिल्हयातील सर्व पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती घ्यावी. टंचाई काळात  ज्या गोष्टी प्राधान्याने  करणे गरजेचे आहे अशा कामांचा सूक्ष्म  आराखडा तयार करुन  त्या  कामांना अधिक प्राधान्य दयावे, जेणे करुन  नागरिकांना वीज विभागाकडून  योग्य व वेळेत  सेवा उपलब्ध्‍ होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही  पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करु नये, असे त्यांनी सूचित केले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंची सर्व कामे अधिक गतीने पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी ग्रामस्थांकडून अडचणी  निर्माण होत असतील तर  संबंधित तहसिलदार  व बीडीओ नी लक्ष घालून  सामंजसपणे आडचणी सोडवाव्यात, अशी सूचना श्री. निलंगेकर यांनी केली. त्याप्रमाणेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे त्या त्या गावांत त्वरित  उपलब्ध्‍ होतील याबाबत दक्षता घ्यावी, असे ही त्यांनी निर्देशीत केले.
 मागेल त्याला शेततळे योजनेत दिलेले उदिष्ट हे किमान आहे. त्यामुळे  यंत्रणांनी जास्तीत जास्त शेततळे  शेतकऱ्यांनी  घ्यावीत यासाठी प्रयत्न करावेत. शेततळे मुळे पिकांना  संरक्षित पाणी उपलब्ध्‍ होऊन पिकांची  उत्पादकता ही वाढत आहे., असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. अमृत योजनेंतर्गत लातूर महापालिकेने  सर्व कामे डिसेंबर 2018 अखेर पर्यंत  पूर्ण करुन  घ्यावीत, अशी सूचना त्यांनी केली.
 जलयुक्त शिवार अंतर्गत जे गावे जलपरिपूर्ण झालेली आहेत त्या गावांत पून्हा पाणी टंचाई होणार नाही या बाबत दक्षता घ्यावी. तसेच पूर्ण  झालेल्या सर्व कामांचे जिओ टॅगिंग करावे. व जलयुक्तच्या कामांचा गावनिहाय कशा पध्दतीने सकारात्मक  परिणाम झाला त्याची माहिती ही संकलित करावी,अशी सूचना श्री. निलंगेकर यांनी केली. त्याप्रमाणेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना व शबरी  घरकूल योजनेअंतर्गत एकही  पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
 जिल्हयातील सर्व साखर कारखान्यांनी  जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप माहे फेब्रुवारी  2019 पर्यंत केले पाहीजे, या बाबत जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र बैठक घेऊन संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, असे निलंगेकर यांनी सांगितले. तसेच चारा उपलब्धतेबाबत योग्य ती काळजी  घेऊन हिरवा चारा  शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित करावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.
 प्रारंभी  जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सादरीकरणाव्दारे सर्व शासकीय योजनांची माहिती सादर केली. लातूर शहराला जून 2019 अखेर पर्यंत पूरेल इतके पिण्याचे पाणी  उपलब्ध्‍ असून आजपर्यंत  जिल्हयात एक ही टँकरची मागणी आलेली नाही. तसेच विहिर अधिग्रहण प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी यांनी चार दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
   ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी  ठिंबक सिंचनाचा वापर करावा यासाठी प्रयत्न केले जात असून याबाबत  साखर कारखान्यांनाही ठिंबक नाही तर ऊस गाळप न करण्याबाबत लेखी कळविण्यात  येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून प्रधानमंत्री  सुक्ष्म  सिंचन योजनेतून मागेल त्याला ठिंबक संच पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पर्जन्यमान ,पाणी साठा, पिक परिस्थिती, बोंड अळी अनुदान, जलयुक्त शिवार  अभियान, प्रधानमंत्री घरकूल आवास योजना, अमृत योजना ,संभाव्य टंचाई आराखडा, चारा उपलब्धता ,नरेगा,सिंचन विहिर, मागेल त्याला शेततळे, शौचालये,मुद्रा, शिष्यवृती योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुद्रा अदिंची सविस्तर माहिती  सांगितली. तर या सर्व योजना अधिक काटेकोरपणे राबविण्याचे  आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी सर्व यंत्रणा प्रमुखांना करुन त्याबाबत साविस्तर मार्गदर्शन केले.
लोकराज्य अंक व घडिपत्रिकेचे विमोचन :-
 माहिती व जनसंपर्क विभागामार्फत  लोकराज्य मासीक प्रकाशित केले जाते. या मासीकाच्या माहे नोव्हेंबर 2018 रोजीच्या  दीपोत्सव महाराष्ट्राच्या प्रगतीचा या अंकाचे विमोचन पालकमंत्री संभाजी पाटील  निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्याप्रमाणेच राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2018-19 अंतर्गत  कृषि विभागाने  निर्माण केलेल्या आरोग्यवर्धक  ज्वारीचे पदार्थ या घडिपत्रिकेचे विमोचन ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

Monday 12 November 2018

महिला बचत गटांना जनावरांसाठी चारा डेपो देणार -पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर




लातूर,12:- राज्यात बहुतांश तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या भागातील जनावरांसाठी  लागणारा चारा डेपो महिला  बचत  गटांना प्राधान्याने चारा डेपो देण्यात येतील  असे प्रतिपादन  पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केली.
      लोदगा ता.औसा  येथील  पशु सर्वरोग निदान शिबीर व पशुसंर्धन  दवाखाना उद्घाटन  कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषिमूल्य आयोगाचे  अध्यक्ष पाशा पटेल, कन्हेरी  मठ कोल्हापूर  येथील  काडसिध्देश्वर स्वामी,परभणी येथील पशुसंवर्धन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.मार्कंडे ,प्रादशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.एन.सूर्यवंशी,पशुवैद्ययक तज्ञ डॉ. अनिल भिकाने जिल्हा परिषदचे डॉ.बोधनकर  उपस्थित होते.
     यावेळी मार्गदर्शन करताना  पशुधन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय  मंत्री महादेव जानकर म्हणाले की, राज्यात यापुढे  जलयुक्त्‍शिवार   सारखीच  चारायुक्त शिवार  योजना चालू करण्यात येत आहे. आपले गाव सुजलाम –सुफलाम  करण्यासाठी  सर्वानी एकत्र  येऊन गटशेती करावी व दुग्धविकास  कार्यक्रम राबवावा शासन  आपल्या पाठीशी  खंबीरपणे उभे आहे.
    राज्यातील  शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा कमी  पडू  दिला जाणार नाही. पशुसंवर्धन विभागाच्या  सर्व सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत. राज्यात शासनाने  पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायासाठी  मोठया प्रमाणात  निधी दिलेला असल्याने  शेतकरी वर्गाने   घाबरुन जाण्याचे काम नाही. शेती व्यवसायाबरोबरच  दुग्धव्यवसायाकडे  शेतकऱ्यांनी  लक्ष दयावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोदगा ता.औसा येथील पशुसंवर्धन चिकित्सालय हे आठवडयातून तीन दिवस चालू राहणार असून यामध्ये तज्ञ डॉर्क्टरांचा  समावेश असेल या दवाखान्यामुळे या भागातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार असल्याने  शेतकारी वर्गाने आपल्या पशुधनास वेळेवर उपचार करून घ्यावेत यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, यांची ग्वाही दिली . यावेळी डॉ.सुरेश गंगावणे लिखित आपण दुग्ध व्यवसाईक या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री महादेव जानकर,कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या पशुसंवर्धनाची माहिती विषद करून लोदगा येथे लवकरच  चिलिंग प्लॅन्ट चालू करण्यात  असल्याची माहिती दिली.
         यावेळी कन्हेरी मठ,कोल्हापूर येथील काडसिध्देश्वर स्वामी, पशुवैद्यकिय तज्ञ डॉ.अनिल भिकाने, परभणी येथील पशुधन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.मार्कंडे, प्रादेशिक पशुवसंर्धन सहआयुक्त डॉ.एस.एन.सूर्यवंशी,डॉ.पाचेगावकर व डॉ.गंगावणे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमास लोदग्याचे सरपंच गोपाळराव पाटील,पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी,कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर गोमारे यांनी तर आभार दयांनद उजळंबे  यांनी मानले.

Tuesday 6 November 2018

जनतेत पोलिसांच्या कामातून सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





उस्मानाबाद ,दि. 6 : गुन्हे प्रकरणातील दोषींच्या प्रमाणात वाढ होत असली तरी घरफोडी, मोबाईल व मोटारसायकल चोरी प्रकरणातील मुद्देमालही लोकांना परत मिळाला पाहिजे, या पोलिसांच्या कामातूनच लोकांना सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे, यासाठी पोलिस दलाने अत्यंत दक्षपणे काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उस्मानाबाद जिल्हा कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करीत होते.
यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, कामगार कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे  ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्यासह सर्व विभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलिस विभागाने गुन्ह्यांची उकल व दोषसिध्दीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. गुन्हे प्रकरणात आरोपपत्र योग्य पद्धतीने दाखल करा व यामध्ये त्रुटी राहता कामा नयेत,  असेही त्यांनी सांगितले. पोलीस विभाग व शासकीय अभियोक्त्यांनी अधिक दक्षपणे काम करावे. त्याप्रमाणेच सर्व सरकारी वकील व पोलिस विभागाने परस्परात योग्य समन्वय राखून दोषसिध्दीचे  प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. दोषसिध्दीचे  प्रमाण वाढविण्यासाठी शासनाच्या विविध 14 शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून महिलांवरील गुन्हयातील गुन्हेगार, दारू-सट्टा गुन्हेगार यावर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पोलीस स्टेशननिहाय आढावा घेवून गुन्हे प्रकरणातील दोषसिध्दीच्या प्रमाणात  अधिक वाढ करणे गरजेचे आहे, असे सांगितले. महिलांवरील अत्याचार, गुन्हे उकल प्रमाण, अवैध दारू विक्री, सटटेबाजार, घरफोडी,खून, मोबाईल व सायकल चोरी इत्यादी बाबींचा पोलीस स्टेशननिहाय  सविस्तर आढावा घेऊन पोलिस दलाने तपासाचा दर्जा सुधारल्याशिवाय गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढणार नाही, असे सांगून विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी यात लक्ष घालून काम पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सादरीकरणाद्वारे पोलिस विभागाची माहिती दिली. यावेळी सर्व सरकारी वकील, सरकारी अभियोक्ता व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळातील कामांना प्रशासनाने प्राधान्यक्रम दयावा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 2200 कोटींचा निधी देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





उस्मानाबाद,दि.6:- राज्य शासनाने कृष्णा खोऱ्यातील मराठवाडयाच्या हिस्यांचे पाणी मराठवाडयात मिळावे म्हणून बंद पडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पुनरुज्जीवन करून 800 कोटींचा निधी देऊन या प्रकल्पाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहेत. यात  प्रामुख्याने टनेल व स्थलरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. उर्वरित कामांसाठी शासन नाबार्डमार्फत 2 हजार 200 कोटी रुपये लवकरच उपलब्ध करून देणार आहे. या सिंचन प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही देऊन दुष्काळातील कामांना प्रशासनाने प्राधान्यक्रम देऊन मिशन मोड मध्ये काम करावे, असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, खासदार रवींद्र गायकवाड ,आमदार सर्वश्री सुजितसिंह ठाकूर सुरेश धस, विक्रम काळे ,मधुकर चव्हाण, ज्ञानराज चौगुले, राहुल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,दत्ता कुलकर्णी, कैलास पाटील, नितीन काळे, अनिल काळे, मिलींद पाटील, अविनाश कोळी आदींसह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री  म्हणाले की, राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पुनर्जिवित करण्यासाठी पर्यावरणीय मंजूरी मिळविण्यात आली. व या प्रकल्पासाठी शासनाने 800 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गतची कामे वेगाने सुरू आहेत व पुढील कामांसाठीही दोन हजार 200 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजना राबवताना प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे तसेच या काळात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी देऊन चारा नियोजन योग्य पद्धतीने करून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना
 चाऱ्यासाठी बी बियाणे उपलब्ध करून देण्याची सूचना केली. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर 2018 पूर्वी पूर्ण झाले पाहिजे. या योजनेचा दर पंधरा दिवसांनी आढावा पालकमंत्र्यांनी घ्यावा तसेच हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात यावी, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी निर्देशित केले. त्यामुळे अमृत योजनेचे महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पूर्ण केले पाहिजे,असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजना गृहनिर्माणाचे उस्मानाबाद जिल्ह्याचे काम 65 टक्के इतकेच असून ते प्रमाण निश्‍चितच कमी आहे. सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण 2011 नुसार जिल्ह्यात नोंदणी झालेल्या सात हजार 628 लाभार्थ्यांपैकी 3 हजार 384 घरकुलांना मंजुरी मिळाली असून 2 हजार 913 घरकुले पूर्ण झाली आहेत. या योजनेत कोणत्याही प्रकारचे उद्दिष्ट नाही त्यामुळे प्रशासनाने सर्व बेघरांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक गतीने काम करण्याचे निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले तसेच सामाजिक आर्थिक सर्वेक्षणात समावेश न झालेल्या कुटुंबाचे पुन्हा सर्वेक्षण करून जून 2019 पर्यंत सर्वांना घरकूल मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
 प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गतही सर्व नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये घरकूल योजनांची गती कमी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नगरपालिका प्रशासनाने याबाबत दक्षता घेऊन जातीने काम करावे तसेच झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या लाभार्थ्यांना दुसरीकडे जागा न देता आहे त्या जागेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र देऊन त्यांना घरकूल बांधून दयावीत.
मागेल त्याला शेततळे योजना सर्व जिल्ह्यांना देण्यात आलेली असून दिलेले उद्दिष्ट हे किमान असून या अंतर्गत जास्तीत जास्त शेततळे घेतली पाहिजेत. उस्मानाबाद जिल्ह्याने 3 हजार 717 उद्दिष्टांपैकी 2 हजार 520 शेततळी पूर्ण केली असून हे उद्दिष्टापेक्षाही खूप कमी काम आहे, या कामात अधिक लक्ष घालून मोठ्या प्रमाणात शेततळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
कमी पावसात मागेल त्याला शेततळे योजना महत्त्वाची आहे.  या योजनेत शेतकऱ्यांने  एकदा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर  शेतकऱ्याला  अर्ज देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करून शेततळे झालेल्या ठिकाणी सामाजिक आर्थिक चांगला परिणाम होत आहे, असे त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्री  म्हणाले, उस्मानाबाद जिल्हयातील पाणीपुरवठयाच्या योजनेवर झालेल्या कामांचा निधी नॉर्मसप्रमाणे द्यावा व त्या व्यतिरिक्तचा
 निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून दयावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उमरगा तालुक्याचा जरी दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश झाला नसला तरी अग्रीकल्चर दुष्काळ या प्रकारामुळे उमरगा तालुक्यालाही दुष्काळी तालुक्यासाठी लागू होणाऱ्या उपाययोजना लागू केल्या जातील, असे स्पष्ट केले.तसेच उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात हे शासन यशस्वी ठरले आहे. याबरोबरच उस्मानाबाद आणि पालघर या दोन जिल्हयांमध्ये काऊ क्लब ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. ही संकल्पना या दोन जिल्हयामध्ये  यशस्वी ठरल्यास संपूर्ण राज्यात हा पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा आवर्जून उल्लेख करुन त्यांच्या कामांची प्रशंसा केली.
जिल्ह्यातील दहा ते बारा हजार नागरिकांनी नरेगांतर्गत शौचालये बांधली आहेत पण काही तरतुदीनुसार शौचालयाचा निधी लोकांना मिळत नाही. या लोकांनी शौचालयाची कामे पूर्ण झाली असल्याने याचे प्रमाणीकरण करून एका महिन्यात यांना निधी देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले. राष्ट्रीय व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ती सर्व कामे दुष्काळी परिस्थितीचा विचार करता मार्च 2019 पर्यंत पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करावेत असे सांगुन श्री. फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व मुद्रा बँक योजनेंतर्गत बँकांकडे आलेल्या सर्व कर्ज प्रकरणांना बँकांनी वेळेत मंजुरी दिली पाहिजे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. समाज कल्याण च्या विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्याकडून ऑनलाइन अर्ज भरून घ्यावेत, कोणत्याही प्रकारे शासन महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑफलाईन पद्धतीने देणार नाही. या कामात जी महाविद्यालये सहकार्य करणार नाहीत त्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील 917 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण करुन या योजनेंतर्गत राज्यातील 30 हजार किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत. जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांना मुख्यमंत्री ग्राम रस्त्यांची अधिक कामे दिली जातील असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत उमरगा बाह्यवळण रस्त्यावरील वीज वितरण कंपनीने पुढील आठ दिवसात विजेचे खांब काढण्याचे अंदाजपत्रक द्यावे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पीपीटी द्वारे सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान सरासरी 767 मिलिमीटर इतकी असून सरासरी चारशे
 एक्कावन्न मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाची 58.7 इतकी टक्केवारी असल्याचे सांगितले. मागील पंधरा वर्षाचा विचार करता जिल्ह्यात नऊ वर्षे पाणीटंचाई होती. मागील वर्षी नऊ गावात दहा टँकर तर यावर्षी उस्मानाबाद तालुक्यात कोळेवाडी गावात एक टँकर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मंडळनिहाय पर्जन्यमान, खरीप पीक परिस्थिती, झालेले शेतीपिकाचे नुकसान, बोंड अळी अनुदान वाटप,जिल्ह्याची सुधारित पैसेवारी 47.30 टक्के, चारा नियोजन, जलयुक्त शिवार व अन्य योजनांच्या माहितीचे सादरीकरण श्री.गमे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. सर्व लोकप्रतिनिधींनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतूक करून या योजनेस 2 हजार 200 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याबददल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करून अभिनंदनही केले.

Sunday 4 November 2018

महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळयांच्या अनामत रक्कमेबाबत लवकरच निर्णय -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर






*जिल्हाधिकारी कार्यालयात रेव्हेन्यू फिटनस क्लब चे उद्घाटन
     लातूर,दि.4:- लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले गंजगोलाई  व गांधी चौकातील व्यापारी संकुलातील गाळयांसाठी  रेडिरेकनर  पध्दतीनेच भाडे आकारले जाईल. तसेच  या गाळयांच्या अनामत रक्कमेबाबत  (डिपॉजिट )  महापालिका  प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये सुवर्णमध्य साधून एक फिक्स रक्कम  अनामत म्हणून  घेण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे कामगार कल्याण, भूकंप पुर्नवसन ,कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.  
    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महापालिका व्यापारी संकूलातील  सोयी –सुविधा व गाळे अनामत रक्कमेबाबत आयोजित बैठकीत  श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी  जी. श्रीकांत ,महापौर सुरेश पवार, मनपाआयुक्त कौस्तुभ दिवेगावकर , उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती शैलेश  गोजमगुंडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, तसेच नगरसेवक व सर्व व्यापारी उपस्थित होते.
     पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, गंजगोलाईला  100 वर्षे पूर्ण होत आहेत.  या गोलाईतील व्यापारी  व व्यावसायिकांनी  लातूर शहराला व्यापारी शहर म्हणून  ओळख निर्माण करुन दिली आहे.या ठिकाणच्या  व्यापारी/ व्यावसायीकांना  ते  पूर्वीपासून  व्यवसायधारक असल्याचा विचार करुन गाळे  देण्यात येतील. त्याप्रमाणेच व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुस्थितीत  कसा राहील याची काळजी ही घेतली  जाऊन गंजगोलाई व गांधी चौक व्यापारी संकुलातील सर्व  गाळेधारकांना  पुढील  काळात सर्व मुलभूत  सुविधा उपलब्ध्‍ करुन  दिल्या जातील, असे ही त्यांनी सांगितले.
    महापालिकेच्या व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांनी  रेडी रेकनर दरा प्रमाणे  भाडे भरणे आवश्यक आहे. तसेच प्रशासन व व्यापारी  यांच्यात लवकरच  अनामत रक्कम जमा करणे बाबत  महापालिका व व्यापारी  यांच्यात सुवर्णमध्य साधून महापालिका व व्यापारी  असे दोघांचे ही हीत साधले जाईल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.तसेच एमआयडीसी मधील  व्यापारी व उद्योजकांनी  महापालिकेचा कर भरणे  आवश्यक असल्याचे  ही त्यांनी स्पष्ट केले.
     जिल्हाधिकारी कार्यालयात जीमचे उद्घाटन :-
          जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी  व कर्मचाऱ्यांच्या  सुदृढ आरोग्यासाठी तयार  करण्यात आलेल्या रेव्हेन्यू फिटनेस  क्लब (जीम ) चे उद्घाटन पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज  येथे केले. यावेळी श्री. निलंगेकर  यांनी जीमची पाहणी करुन  सर्व अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी  या जीमचा  लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी  जिल्हाधिकारी  जी.श्रीकांत ,महापौर सुरेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ.अनंत गव्हाणे आदिसह  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.