पाणी आडवा- पाणी जिरवा मोहिम कायमस्वरुपी राबविली
पाहिजे.
-विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे
औरंगाबाद, दि.10- मराठवाड्यात यशस्वी शेती करण्यासाठी पाण्याचा
कार्यक्षम वापराबरोबरच मोठ्या प्रमाणावर पाणी आडवा- पाणी जिरवा ही मोहिम कायमस्वरुपी
राबविली पाहिजे असे मत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. मराठवाड्यातील
शेतीचे भवितव्य या एक दिवसीय कृषी परिषदेच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हा
परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, कृषी आयुक्त विकास
देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, उद्योजक
राम भोगले व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठवाडा
वैधानिक विकास मंडळ, राज्य शासनाचा कृषी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर,
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड
ॲग्रीकल्चर आणि इस्टीटयुशन ऑफ ॲग्रीकल्चरल टेक्नॉलॉजीस्टस, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने
मराठवाड्यातील शेतीचे भवितव्य या एक दिवसीय कृषी परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील
मुख्य नाट्यगृहात करण्यात आले होते. दोन सत्रात चाललेल्या या परिषदेचा सायंकाळी समारोप
झाला.
श्री.
बागडे पुढे म्हणाले की, आजच्या परिस्थित गटशेती यशस्वी होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी
गटशेतीवर जास्तीतजास्त भर देण्याची गरज आहे. शेती व्यवसाय बरोबरच शेतीवर प्रक्रिया
करणारे उद्योग सुरु झाले पाहिजेत, त्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर प्रक्रिया उद्योगाचे
शिक्षण दिले पाहिजे. त्यामुळे मराठवाड्यात
प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहू शकतात. असे त्यांनी सांगितले.
राज्याचे
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर आपल्या
मनोगतात म्हणाले की, शेतीचे भवितव्य या विषयावर
मराठवाड्यात ही पहिली कृषी परिषद असून असे उपक्रम आयोजित करण्याची गरज आहे. आधुनिक
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीसाठी या परिषदेचा निश्चित उपयोग होईल. असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला. पावसाच्या अनिश्चिततेमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण
झाली होती. याच बरोबर पाणी उपसा सुध्दा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत
आला होता. परंतु आज चित्र बदलले असून मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे
शेतीला निश्चित चांगले दिवस आले आहेत असे ते म्हणाले.
कृषी
आयुक्त विकास देशमुख यावेळी म्हणाले, या कृषी परिषदेमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना
कृषीक्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाले असून या मार्गदर्शनाचा त्यांनी आपल्या
शेती व्यवसायात उपयोग करुन घेतला पाहिजे. कृषी क्षेत्रात शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या
विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमांच्या
सुरुवातीला उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘शेतकऱ्यांच्या यशोगाथा- कृषी
क्रांन्ती’ या पुस्तिकेचे, ‘कॉमन फार्मर फोरम’
या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे विमोचन व साप्ताहिक
आधुनिक किसानच्या ‘दुग्ध विशेष अंकाचे’ विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नांनावरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला
मराठवाड्यातील कृषी विभागातील अधिकारी, शेतकरीगट, शेतकरी, उद्योजक उपस्थित होते.